‘लोकरंग’मधील (३० जून) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रताप आसबे यांनी घेतलेली मुलाखत- ‘काँग्रेसफुटीच्या पन्नाशीपश्चात’ वाचनात आली. शरद पवारांनी केलेल्या मनमोकळ्या संवादातून दोन गोष्टी प्रकर्षांने जाणवल्या. एक म्हणजे- शरद पवारांनी सतत ‘यशस्वी’ बंडखोरी करत नेतृत्व केले. आणि दुसरे म्हणजे- पन्नास वर्षांपूर्वीच्या काळात गोविंदराव तळवलकरांसारख्या मातब्बर पत्रकारांचा सरकार (राजकारणी) सल्ला घेत असत.

काँग्रेसमधून गेल्या पन्नास वर्षांत कितीतरी लोक पक्षातून फुटले, कितीतरी जणांना फुटवले. गांधी कुटुंबाने महत्त्वपूर्ण भूमिका काँग्रेसमध्ये बजावली. ‘गुंगी गुडीया’ समजणाऱ्या इंदिरा गांधींनी काँग्रेसचा चेहरामोहराच बदलला. त्या गेल्यानंतर राजीव गांधी यांनी देशात संगणकक्रांती केली. सोनिया गांधी या इटालियन, त्यांना साधे हिंदीही बोलता येत नव्हते. त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांना धूर्तपणे पंतप्रधान करून काँग्रेस पक्षात पुन्हा जान आणली आणि दहा वर्षे राज्य केले.

सोनिया गांधी आजारपणामुळे निवृत्तीत गेल्यावर मातब्बर ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी भले राहुल गांधी (नेहरूंचे पणतू) यांची विरोधी पक्षांनी ‘पप्पू’ म्हणून अवहेलना केली, तरी मोठय़ा अपेक्षा ठेवून काँग्रेसची धुरा सांभाळण्यास ते पुढे आले. पण प्रत्येक वेळी मतदारांना गृहीत धरण्याची काँग्रेसने चूक केली. मतदारांची नवी पिढी आता वेगळा विचार करते हेच दिसून आले.

– श्रीनिवास डोंगरे, दादर, मुंबई</strong>

 

ओतप्रोत भरलेली आपुलकी                    

लोकरंग (९ जून) मधील ‘कवितेचा जागल्या’ हा म. सु. पाटील यांच्यावरील नीरजा यांनी लिहिलेला लेख आवडला. लेखातील आपुलकी आणि आदर वाचकाच्या मनाला भिडते. म. सु. पाटील यांच्या ‘लांबा उगवे आगरी’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकावर मी पत्राने अभिप्राय देताच त्यांनी मला स्वत: फोन करून संवाद साधला. सामान्य वाचकप्रति इतकी आस्था क्वचितच अनुभवायला मिळते. त्यांच्या अध्यक्षीय भाषणातील जो अंश या लेखात उद्धृत केला आहे ते बहुधा त्यांचे भरतवाक्य ठरले असे आता वाटते आहे.

 – प्रसाद घाणेकर, कणकवली