‘भय इथले संपत नाही.. फाळणी : एक दु:स्वप्न’ हा फाळणीशी संबंधित कथांचा संग्रह. उर्दू, हिंदी कथांचा अनुवाद चंद्रकांत भोंजाळ यांनी केला आहे. या कथासंग्रहात फाळणीशी संबंधित कथा असून, या पुस्तकाच्या माध्यमातून हृदयद्रावक अनुभव वाचकांना वाचायला मिळतात. कृष्णा सोबती, भीष्म साहनी, विष्णू प्रभाकर, समशेर बसू, फहीम आजमी, उपेन्द्रनाथ अश्क, रामानंदसागर, सआदत हसन मन्टो, अहमद नदी कासनी अशा नामवंत लेखकांच्या कथा या पुस्तकात वाचायला मिळतात.

कृष्णा सोबती यांच्या ‘शिक्का बदलला’ या कथेतल्या नायिकेला सत्ता बदलते पण मानवी मूल्यांमध्ये झालेला बदल मान्य नाही. भीष्म सहानी यांच्या ‘पाली’, ‘अमृतसर आले आहे’ या कथांमधून फाळणीच्या वेळेची भयावह परिस्थिती अगदी तटस्थपणे मांडली आहे. या कथा वाचकाला सुन्न करून जातात. 

फाळणीमुळे झालेली ताटातूट आणि कालांतराने घडलेल्या भेटी, रक्तरंजित दाहक अनुभव वाचकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात. यातील काही कथांमध्ये प्रसंगांमधून माणसामाणसांमध्ये निर्माण झालेली दरी, त्यातून तुटलेली मनं, विखुरलेले नातेसंबंध असा मोठा पट मांडला आहे.

सआदत हसन मन्टो यांची ‘थंडगार मांस’ या कथेतील वेदनादायी अनुभव वाचकाच्या विचारापलीकडचा आहे.

जगभर दहशतवाद, माणसामाणसांमधील द्वेष, स्थालांतरितांचे प्रश्न बिकट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या कथा वाचकाला अधिक भावनाविवश करतात.

‘भय इथले संपत नाही.. फाळणी : एक दु:स्वप्न’, अनुवाद – चंद्रकांत भोंजाळ, संधिकाल प्रकाशन, पाने-१८४, किंमत-२२५ रुपये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

lokrang@expressindia.com