अवघ्या सहा वर्षांच्या आमदारपणाच्या अनुभवावर मनोहर गोव्याचा मुख्यमंत्री झाला. अभिमान कुठे संपतो आणि गर्व कधी सुरू होतो हे सांगणं अवघड. मनोहर या सीमारेषेवर असायचा बहुतेकदा. कधी इकडे तर बऱ्याचदा दुसऱ्या बाजूला. गर्व करावं असं त्याच्याकडे होतंही बरंच काही. उच्चकुलीन सारस्वत. प्रभू-पर्रिकर. त्यात आयआयटीयन. यशस्वी उद्याोजक आणि वर ‘गर्व से कहो…’ असं सांगणाऱ्या पक्षाचा नेता.

‘‘तुला काय वाटतं, मी दिल्लीला जावं की जाऊ नये…?’’

मनोहरने हा प्रश्न विचारला तेव्हा त्यावर लगेच काय बोलावं समजेना. मी त्याच्याकडे बघत त्याच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. दादर पूर्वेला स्टेशनजवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये २०१४ सालातल्या एका संध्याकाळची ही गोष्ट. मी काहीच बोलत नाहीये हे पाहून अस्वस्थ झालेला मनोहर चिडक्या स्वरात म्हणाला… ‘‘काय ते सरळ सांग.’’ चिडकेपणा आणि स्वत:ला जे हवं आहे ते समोरच्याकडून ऐकायला मिळत नाही तोपर्यंत लपून न राहणारा अधीरपणा त्याच्या स्वभावातच होता. गोव्याचं मुख्यमंत्रीपद सोडून दिल्लीत जावं की न जावं हा त्याचा प्रश्न. तो त्यानं त्याच्या आणखी काही जवळच्यांनाही विचारलेला असणार. बाकीच्यांचं माहीत नाही; पण त्याचे माझे संबंध असे होते की, दोघेही एकमेकांना अप्रिय गोष्टी तोंडावर सांगू शकायचो. त्या ऐकण्याबाबत माझा काही प्रश्नच नव्हता; पण मुख्यमंत्रीपदावर तो होता. सत्तापदावर वरवर चढत गेला तेव्हा आपलंही काही चुकत असेल हे लक्षात घ्यायची आणि ज्यांना ते लक्षात आलंय त्यांच्याकडून ते ऐकून घेण्याची त्याची सवय कमी होत चाललेली. आणि माझी अधिक दृढ झालेली.

मनोहर खूप जुना मित्र. गोव्यात बदली होऊन गेल्यावर ज्या काहींशी दोस्ताना जमला त्यातला एक. गोव्यात बदली होऊन गेलो तेव्हा मनोहर राजकारणात यायचा होता. संघात मन लावून काम करायचा. त्याचा स्वत:चा लहानसा कारखाना होता. मूळचा तो अभियंता. आयआयटीयन. नंदन निलेकणी यांच्या वर्गात होता. अभ्यासात किती हुशार असेल ते कळावं म्हणून हा तपशील दिला. गोव्यात म्हापशाला घर होतं त्याचं. मी पर्वरीला राहायचो. खरं तर वयानं तो माझ्यापेक्षा नऊएक वर्षांनी मोठा. पण बरोबरीचा वाटायचा. गोव्यातल्या कोकणीत तसंही ज्येष्ठांनासुद्धा ‘अहोजाहो’ करायची पद्धत नाही. त्यामुळे मनोहर पहिल्या छुट अरे-तुरेवर आला त्यात काही आश्चर्य नाही. मनोहरकडे त्या वेळी मोटार होती. (बहुधा) ऑलिव्ह ग्रीन रंगातली ‘११८ एनई’. पुढे बऱ्याच वेळा मनोहरच्या त्या गाडीनं प्रवास झाला. म्हापशाला जाताना मला तो पर्वरीला वाटेत सोडायचा. किंवा पणजीला जाताना मला घ्यायचा. तेव्हा मनोहर राम-मय झालेला. अयोध्येत राम मंदिर उभारणं, त्यासाठी गोव्यातनं जास्तीत जास्त विटा पाठवणं त्यानं मनावर घेतलेलं. उद्याोगपती अशोक चौगुले विश्व हिंदू परिषदेचे राम जन्मभूमी आंदोलनाचे तिथले सूत्रधार होते. ते दक्षिण गोव्यात राहायचे. हे आंदोलन सगळं समजून देण्यासाठी अनेकदा मनोहर मला त्यांच्याकडे घेऊन गेलेला. ‘आयआयटी’तला असूनही मनोहरचं यात गुंतणं कुतूहल वाढवणारं होतं. त्यावर छेडलं तर मनोहर सांगून जायचा… वैयक्तिक आयुष्यात मी इतका धार्मिक नाही… पण सध्या सामाजिक पातळीवर धार्मिक भूमिका घेणं कसं आवश्यक आहे वगैरे. गोव्याच्या रक्तलांच्छित धर्मकारणाच्या आणि धर्मांतराच्या इतिहासाची त्याला पार्श्वभूमी होती. असा पोषक इतिहास मुरलेल्या भूमीत भाजप जोमानं वाढणं साहजिक होतं. मनोहरचं असं धर्माच्या कडेकडेनं राजकारणात पुढे जाणं आणि भाजपला विस्तारासाठी चांगल्या चेहऱ्यांची गरज वाटणं एकाच वेळी घडत होतं. साहजिकच धडाकेबाज वागणारा मनोहर आणि भाजप ही एकमेकांसाठी अपरिहार्य बनले.

पुढे १९९४ साली तो आमदार झाला. लगेच विरोधी पक्षनेताही. आधीच त्याचा स्वभाव आक्रमक. त्यात आता हे पद. मनोहर सुटलाच. बघता बघता गोवा भाजपचा तो चेहरा बनला. राजकारणात तो स्थिरावत असताना माझं गोवा सुटलं. पण मनोहरशी संपर्क कायम राहिला. मुंबईत आला की हमखास आम्ही भेटायचो. कधी दादरला स्वामी नारायण मंदिराजवळच्या हॉटेलात. कधी उत्तनला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत किंवा दक्षिण मुंबईत. घरीही यायचा कधी. आला की बायकोला त्याचा पहिला प्रश्न ठरलेला : ‘‘गोंयात मिळता तशें निस्ते अंगा तुका मिळेना मुगो…’ (गोव्यासारखे मासे इथे मिळत नसतील ना तुला?) एकदा तर मुंबईत आल्यावर शासकीय गाडीची चुकामूक झाली तेव्हा हा पठ्ठ्या रिक्षानं आला. ‘‘हे तू जरा अतिच करतोस,’’ असं म्हटल्यावर म्हणायचा : ‘‘एकदा ‘साधा’ म्हणून माझी ओळख झाली की ती आयुष्यभरासाठी राहील.’’ म्हणजे इतका असा हिशेबी होता तो. समारंभाला मुद्दाम उशिरा यायचं आणि आल्यावर एकदम मागच्या रांगेत बसायचं वगैरे. साधेपणाच्या प्रतिमेचं भरजरी महत्त्व तो जाणून होता.

मुख्यमंत्री होताना आणि झाल्यावर हे साधेपण त्याला कामी आलं. अवघ्या सहा वर्षांच्या आमदारपणाच्या अनुभवावर मनोहर गोव्याचा मुख्यमंत्री झाला. अभिमान कुठे संपतो आणि गर्व कधी सुरू होतो हे सांगणं अवघड. मनोहर या सीमारेषेवर असायचा बहुतेकदा. कधी इकडे तर बऱ्याचदा दुसऱ्या बाजूला. गर्व करावं असं त्याच्याकडे होतंही बरंच काही. उच्चकुलीन सारस्वत. प्रभू-पर्रिकर. त्यात आयआयटीयन. यशस्वी उद्याोजक आणि वर ‘गर्व से कहो…’ असं सांगणाऱ्या पक्षाचा नेता. आणि आता तर मुख्यमंत्री. मनोहर बिनधास्त वाटेल ते निर्णय घ्यायचा. एकदा तर पन्नासभर सरकारी शाळाच त्यानं संघाच्या ‘विद्या भारती’कडे वर्ग केल्या. नंतर एकदा आपल्या पक्षाच्या अर्धा डझन आमदारांना त्यानं सरकारी खर्चानं ब्राझीलला पाठवलं. कशासाठी? तर तिथं त्या वर्षी भरवल्या गेलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपचा ‘अभ्यास’ करण्यासाठी. त्याला अडवणारं कोणी नव्हतं राज्य भाजपत. काही पत्रकार मंडळी होतो आम्ही त्याला सुनावणारी. पण तुम्हाला काय कळतं राजकारणातलं… असं म्हणून तो उडवून लावायचा. राजकारणातले, स्वपक्षातले कनिष्ठ आणि तरुण पत्रकार वगैरे यांना तो मोजत नसे. त्यामुळे त्याच्याविषयी अशी एक भीती निर्माण झालेली. आनंद घ्यायचा तो या आपल्या प्रतिमेचा. समव्यावसायिकांना फटकारणारा नेता आपल्याकडे अनेकांना भावतो. त्यात बाकीचे सगळे भ्रष्ट आणि आपण चांगले अशी वाटणी झालेली असेल तर उत्तम. असा नेता पत्रकारांना चार हात दूर ठेवत असेल तर त्याहून उत्तम. सोन्याहून पिवळंच. मनोहरला हे लक्षात आलेलं. यावरनं कधी विचारलं तर ‘काळजी करू नकोस’ म्हणायचा. लोक आपल्या पाठीशी आहेत याची त्याला खात्री होती. ही खात्रीची भावना इतकी प्रबळ होती की एखादा निर्णय घेताना चार जणांना विचारण्याची गरजही त्याला वाटेनाशी झाली. बघता बघता मनोहर गोवा भाजपचा सुपरमॅन बनला.

या पार्श्वभूमीवर त्याचा तो प्रश्न : दिल्लीत जावं का?

एव्हाना दिल्लीत मोठा बदल झालेला. नरेंद्र मोदी यांचं सरकार आलेलं. पक्षाचं नेतृत्व मोदी यांच्याकडे यावं यासाठी त्याआधी गोव्यात भरलेल्या भाजपच्या अधिवेशनात मनोहरनं थेट लालकृष्ण अडवाणी यांच्यावर तोफ डागलेली. ‘‘लोणचं मुरल्यावर छान लागतं हे खरं, पण जास्त मुरलेलं लोणचं बिघडतं… त्याची चव जाते.’’ हे त्याचं अडवाणींच्या मुरलेपणावरचं भाष्य. मनोहरच्या बोलण्यात हिशेबीपणा नसायचा. म्हणजे ‘उद्याचा’ विचार करून त्यानं मोदी यांची तरफदारी केली असं म्हणणं अवघड. त्याआधी काही वर्षांपूर्वी त्यानं गुजरात दंगलींच्या मुद्द्द्यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांवरही ताशेरे ओढलेले. आता अडवाणींना विरोध करताना त्याच्यामागे ‘संघ’शक्ती असल्याची वदंता होती. अवघ्या काही महिन्यांत मनोहरला दिल्लीचं निमंत्रण आलं. आणि तो विचारत होता… जावं का?

त्याला म्हटलं : ‘‘भाजपमध्ये आता एकच तलवार आहे आणि म्यानही एकच आहे… तेव्हा तू काय करणार?’’ हे असं बोलणं त्याला आवडायचं नाही; हे माहीत होतं. तो चिडला. सरळ काय ते सांग, म्हणाला. त्याला सांगितलं ‘‘… हे सरळच आहे. तुझा आग्रही स्वभाव आणि ‘हायवे ऑर मायवे’ ही तुझी वृत्ती… तुला हवं ते करायला मिळेल का? तुझा नेता तुलाच जास्त माहीत. तेव्हा कसं काय जमायचं हा प्रश्न.’’ ते ऐकल्यावर मी किती नकारात्मक आहे वगैरे सुनावलं त्यानं. हेही नेहमीचंच.

मनोहर दिल्लीला गेला आणि पुढे काय घडलं ते सगळ्या देशानं पाहिलं. पण देशाला न दिसलेली त्याची दिल्लीतली कासावीस माझ्यासह त्याच्या काही मित्रांनी अनुभवली. गोव्यात एकहाती राज्य हाकणं वेगळं आणि ‘आताच्या’ दिल्लीत एखादं मंत्रीपद भूषवणं वेगळं. मंत्री असतानाही स्वत:चं अस्तित्व विरघळवून टाकू देणं अनेकांना जमलं. मनोहरला ते अवघड जात होतं. मनोहर दिल्लीत कमालीचा एकटा पडत गेला. रेल्वेमंत्री असताना सुरेश प्रभूंशेजारचा बंगला त्याचा होता. अगदी लागून. सुरेश प्रभूंची बायको उमा गोव्याची. माझी अगदी जुनी सहकारी मैत्रीण. मनोहरही मूळचा प्रभू. त्यामुळे दिल्लीत शेजारच्या उमा-सुरेशच्या घरी तेवढं त्याचं जाणं-येणं असे. कधी प्रभूंकडे जाणं झालं की मनोहरकडे डोकावणं आणि मनोहरकडे जाणं झालं की प्रभूंकडे जाणं हा रिवाज होता. एवढ्या मोठ्या बंगल्यात मनोहर एकटा असायचा. दिल्लीत भेटला की हे सगळं बोलायचा. दिल्लीतली त्याची अस्वस्थता उत्तरोत्तर वाढत गेली. त्यात त्याच्या मंत्रालयासंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आणि मनोहर कमालीचा चिडला. राग लपवण्याची सवय नव्हती त्याला. आणि इतके दिवस कधी गरजही वाटली नव्हती त्याची. त्यामुळे ही राग न दाखवण्याची राजकीय कला त्याला अवगत नव्हती. मनोहर जमेल त्यांच्याकडे आपला राग व्यक्त करत गेला. त्याला आता दिल्लीत राहायचं नव्हतं. मी ही बाब एकदा नितीन गडकरींच्या कानावर घातलेली. त्यांनाही अर्थात ते माहीत होतंच. त्यांनी आणि अन्य काहींनी त्याचं गोव्यास परतणं कसंबसं लांबवलं. मधेच मनोहर गोव्याला परतला असता तर त्याचा अर्थ फारच वेगळा घेतला गेला असता.

शेवटी विधानसभा निवडणुका झाल्या आणि मनोहरला परत गोव्याला पाठवायचं रास्त कारण मिळालं पक्षश्रेष्ठींना. पुन्हा मुख्यमंत्री. एव्हाना मनोहर चिडचिडा झालेला. त्याच्या निर्णयाविरोधात जरा कोणी काही लिहिलं की रागवायचा. त्या वेळी एकदा झालं असं की, २०१७ साली नोव्हेंबरात पत्रकारितेसंदर्भातल्या एका कार्यक्रमासाठी मला गोवा सरकारचं निमंत्रण होतं. नंतर कळलं की माझं नाव सुचवण्यामागेही तोच होता. मग ठरलं असं की, कार्यक्रम होता त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत मी पणजीत पोचायचं आणि तडक अल्तिनोवर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जायचं. निवांत गप्पा मारायच्या. पण त्या दिवशी विमान नेमकं तीनेक तास लेट. पणजीत पोहोचेपर्यंत मध्यरात्र उलटली. तेव्हा भेटणं राहून गेलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्याचा फोन. ‘‘तुझ्या कार्यक्रमाला मी अध्यक्ष आहे, माहितीये ना?’’ त्यानं सांगितलं. नंतर काहीबाही बोलणं झालं. फोन ठेवताना त्यानं विचारलं, ‘‘तू काय बोलणार?’’

त्यामागे कारण होतं गोव्यातल्या खाणी, खनिज वाहतूक, प्रदूषण यावर ‘द इंडियन एक्स्प्रेस’मधली माझी सहकारी स्मिता नायर हिनं त्या वेळी केलेली एक वृत्तमालिका. ती चांगलीच गाजली. अर्थातच मनोहर त्यावर नाराज होता. म्हणून त्याचा तो प्रश्न. मी म्हटलं, ‘‘मी माझ्या व्यवसायधर्माला साजेसंच बोलणार.’’ मग कार्यक्रमस्थळी आल्यावर मनोहरनं त्याच्या आयोजकांना सांगितलं, ‘‘समारंभाचा अध्यक्ष मी आहे, पण मला लवकर जायचंय म्हणून गिरीशच्या आधी बोलून घेईन.’’ ते बापडे सरकारी अधिकारी. नाही कशाला म्हणतील. मग मनोहरनं आपल्या भाषणात माध्यमांच्या नकारात्मकतेवर खरपूस बोलून घेतलं. तो गेला. नंतर मी माझ्या भाषणात सरकारच्या… मग ते कोणत्याही पक्षाचं असो… त्रुटी दाखवून देणं हाच पत्रकारितेचा धर्म आहे… सत्ताधाऱ्यांना काय वाटतं याची फिकीर आपण करण्याचं काही कारण नाही वगैरे वगैरे बोललो. कार्यक्रम संपवून मी विमानतळाकडे निघालो तर मनोहरचा फोन. ‘‘ तू असं बोलणार म्हणूनच मी लवकर गेलो.’’ आम्ही प्रत्यक्ष भेटीत ज्यावर बोलणार होतो, त्या विषयाला मी हात घातला. पण मनोहरला ‘तो’ विषय फोनवर बोलायची इच्छा नव्हती. ‘‘त्या विषयावर समोरासमोरच बोलू.’’ म्हणाला.

पण ती भेट कधी होणार नव्हती. अवघ्या दोन महिन्यांत नव्या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या कर्करोगाची बातमी आली. चर्र झालं. मनोहर मुख्यमंत्री पहिल्यांदा झाला तेव्हा पत्नी कर्करोगानं गेलेली. मुलं लहान होती. म्हणून कसंही करून रात्री घरी पोहोचणारा मनोहर मला आठवला. आता त्यालाच या आजारानं ग्रासलं. तो आणखीनच चिडचिडा झाला. साहजिकही होतं ते. त्या काळात मनोहरशी बोलणं टाळलं याचं आता वाईट वाटतंय. या अशा आजारात समोर आलेलं त्याला आवडेल का… असं वाटायचं. अन्य राजकारणी मित्र त्याचे हालहवाल कळवायचे. काही खरं नाही आता हे जाणवायचं.

अखेर ते खरं प्रत्यक्षात आलं. मनोहर गेला.

राजकारणात एखादा गेला की गेला. त्यामुळे त्याच्याबाबत जे काही घडलं त्याचं आश्चर्य वाटलं नाही. त्याच्या मुलाची इच्छा होती आपल्याला भाजपनं उमेदवारी द्यावी अशी. भाजपला घराणेशाही वर्ज्य आहे असं नाही; पण त्याच्या मुलाला उमेदवारी नाकारली गेली. त्याच्यावर ‘प्रेम’ असणाऱ्या त्याच्या पक्षातल्या चतुर नेत्यांनी मग गोव्यातल्या नव्या मोपा विमानतळाला नाव दिलं ‘मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट’. पण त्याच्या स्मरणार्थ असूनही या विमानतळाच्या नावात पर्रिकर नाही. असं का झालं असेल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता दुसरं एक वाटतं. मनोहर संरक्षणमंत्री होता. ताज्या भारत-पाक संघर्षात आपली ‘राफेल’ विमानं पाडल्याचा दावा पाकिस्तान करतं. आपल्याकडून कोणीच त्या विधानावर काही बोलत नाही. आत्ता मनोहर असता तर गप्प राहिला असता का? बोलला असता तर काय बोलला असता? आणि नाही तर त्याचं मौन ‘मनोहर’ वाटलं असतं का? असो.