‘लोकरंग’ (११ मे) मध्ये भारत पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी जी वार्तांकनं केली त्यावर मार्मिक भाष्य करणारे ‘उन्मादप्रेरी वृत्तपसारा…’ हा पार्थ एम. एन. आणि निळू दामले यांचा ‘माध्यमांचा धिंगाणा’ हे दोन्ही लेख वाचले. लेखात उल्लेखित संदर्भ लक्षात घेता भारतीय माध्यमं बाल्यावस्थेत आहेत याची प्रचीती येते. या संघर्षाच्या निमित्तानेच नव्हे तर विविध विषयांवर त्यांचा एकांगी दृष्टिकोन स्पष्ट लक्षात येतो. मुळात त्यांना लोकशाहीत या चौथ्या स्तंभाच्या असणाऱ्या दायित्व आणि जबाबदारीचे भान नाही हे सहज संवेदनशील आणि विवेकी प्रेक्षकाला कळून येते. वार्तांकनासाठी नळावरच्या भांडणाचा आविर्भाव माध्यमाची पत घालवण्यास सहायक ठरतो आहे. माध्यम स्वातंत्र्याच्या आकडेवारीत जागतिक स्तरावर २०२५ मध्ये आपण १५१व्या स्थानी आहोत. भारतीय प्रिंट मीडियाला अनेक पत्रकारांनी आपल्या धडाडी आणि सत्य प्रतिपादनाने उंची गाठून दिली आहे. अलीकडे मालकशाहीचा वाढता हस्तक्षेप आणि वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. सरकारधार्जिणं वार्तांकन हा पहिला निकष ठरत चालला आहे. या वार्ताहरांना, अँकरना लोकशाही, समाज आणि पत्रकारितेची मूल्ये यांच्याशी काहीही देणेघेणे नसते. सत्ता प्राप्तीसाठी हे उपयोगात आल्याने सरकारी वरदहस्तप्राप्त ही माध्यमं आता भस्मासुराच्या भूमिकेत आढळतात. संघर्षात्मक स्थितीत असावा लागणारा संयम गमावून बसल्याने जागतिक स्तरावर जे हसू झाले, प्रतिमा मलिन झाली ती भरून कशी निघेल? उन्मादी समाज हा विवेक गमावून बसलेला असतो. असा उन्मादी समाज सत्ता हस्तगत करून देतो. त्यातून कायम उन्मादी वातावरण निर्माण करीत राहावे ही माध्यमांची विशिष्ट विचारधारेला पूरक भूमिका भविष्यात देश आणि जागतिक स्तरावर घातक सिद्ध होऊ शकते याचे भान वेळीच आलेले बरे.
– अनिरुद्ध कांबळे, राजर्षीनगर, नागपूर.
खोटेपणाची सुनामी
‘लोकरंग’ (११ मे) मध्ये ‘उन्मादप्रेरी वृत्तपसारा…’ हा पार्थ एम. एन. आणि निळू दामले यांचा ‘माध्यमांचा धिंगाणा’ हे दोन लेख वाचताना मनात सतत एकच प्रश्न घोंगावत राहिला- आपण खरोखर युद्ध लढतो आहोत की सत्याचीच कबर खोदतो आहोत? गोळ्या मृतदेह मागे सोडतात, क्षेपणास्त्रे छतं उडवतात… पण युद्ध सुरू होण्याआधी सत्यच मारलं जातं. कारण सत्य राष्ट्रवादाला किंवा युद्धाच्या उन्मादाला शोभत नाही. सत्य डोळ्यांना त्रासदायक आहे – आणि लोक ते फेकून देण्यास उत्सुक असतात. युद्धाच्या वातावरणात सत्य हे नको असलेल्या नवजात बाळासारखे नकोसे होते- जे नाल्यात फेकून देणे चांगले. हे युद्ध केवळ सीमारेषांवर नाही, तर आपल्या टीव्ही स्क्रीनवर, मोबाइलच्या फॉरवर्ड्समध्ये आणि मनातही चालू आहे – जिथे सत्याला प्रथम बळी जावं लागतं. कारण सत्य राष्ट्रवादाच्या उन्मादी ज्वराला शोभून दिसत नाही. सीमेवरचा खरा संघर्ष, लष्करी निर्णयांचे राजकीय अर्थ, शत्रुराष्ट्रातील सामान्य माणसाचं दु:ख – हे सर्व आपल्याला नको आहे. आपल्याला हवंय एक तयार केलेलं, हवेहवेपणानं झाकलेलं सत्य – जे सोपं आहे, गुळगुळीत आहे, आणि कोणत्याही प्रश्नाशिवाय पचवता येतं.
माध्यमांचं काम माहिती देणं असावं, पण आज ती भावना विकतात. काही मुख्य प्रवाहातील वाहिन्या युद्धप्रसंगाचे देखावे उभे करतात. ‘मानसिक युद्ध’, ‘सायकॉलॉजिकल वॉर’ यांसारख्या शब्दांची नाट्यमय उधळण करत अँकर आपल्या भावना कुरवाळतात – आणि सत्यापासून अधिकाधिक दूर नेतात. समाजमाध्यमांवर तर युद्ध इतकं आक्रमक झालं आहे की तिथं शब्दांचा वापर बॉम्बप्रमाणे होतो. ट्वीट्सद्वारे आरोपांची भडिमार होते, फेसबुकवर भावनिक व्हिडीओंच्या आघाड्या उघडल्या जातात. ‘फॉरवर्ड’ हा आजचा नवा शस्त्रप्रकार आहे – आणि त्याच्या निखाऱ्यांमध्ये विचार हा पहिल्यांदा जळतो. ही परिस्थिती भारतापुरती मर्यादित नाही. अमेरिकेसारख्या देशांमध्येही बनावट बातम्या, खोटे व्हिडीओ आणि द्वेषपूर्ण मोहिमा समाजमनाला वेठीस धरत आहेत. पण तेथे तरी सत्यासाठी झगडणारी पत्रकारिता जिवंत आहे – यंदाचे पुलित्झर पुरस्कार हेच अधोरेखित करतात.
ज्या क्षणी खोट्याला राष्ट्रभक्तीचा झगमगता मुखवटा चढवला जातो, त्याच क्षणी समाज विवेकशून्य होतो. मग युद्ध खरं चाललेलं असतं – पण ते सीमा ओलांडून नाही, तर आपली मने पोखरत असतं. हे रोखणं केवळ सरकार, माध्यमं किंवा समाजमाध्यमांची जबाबदारी नाही – ती आपल्या प्रत्येकाची आहे. आपल्याला ठामपणे विचारायला हवं – ‘‘मी कुठल्या बाजूने उभा आहे – सत्याच्या की उन्मादाच्या?’’ कारण, खोटेपणाच्या सुनामीत वाहून जाण्यापेक्षा, सत्याच्या बाजूने एकटा उभं राहणं हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रप्रेम ठरेल.
– तुषार निशा अशोक रहाटगावकर, डोंबिवली (पूर्व)
देशासाठी घातक ठरणारा पायंडा
‘लोकरंग’ (११ मे) मध्ये ‘उन्मादप्रेरी वृत्तपसारा…’ हा पार्थ एम. एन. आणि निळू दामले यांचा ‘माध्यमांचा धिंगाणा’ हे दोन्ही लेख वाचले. युद्धविषयक वार्तांकन करताना अलीकडच्या दृक ् -श्राव्य बातम्यांचे उन्मादक प्रसारण ऐकून भयभीत वातावरण निर्मिती करण्यात, कुठलेच भान नसल्याचे चिंताजनक वातावरण बघावयास मिळाले. निदान लेखकाने तरी यावर प्रकाश टाकला. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यास, ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दिलेल्या चोख प्रत्युत्तराचे वार्तांकन करताना दृश्य माध्यमांनी, संवेदनशीलता हरवल्यागत केलेले प्रसारण हास्यास्पद असेच होते. मानवतेचा विसर पडतो तेव्हा आचरटपणाचा कळस असल्याचेही जाणवले. दहशतवाद्यांची ठिकाणे नेस्तनाबूत करून, त्यांना यमसदनी धाडल्याचा जल्लोष साजरा करताना त्यातील मानवीयमूल्यांचा गाभाच हरवून गेल्याचे दिसत होते. केवळ राज्यकर्त्यांच्या कर्तृत्वाचे प्रभावशाली वर्णन असल्याचे चित्र रंगवले जात होते. लेखकाने , ‘वॅग द डॉग’ या चित्रपटाचा जो उल्लेख केला आहे, त्याचीच ही पुनरावृत्ती आहे, हे खरे आहे. देशवासीयांच्या राष्ट्रभक्तीबद्दल शंकेचे कारण नाहीच. ती अतुलनीय आहे, पण फाजील आततायीपणाची शब्दफेक आणि उथळ शब्दांच्या अर्थावर कंठशोष करीत, गळा फाटून जाईपर्यंतची आरडाओरड, म्हणजे विषयाचे हरवलेले गांभीर्य… बरे, या काळात जणू काही दररोजच्या दैनंदिन गरजा काहीच नव्हत्या का? केवळ राज्यकर्त्यांचा उदोउदो करण्यात, अहोरात्र चोवीस तास एकाच विषयाचे वार्तांकन करण्यात संपूर्ण वेळ निघून गेल्याने, ज्यांच्या दैनंदिन गरजांकडे दुर्लक्ष झाले त्याची दखल कुणीच घेतली नाही. ‘युद्धस्य कथा’ म्हणजेच एकूण जीवन असल्याच्या आभासी जगात रममाण होणे हे देशासाठी घातक ठरणारा पायंडा ठरू नये.
– डॉ. नूतनकुमार सी. पाटणी.
शिक्षण धोरण नीट राबवावे
‘लोकरंग’मधील (११ मे) माधव गाडगीळ यांचा ‘मातृभाषा हीच ज्ञानभाषा’ हा लेख वाचला. लेखकाच्या ‘मी शाळेमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषा शिकण्यात भरपूर वेळ (वाया?) घालवला’ या विधानाला जोडून पुढे असेही म्हणावेसे वाटते की, वेळ आणि टक्केवारीही घालवली. यातील संस्कृतातील तर ‘राम चालवा’, ‘राम रामो रामा: प्रथमा’ या घोकंपट्टीने माझा अर्धा जीव घेतला, उरलेला अर्धा त्यासंबंधातील व्याकरणाच्या पंधरा मार्कांच्या प्रश्नाने घेतला. पाठ्यपुस्तकातील धड्यातील उताऱ्यांचे आणि बाहेरील उताऱ्यांचे भाषांतर, इतर काही किरकोळ प्रश्न यावरून मी या विषयात तरलो. आजपर्यंतच्या आयुष्यात कुठेही संस्कृत माझ्या उपयोगाला आली नाही. ‘मराठी’ विषयात पाठ्यपुस्तकात ठरावीक बुळबुळीत लेखक- कवी भेटले. नामदेव ढसाळांसारखे प्रत्यक्ष जीवनात भेटले. इंग्रजी (५ वीपासून), ‘हिंदी’ (८ वीपासून) यातील कुठल्याच भाषेचे सखोल, सुंदर, दर्जेदार ज्ञान कधीच मिळाले नाही. सारे वरवरचे, धड्यावरील प्रश्न सोडवण्यापुरते. शालेय अभ्यासक्रमाने विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड कधी निर्माण होऊच दिली नाही. कोणतीही भाषा भाषांतराची सुविधा इतकी कृत्रिम आहे की त्यात भाषेचा गोडवा नाही की ठसका नाही. ‘राजसा! जवळी जरा बसा!’ ‘ Rajsa, close seat!’ यातला ‘जरा!’ कसा व्यक्त करणार? आपले शैक्षणिक धोरण सतत बदलत असते, पण ते कधीच समाधानकारक होत नाही. नवीन धोरण आले की ‘जुनी खोडं’ त्याला विरोध करू लागलात, तोही केव्हा? तर ऐन शालेय वर्षाला सुरुवात होत असताना. मग सरकारही त्यांना गोल गोल फिरवत, खेळवत ठेवते आणि शेवटी सरकारला हवे तेच करून मोकळे होते. इंग्रजांनी त्यांच्या गरजेपुरते कारकून निर्माण होण्याइतपत ज्ञान आपल्याला दिले. खरी ज्ञानाची गरज आपल्याला तेव्हा लागली जेव्हा इथल्या आंदोलनकर्त्यांवर इंग्रजांनी खटले भरले, त्यांच्या बचावासाठी ‘कायद्या’च्या ज्ञानाची. पण ते तर विदेशात बंद होते. तरीही इथले लोक विदेशात गेले आणि बॅरिस्टर होऊन आले. ज्ञानाची ती भूक काही एका गरजेपोटी होती. त्यानंतर हळूहळू तीही मिटत गेली. आता तर काय सबकुछ गूगल. भारतभर सर्वांच्या सर्वच मातृभाषांतून चांगले शिक्षण देण्याची व्यवस्था अमलात आणली पाहिजे. बोलणे सोपे आहे, पण या बहुरंगी, बहुढंगी, ‘अनेकता में एकता’ असणाऱ्या देशात इतके भाषाबाहुल्य आहे की, तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणारी प्रगती ही इथे थिटी पडेल. तसे नसते तर आज लोकसभेत अभिजात मराठी भाषेचे शिलेदार-खासदार हिंदीतून जी काही भाषणे देत असतात त्यांची कीव वाटली नसती. अशा वेळी मराठी भाषा मातृभाषा म्हणून, इंग्रजी जागतिक भाषा म्हणून आणि हिंदी ही या देशांतर्गत संपर्क भाषा म्हणून त्रिभाषा सूत्र अपरिहार्य होते.
– अॅड. एम. आर. सबनीस, मुंबई
अभिनव वाचन गंमत
‘लोकरंग’ (१८ मे) मधील ‘बालमैफल’ सदरातील ‘सुट्टीतली वाचन गंमत’ ही उज्ज्वला देशपांडे यांची गोष्ट वाचली. यात अवांतर वाचनाचा ‘पूरक वाचन’ असा केलेला उल्लेखही भावला. या पूरक वाचनाचा उपयोग योग्य उच्चार, मुद्देसूद लेखन आणि संभाषण, आपले मत इतरांना थोडक्यात सांगणे, इतरांचे मत आदरपूर्वक ऐकणे इत्यादी व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी कसा होऊ शकतो हे अगदी उत्तम शैलीत मोजक्याच शब्दांत सांगितल्यामुळे लहान मुलांसह मोठ्यांसाठीही अनुकरणीय आहे. कुटुंबातील हरवत चाललेला संवाद पुनर्स्थापित करण्यासाठी आपण वाचलेलं कुटुंबातील वडिलधाऱ्या सदस्यांना सांगायचं ही युक्ती मस्तच. सुट्टीत सुरू केलेली ही वाचन गंमत सुट्टीपुरती मर्यादित न राहता सतत सुरूच राहावी यासाठी पालकांनीही आपल्या पाल्यांना त्यांच्या आवडीचे पूरक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मुलांच्या हातात मोबाइल देऊन आपल्या कामात गर्क राहणाऱ्या पालकांनाही अंतर्मुख होण्यास भाग पाडणारी ही वाचन गंमत अभिनंदनीय! या अभिनव वाचन गमतीमध्ये आपण सर्वांनीच सहभागी होऊन वाचन गमतीचा आनंद घेऊ या.
– सावळाराम मोरे, नालासोपारा.