सविता दामले

कझाकस्तान हा एके काळच्या सोव्हिएत रशियाच्या विघटनातून निर्माण झालेला देश. त्याच्या नावावरून ते ‘कजाग’ लोकांचं (बायकांचं!) स्थान असं चिडवूनही झालेलं. मध्य आशियातला आकाराने सर्वात मोठा आणि विशेष म्हणजे अलीकडच्या काळात पर्यटनासाठी विस्तारत चाललेला भूभाग. थायलंड-मलेशिया-सिंगापूर या वेगेवेगे करायच्या परवडेबल देशाटन पर्यायांत गेल्या तीन-चार वर्षांत भारतीयांसाठी ही भर पडलेली. त्या कुतूहलामुळे या देशात आपण जाऊ या का फिरायला? असं लेकानं विचारताच मी लगेच होकार दिला. तिथं भारतीयांना व्हिसा लागत नाही. १४ दिवसांसाठी तो मुक्त ठेवण्यात आल्याने तिकीट काढून थेट जायचं. पण पुढला प्रश्न आला की हे कझाकस्तान मध्य आशियात नक्की आहे तरी कुठं? खूप लांब नाही आपल्या देशापासून. वेळेनुसार पाहिलं तर आपल्यापेक्षा अर्ध्या तासानेच मागे. दिल्ली-अल्माटी विमान तीन तास २० मिनिटांत आपल्याला तिथे पोचवते. दिल्ली-कोचीन विमानप्रवास तीन तास १० मिनिटांचा. यावरून अंदाज यावा. एवढ्या जवळचा हा देश! जुन्या काळी म्हणजे ‘देशांच्या सीमा’ आणि ‘राष्ट्र’ ही संकल्पना नसताना आसपासच्या पर्शिया, अझरबैजान, उझबेकिस्तान, कझाकस्तान, ताजिकिस्तान अशा प्रदेशांतून या आपल्या ‘हिंदुस्ताना’त हूण- शक- कुशाण इत्यादी मंडळींची ये-जा होत होती. त्यातले ‘हूण’ या कझाक प्रदेशातलेच तर होते. परंतु इंग्रजांनी आपल्या देशावर ताबा घेतल्यावर सगळ्या भू-सीमा आणि सागरी-सीमा बंद केल्या. त्यानंतर आपण या सगळ्या जवळच्या शेजाऱ्यांना दुरावलो.

आता या हुणांच्या प्रदेशात जायचं म्हणून माझ्या मनात फार उत्सुकता दाटून आली होती. दिल्लीहून रात्री साडेआठला निघालेलं विमान कझाक वेळेनुसार रात्री साडेबारा वाजता अल्माटीला पोचलं. आम्ही विमानतळावरच थांबून पहाटे पाच वाजता ‘अस्ताना’चं विमान पकडणार होतो. अस्ताना-अल्माटी विमानप्रवास १ तास ४५ मिनिटांचा आहे. बॅगांचं वजन फार नसल्याने आम्ही विमानतळावरून ‘एअर बीएनबी’तून बुक केलेल्या घराकडे बसने जायचं ठरवलं. मुलाने बसेसचा शोध घेऊन ठेवला होता आणि एक-दोन बसेस आमच्या घराकडे जातही होत्या. शिवाय बसस्टॉपही विमानतळाबाहेरच होता. त्याप्रमाणे एक बस पटकन आली. म्हटलं, ‘है शाब्बास, आता आपण सुरळीत पोहोचू’; पण कसलं काय? आमच्याकडील एकही क्रेडिट कार्ड त्या बसमध्ये चालेना आणि ड्रायव्हर कॅश घेईना. मग आम्ही बसमध्ये कुणी आमच्याकडून कझाकस्तानी ‘टेंगे’ घेऊन बदल्यात आमचं कार्ड स्वाईप करतंय का? ते पाहू लागलो तर एका गोड आजीबाईंनी आम्हाला कार्ड स्वाईप करून दिलं. वर पैसेही घेतले नाहीत. अशाप्रकारे आम्ही आमच्या ‘गंतव्यस्थानी’ तर पोचलो.

तिथे तापमान दोन ते तीन अंश सेल्सियस इतकं कमी होतं, तरी सूर्य तळपत होता आणि घराजवळच्या फुटपाथवर बर्फाचा खूप जुना टणक थर पसरला होता. बसमधून जाताना आसपास उत्सुकतेने बघत होतो तर सगळ्या इमारती अगदी चकचकीत नव्या! त्यांचे आकारही लंबगोलाकार- त्रिकोणी-उलट्या टोपलीसारखे असे चित्रविचित्र होते. ‘अस्ताना’ शहरास १९९८ साली राजधानीचं स्थान लाभलं. त्यानंतर त्याचा पार कायापालटच झाला असावा. जुनी घरं, पोपडे निघालेल्या, रंग उडालेल्या थकल्या-भागल्या इमारती आम्हाला शोधूनही सापडल्या नाहीत. आमचं घरही पूर्ण गोठलेल्या ‘ईशीम’ नदीकाठावर होतं.

सुरुवातीला त्या भल्याथोरल्या संकुलात नेमकं कुठं जायचं ते कळेना, पण घराची मालकीणबाई आम्हाला घ्यायला आली. ती एक तिशी-पस्तिशीची हसरी मुलगी होती. तिथून अर्ध्या तासावर राहत होती. या नीटनेटक्या घरात फ्रीज-गॅस-वॉशिंग मशीन- किटली- ओव्हन अशा सगळ्या सुविधा होत्या. ती नोकरी करणारी मुलगी होती. ‘हे घर मी स्वत: विकत घेतलं आहे,’ असं तिनं आम्हाला अभिमानानं सांगितलं. अशा छोट्याछोट्या गोष्टीही देशाबद्दल काही ठळक सांगून जातात.

बसमध्ये कार्ड चालत नसल्यानं टॅक्सीनं फिरावं असं ठरवलं तेव्हा खर्च वाढण्याचा काटा मनाला टोचू लागला. पण आनंदाची बाब म्हणजे टॅक्सी मुळीच महाग वाटली नाही, कारण पेट्रोल स्वस्त. शिवाय साधेसुधे रस्तेही अगदी चित्रपट अभिनेत्रीच्या गालासारखे गुळगुळीत. भ्रष्टाचार जगभर आहे असं म्हणतात, पण रस्तेबांधणीत तो जगातल्या बऱ्याच ठिकाणी नाही हे मात्र नक्की. फक्त सध्या बर्फ वितळत असल्यामुळे थोडं पाणी साचतं रस्त्यावर आणि एकूणच धूळ खूप आहे. त्यामुळे आलिशान, पण धुळीने माखलेल्या मोटरगाड्या सर्वत्र आढळून येतात.

इथले लोक उंच- गोरे आहेत, चेहरे थोडेसे मंगोल धाटणीचे वाटले आम्हाला. दुपारी एका हॉटेलात जेवायला गेलो तर तिथल्या मुलींनी पारंपरिक वेश केले होते. ते पाहून मला काश्मिरी पोशाखांची आठवण झाली. परंतु एरवी सर्वांचे कपडे पाश्चात्त्य. स्त्री-पुरुष दोघेही जीन्स आणि शर्ट घालतात.

जनता बहुसंख्य मुस्लीम असूनही देश सेक्युलर. इथे लोकशाही आहे. स्त्रिया बुरखा, अबाया वगैरे वापरत नाहीत, पुरुषही गोल टोप्या घालत नाहीत. मशिदींवर भोंगे नाहीत. बहुधा रशियन प्रभाव अद्यापी टिकून असावा. देश श्रीमंत आहे, लोकसंख्या कमी म्हणजे अवघी दोन कोटी आहे. भिकारी किंवा गरीब जनता कुठे दिसली नाही.

अस्तानातील सरकारी म्युझियममध्ये खूपच वेगळी चित्रं आणि शिल्पं होती, काहीतर चक्क न्यूड चित्रंही आम्ही तिथं पाहिली. याचा अर्थ ‘अमुक जातीधर्माची माणसं अशीच असतात,’ अशी झापडं डोळ्यांवर बांधून फिरण्यात काहीही अर्थ नसतो. झापडं बांधून घ्यायला आपण घोडे थोडेच आहोत?

तिथे आम्ही पिलाफ ऊर्फ पुलाव खाल्ला. चवीला आवडला. आपल्यासारखेच मसाले घातले होते त्यात. जुन्या काळी उत्तम घोडे-पैदाशीचा असा हा ‘स्टेप्स’ कुरणांचा प्रदेश, सध्या घोड्यांचा वाहनासाठी वापर होत नसला तरी येथे ‘हॉर्समीट’, ‘कॅमलमीट’ खाल्ले जाते. घोड्याचे आणि उंटाचे दूधही आहाराचा भाग आहेत. या गोष्टींचा इतका बाऊ का केला जातो, असा प्रश्न मला नेहमीच पडतो. ज्या भागात जे सहज मिळते तेच लहानपणी आई आपल्याला खाऊ घालते म्हणून आपल्याला आवडू लागते, इतकं ते सहज आहे. अर्थात् येथे चिकन, मटणही मिळते आणि शाकाहारींसाठी व्हेज पदार्थ, फळांचे रस, सॅलड्स भरपूर मिळतात. ‘समसा’ म्हणजे ‘समोशा’सारखा पदार्थही शाकाहारी-मांसाहारी असा दोन्हींमध्ये मिळतो, त्यामुळे खाण्याची पंचाईत होत नाही.

आम्ही ‘अस्तानात’ असताना ईद होती, पण काही धुमाकूळ नाही. रोषणाई नाही. लोक घरात आणि आप्तस्वकीयांसह सण साजरा करताना बघून छान वाटलं आणि वेगळंही वाटलं. माझा दुसरा मुलगा लंडनला राहतो. तो म्हणाला, ‘‘आई, आमच्या येथे दिवाळी आणि ईद दोन्ही वेळेस रोषणाई आणि भरपूर आवाज असतो. ते ऐकल्यावर मग मात्र ही आपल्या भारतीय उपखंडाचीच ‘स्पेशालिटी’ ‘नको ती ‘सवय’ आणि ‘समस्या’ आहे की काय? असं मला वाटू लागलं.’’

दिवस लहान नव्हता. संध्याकाळी पावणेसातला सूर्यास्त झाला तरी अंधार लगेच न पडल्याने रोज संध्याकाळी नदीवर फेरफटका मारत होतो. बरेच लोक तिथे फिरायला आलेले दिसायचे. पण रात्र झाली की थंडीमुळे कधी घर गाठतो, असं व्हायचं. एके दिवशी एक सोळा वर्षांचा मुलगा तोडक्यामोडक्या इंग्रजीत बोलला आमच्याशी. भारत म्हटल्यावर शाहरुख खान आणि सलमान खान आठवले त्याला. टॅक्सीतही बॉलीवूडची गाणी बरेचदा लागलेली असायची.

चार दिवस अस्तानात राहून अल्माटीला गेलो. खरी गजबज आणि पर्यटन अल्माटीलाच आहे. अल्माटी ‘हॅपनिंग सिटी’ आहे. अस्तानावर अजून जुन्या सोव्हिएत रशियाची झाक आहे. अल्माटीला विमानतळावर बसचा पास विकत मिळाला त्यामुळे येथे बसनेच फिरलो. बसेस वातानुकूलित होत्या, गर्दीही नव्हती. येथील आमचे ‘एअर बीएनबी’चे घर अकराव्या मजल्यावर होते. हे शहरही चकाचकच आहे. पहिल्याच दिवशी अरबाट स्ट्रीटवर गेलो. या रस्त्यावर वाहनांना बंदी आहे. सर्व तरुण-तरुणी येथे मजेत फिरत असतात- वाद्यां वाजवत असतात, गाणी म्हणत असतात. हा माहौल पाहिला की युरोपात असल्याचा भास होतो.

युक्रेनचे भारतीय विद्यार्थीही इथे शिकायला आले आहेत. काही केरळी विद्यार्थिनी बसमध्ये भेटल्या आम्हाला. भारतापेक्षा मेडिकलचे शिक्षण स्वस्त आहे, ही गोष्ट आपल्याला शोभनीय नाही. इथल्या मेस-सदृश हॉटेलांत जेवण स्वस्त आणि उत्कृष्ट मिळते.

मुलींना विचारलं, ‘‘इथले लोक तुमच्याशी मिळून-मिसळून वागतात का?’’ तर म्हणाल्या ‘‘तसा हा समाज अंतर्मुख आहे. भाषेची समस्याही आहे. त्यांना फक्त कझाक आणि रशियन बोलता येते आणि आपल्याला दोन्ही भाषा येत नाहीत. त्यामुळे आम्ही आमच्या मार्गाने आणि ते त्यांच्या मार्गाने असे जात असतो. कॉलेजात इंग्रजीत शिकवतात. प्राध्यापक कझाकी असतात. आम्ही एकमेकांचं इंग्रजी समजून घेतो.’’

अल्माटीला आम्ही एक दिवसाची टूर घेतली होती. पहाटे पाच ते रात्री अकरा अशा या लांबलचक टूरमध्ये ‘शारिन कॅन्यन’, ‘कोलसाई लेक’ आणि ‘काईंडी लेक’ अशी दोन सरोवरं होती. पहाटे पाच वाजता सांगितलेल्या ठिकाणी पोचायचं होतं. येथे पहाटे साडेपाचलाच सूर्योदय होतो, त्यामुळे चार वाजून २० मिनिटांनी टॅक्सी करायचं ठरवलं. खाली उतरलो तर पक्ष्यांची किलबिल सुरू झाली होती आणि ४.३५ वाजता पोहोचूनदेखील आम्ही मिनीबसमध्ये शेवटी होतो. याचा अर्थ बाकीचे लोक पहाटे चार सव्वाचार वाजता पोहोचले असणार.

शारीन कॅन्यनचा भाग बराचसा लडाखसारखा वाटला. दोन्ही सरोवरं फार देखणी आणि निळ्याशार पाण्याची होती. खूप दूरची हिममय पर्वतशिखरे पाहून या भागास ‘मध्य आशियातील स्वित्झर्लंड’ म्हणतात ते आठवलं. तिथं आम्हाला एक पुणेकर नवतरुण जोडपं भेटलं. त्यांच्याशी बोलताना मजा आली. दुसऱ्या दिवशी आम्ही ग्रीन मार्केट नामक बाजारात एकत्र गेलो.

मला येथील हॉटेलातली व्हिनेगरमध्ये मुरवलेली मिरची आवडली. तिखट नव्हती फार, पण तोंडाला चव आणणारी वाटली. मग बाटली घेतली विकत. या ग्रीन मार्केटमध्ये खरेदीची चंगळ. हॉर्समीट, कॅमलमीटपासून हर तऱ्हेचे भाज्या, सुका मेवा यांचे ढीग लागले होते. येथील दुकानदारांना बरंच हिंदी बोलता येतं. त्यातल्या एकाने तर सुक्या मेव्यातले एवढे पदार्थ चव बघायला दिले की लाजेकाजेस्तव त्याच्याकडून ‘मॅकेडेमिया’ नामक सुका मेवा विकत घेतला. मोठ्या चण्यासारखे दिसले तरी चवीला अगदी छान होते. एरवी मी खरेदी करत सुटते पण या वेळेस या अश्वप्रदेशात मनावर मोठ्ठा ‘लगाम’ घालून ठेवला होता तरी दोन- तीन वस्तू घेतल्याच.

एकूण हा देश सुरक्षित. युरोप- अमेरिका- जपान -थायलंड-मलेशिया फिरून आलेल्यांना नवीन काहीतरी बघण्याची आस पुरी करणारा. इतक्या जवळचा आणि त्यातच ‘व्हिसा-फ्री’सुद्धा. खूप महाग नाही. तरुण मंडळी मध्यस्त टूरशी संपर्क न करता थोडी जुजबी माहिती करून घेत स्वत: देखील ट्रीप आखू शकतात, इतका सोपा.

येथे आपल्या देशातील लोकांनी अधिकाधिक जायला हवं. तिथल्या सार्वजनिक जीवनातील, राहणीमानातील अनेक गोष्टी आपल्याकडेही हव्यात असं त्यांना वाटू लागावं. ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण सर्वांनी झटावं असंच मला या देशाच्या पहिल्या भेटीतून वाटू लागलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

savitadamle@rediffmail.com