महाराष्ट्रातल्या गेल्या दोन हजार वर्षांच्या वास्तुरचना- परंपरेचा रंगीत छायाचित्रांसह आढावा घेतानाच, त्यातून आपण आज काय शिकायचे याचे भान देणाऱ्या; वास्तुरचनांकडे आस्थेने आणि परिसराकडे सहानुभावाने पाहणारे सामान्यजन हे चांगले नागरिकही असतात, याचीही जाण ठेवणाऱ्या द्विखंडात्मक ग्रंथाबद्दलच्या या नोंदी…

‘संकुल’ हा शब्द १९६०/७० च्या दशकांत मराठीत फारसा वापरात नव्हता. महाराष्ट्र औद्याोगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी- स्थापना १९६२) औद्याोगिक संकुलांनाही ‘संकुल’ न म्हणता सरसकट ‘एमायडीसी’सारख्या वाचिक अपभ्रंशानेच ओळखले जाते. या राज्यातल्या वाढत्या शहरांमध्ये ‘गृहसंकुले’ उभारली जाऊ लागली, तेव्हा मात्र हा शब्द थोडाफार रुळू लागला. पण नेमक्या त्यानंतरच्या काळात बदलते अर्थकारण/ मूल्यहीन राजकारण/ अभावानेच आढळणारे समाजकारण यांच्या परिणामी बरेच मराठी शब्द इतिहासजमाच होणार की काय आणि मराठी ही भाषा ‘ज्यांना इंग्रजी शाळा परवडत नव्हती’ त्यांचीच उरणार की काय अशी ‘कॉम्प्लेक्स’ (जटिल) स्थिती उद्भवू लागली आणि मराठीप्रेम केवळ उत्सवी/ इव्हेन्टी अस्मिताकल्लोळ करणाऱ्या अहंगंडापुरते (सुपीरिऑरिटी कॉम्प्लेक्स) उरले. या अहंगंडी अस्मितेला किल्लेसंवर्धन वगैरे धुमारेही तेव्हाच फुटू लागतात; जेव्हा त्यात रूढ सत्ताकारणाची साथ आपल्यालाच मिळणार आणि त्यामुळे जणू आपणच सत्ताधारी असल्याचा आवेश जपता येणार याची खात्री सहभागींना होते. उरलेल्या मराठीजनांना आपली शहरे आताशा बकाल झाल्याचे वाटते, मोठमोठी बंदरे बांधण्याच्या योजनांमध्ये कुठलासा मच्छीमार समाज कोलदांडे घालत असल्याचा प्रचार हा एरवी मराठी अस्मितेच्या बाता (मराठीत गप्पा) करणाऱ्या मुंबईकरांनाही पटू लागला! मुंबईच्या धारावीत फक्त स्वस्त चामडी वस्तू घेणाऱ्या मराठीजनांना, धारावीत जणू काही झाडून सगळे ‘अल्पसंख्याक’च राहातात असे वाटत असते- मग पणत्या, राख्या, तोरणे, पापड, फरसाण आदींचेही उगमस्थान धारावी असू शकते याची गंधवार्ताही न ठेवणारे हे चामडेग्राहक धारावीच्या कथित ‘पुनर्विकासा’च्या वादाकडे साफ दुर्लक्ष करतात- अखलाखच्या बातमीपासून आपणा सर्वांनाच त्याची सवय झालेली असते! -या स्थितीचा आणि ‘महाराष्ट्रातील वास्तुकला- परंपरा आणि वाटचाल’ या द्विखंडात्मक ग्रंथाचा काय संबंध?

संबंध काय, याची थोडक्यात यादी पुढीलप्रमाणे- (१) मराठी भाषेत नवे ज्ञान येऊ शकते, याची ग्वाही हे पुस्तक देते. (२) ‘‘वास्तू- नगररचना- निसर्गरचना… (यांमध्ये) एक आंतरिक दुवा असतो. या सर्वांच्या द्वारे मनुष्याच्या वसाहतींचे आलेखन करण्याचा प्रयत्न घडत असतो’’ ही जाणीव, महाराष्ट्राच्या गेल्या सुमारे दोन हजार वर्षांच्या इतिहासाला साक्ष ठेवून हे पुस्तक देते. (३) महाराष्ट्राची वास्तुरचना- परंपरा म्हणजे काय, ती फक्त लेणी आणि गड/ किल्ले/ दुर्ग यांतच शोधायची की वारली समूहाची घरे हेही महाराष्ट्राच्या लोककेंद्री वास्तुरचनेचे पारंपरिक उदाहरण मानायचे, या प्रश्नांची सोडवणूक हे पुस्तक करते. (४) महाराष्ट्राच्या बहुविध वास्तुरचना- परंपरांची ‘वाटचाल’ पाच-सहा वर्षांपूर्वीपर्यंत जिथवर पोहोचली त्याकडे कसे पाहायचे, याची दृष्टी या पुस्तकाचे दोन्ही खंड देतात. (५) वास्तुरचना- रसग्रहणाच्या माधव आचवलांनी रुळवलेल्या शैलीपेक्षा निश्चितपणे निराळे आणि हा विषय केवळ एकट्यादुकट्या सुंदर वास्तूपुरता सीमित ठेवल्यास ते बाकीच्या असुंदराला सहन/ साजरे करण्यासारखेच ठरेल, अशी टोचणी हे पुस्तक लावते. (६) हे सारे करण्याच्या ओघात, महाराष्ट्राची बांधीव परंपरा तरी निश्चितच या भूमीच्या स्वागतशीलतेची, सहिष्णुतेची ग्वाही देणारी आहे, असा विश्वास परंपरांचा वस्तुनिष्ठ शोध घेणारे हे पुस्तक द्विगुणित करते.

परंपरेविषयी जागरूक असावे, पण नवतेचे प्रश्न माहीत असावेत आणि त्या प्रश्नांवर, समस्यांवर आपण शोधलेल्या उत्तरांमधूनच नवी परंपरा घडणार आहे याचेही भान असावे, हा या (दोन जाडजूड खंडांत विभागलेल्या) पुस्तकाचे प्रमुख संपादक नरेंद्र डेंगळे यांचा आग्रह निव्वळ तोंडदेखला नाही, याचे पुरावे तर या दोन्ही खंडांच्या एकंदर ८२० पानांतून वारंवार मिळत राहातात. डेंगळे यांनी या दोन्ही खंडांना निरनिराळ्या प्रस्तावना लिहिल्या, पहिल्या खंडातल्या विविध विभागांसाठी विषय-प्रवेश आणि लेख-परिचय करून देणारी टिपणे लिहून, या पुस्तकाचे ‘सार्थक’ केले, हे त्यांचे संपादकीय योगदान मोठेच आहे. डेंगळे हे ज्येष्ठ वास्तुरचनाकार, ‘वास्तूचा अनुभव आध्यात्मिकही असावा’ हा ध्यास आजच्या काळात जपण्याचे प्रयोग त्यांनी प्रत्यक्ष साकारले आहेत, इंग्रजीतही डेंगळे यांची दोन पुस्तके आहेत आणि थोर अमूर्तचित्रकार व्ही. एस. गायतोंडे यांच्यावरही लिखाण करण्याची त्यांची क्षमता आहे, असे नरेंद्र डेंगळे या पुस्तकात स्वत:च रोहन शिवकुमार यांच्या ‘सार्वजनिकतेचा शोध घेताना’ आणि जॉर्ज जेरी जेकब व अनिरुद्ध पॉल यांच्या ‘वसई- विरारमधील पारंपरिक लोकसमूहांचे भवितव्य’ या लेखांचा अनुवादही करतात, तेव्हा त्यांची बांधिलकी वास्तूंइतकीच माणसाशी आणि निसर्गाशी आहे, याची साक्ष मिळते. यापैकी रोहन शिवकुमार यांचा लेख हा मुंबईतल्या सार्वजनिक जागांबद्दल मुंबईकरांना काय वाटते, यावर सोदाहरण बोट ठेवणारा आणि त्यातूनही या सार्वजनिक अवकाशाचे भवितव्य कसे राखायचे याची काळजी योग्यरीत्या वाचकापर्यंत पोहोचवणारा आहे, तर वसई-विरारबद्दलचा लेख हा त्या परिसराच्या बाहेरचे (किंवा त्या परिसरात नाइलाज म्हणून हल्ली राहू लागलेले) मराठीजन नेमके कशाकशाकडे दुर्लक्ष करताहेत, याची रुखरुख लावणारा आहे.

वास्तुरचनांचे उपयोगिताकेंद्री हेतू प्रामुख्याने पाच : निवासी, संरक्षण, धार्मिक, संस्थात्मक, पायाभूत सुविधा हे अगदी सहज दिसणारे चार, तर ‘शहरे आणि शेजार’ हा पाचवा. या हेतूंची कधी सरमिसळ होऊ शकते- म्हणजे लेणी किंवा मंदिरसमूह हे धार्मिक तसेच संस्थात्मक (शिकण्या/ राहाण्याची सोय, त्यातून वाटसरूंनाही आसरा इ.) हेतूंसाठी उपयोगी पडू शकत होते. एखादी बारव जरी मंदिर-समूहाचा भाग असली तरी ती पायाभूत सुविधाही होती. या पाच हेतूंची किंवा त्यांच्या सरमिसळीची महाराष्ट्रातली गेल्या दोन हजार वर्षांतली उदाहरणे कोणती, याची ‘कालरेखा’ दुसऱ्या भागाची ६५ टक्के पाने उलटल्यावर दिसते. माहितीचा दृश्य- पट छापील स्वरूपात कसा साकारता येतो, याचा ही कालसूची म्हणजे एक नमुना आहेच. पण त्या कालसूचीत ज्या- ज्या वास्तूंचे उल्लेख आहेत, अशा सर्व वास्तूंची किंवा वास्तुप्रकारांची प्रत्येकी किमान तीन-चार छायाचित्रे आणि तलाविन्यास (म्हणजे आर्किटेक्टचरचा ‘प्लॅन’ – त्यासाठी हा मराठी प्रतिशब्द या पुस्तकात आहे) या दुसऱ्या खंडात येतात. त्या अर्थाने दुसरा खंड हा महाराष्ट्रातल्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूंची नोंद घेणारा, ओळख करून देणारा दृश्य-कोशच आहे. अगदी ‘आमच्या जिल्ह्यातल्या या-या वास्तूंचा समावेश त्यात आहे का? पाहू तरी काय लिहिलंय?’ अशी ओढ लावणाराही आहे. मग या दुसऱ्या भागाचा पहिल्या भागाशी संबंध काय?

दुसरा भाग माहिती देतो आणि ती देतादेता जितके भान देता येईल तितके देतोच. हे भान निर्भीडपणे दिले जाते. उदाहरणार्थ, देशावरल्या (पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक, जळगाव) किंवा क्वचित कोकणातल्याही काही मंदिरांची रचना ही आदिलशाहीत नेहमी आढळणाऱ्या ‘कंदघुमट’ (ओनियन डोम) आहे, किंवा हिंदू देवीच्या एखाद्या मंदिरात तत्कालीन युरोपीय प्रभाव जाणवतो, किंवा हल्लीच्या वास्तूंपैकी एका बड्या उद्याोजकाचा टोलेजंग निवास असलेली इमारत एकापेक्षा अधिक संदर्भात ‘वादग्रस्त’ आहे, हेही दुसऱ्या भागात सांगितले जाते. पण हे सारे आपण का समजून घ्यायचे आहे, एकंदरच वास्तू-परंपरा आणि बांधीव रचनांकडे आपण कसे पाहायचे, याचे ज्ञान पहिला खंड देतो. ‘ज्ञान’ हा शब्द मोठा आहे. तथ्याची/ वास्तवाची/ परिसर्गाची/ शाश्वताची टिकाऊ, पण अनाग्रही आणि विनम्र जाणीव असा ज्ञानाचा अर्थ या पुस्तकाच्या पहिल्या भागाला लागू पडावा. शाश्वत चिरेबंदी नसेलही, याचीदेखील ती जाणीव असू शकते. ही जाणीव पहिला खंड कशी देतो?

‘ऐतिहासिकता’, ‘सौंदर्य, शैली आणि अनुभव’, ‘सार्वजनिकता आणि नैतिकता’, ‘निसर्गाशी नाते’ आणि ‘वस्तुनिष्ठ टिपा’ असे या पहिल्या खंडाचे पाच विभाग आहेत. यातला अखेरचा भाग हा वास्तुरचना तसेच शहरनियोजनासारख्या विषयांशी थेट संबंधित आहेच; पण अन्य भागांची नावे वाचून जर कुणाला ‘याचा वास्तुरचनांशी आणि महाराष्ट्राच्या वास्तुकला परंपरा आणि वाटचालीशी काय संबंध?’ असा प्रश्न पडला, तर (पुस्तक वाचूनच त्याचे उत्तर मिळेल, पण) या प्रश्नाची तुलना शाळा-कॉलेजांतल्या विषयांशी आमच्या भवितव्याचा काय संबंध अशा शालेय/ महाविद्यालयीन किशोर/युवांच्या प्रश्नाशीच करता येईल.

हे दोन खंड म्हणजे ‘ग्रंथरूप ज्ञानसंकुल’ आहे, असे म्हणण्याचे कारणही यातच दडलेले आहे. या ग्रंथाचा ‘खंड दोन’ हा त्या ज्ञानसंकुलातल्या ‘लायब्ररी’सारखा आहे. पण ग्रंथालयातून काय-काय कसकसे वाचायचे, याची दिशा देण्यासाठी विविध विभाग ज्ञानसंकुलात असतात, आंतर-विद्याशाखीय अभ्यासाला गती मिळाली तर त्या ग्रंथालयाचा वापर अधिक चांगला होऊ शकतो. हे दिग्दर्शनाचे आणि शाखा-संगमाचे काम ‘खंड एक’ करतो. ज्ञानसंकुलांत हे काम करणाऱ्या विद्वज्जनांमध्ये कशालाही फार न गोंजारण्याचा निर्भीडपणा असतो, तोही ‘खंड एक’मधल्या लेखांत आहे. किंबहुना अत्याग्रही, अतिप्रेमी आणि त्यामुळे खुलेपणा नाकारणाऱ्या अशा लिखाणाला चारजणांच्या संपादक मंडळाने फाटा दिला असावा, असे लिखाण वाचताना वाटते. (अन्य तीन सहायक संपादक : मीनल सगरे, चेतन सहस्राबुद्धे, पुष्कर सोहोनी) लेण्यांबद्दल इथे प्रकाश पेठे लिहितात आणि वसाहतोत्तर वास्तुरचनेबद्दल हिमांशु बुरटे. पेठे सर्वधर्मीय (बौद्ध, जैन, हिंदू) लेण्यांचा फक्त आढावा न घेता ‘हीनयान काळातील लेणी वास्तुकलेतील ‘मॉडर्न मूव्हमेंट’च्या काळाशी जवळचे नाते सांगतात/’ (पृ.९२) यासारखे – अभ्यासाला चालना देणारे विधान करतात; बुरटे हे चार्ल्स कोरियांच्या कामाबद्दलही प्रश्न उभे राहू शकतात, अशा उल्लेखातून (पृ. १३३-१३४) केवळ शेरेबाजी करत नसून ते ‘मूळ संकल्पन आणि नंतरचे बांधकाम यांच्या प्रेरणांमधील टोकाचा बदल’ हा मुद्दा अधोरेखित करत असतात.

‘आपण लोकांसाठीच हे करायचे आहे’ याची जाणीव या पुस्तकाला आहे- वास्तुरचनाकारांसाठीच नव्हे, तर ज्यांना मराठी वाचता येते, वाक्याचे अर्थ लावता येतात किंवा अर्थ जाणून घ्यावेसे वाटतात अशा सर्वांसाठी हे पुस्तक (शब्दसूचीसह!) आहे. पहिल्या खंडाच्या शेवटच्या लेखातला अखेरचा परिच्छेद ‘‘विकासकांना खूष करण्यासाठी सरकार ज्या प्रकारे एफएसआय वाढवत असते त्याची अजिबातच गरज नाही हे स्पष्ट आहे,’’ असे साधार ठणकावणारा आहे. ‘कार्यकर्ता-वास्तुरचनाकार’ पी. के. दास यांचा हा लेख जणू वाचकाला या पुस्तकातून पुन्हा आजच्या जगात नेऊन सोडतो.

पुस्तक आकळून घेतल्यानंतर मात्र, एका ज्ञानसंकुलातून बाहेर पडलेले आपण जगाकडे पाहात असतो. ‘पुस्तकं परवडत नाहीत’ या सबबीला या दोन्ही खंडांनी अजिबात संधीच दिलेली नाही, हे तर आर्टपेपरवर, संपूर्ण रंगीत छायाचित्रांसह (शासकीय मुद्रणालयातच झालेल्या) देखण्या छपाईच्या या ग्रंथाचे मोठेच लोककेंद्री वेगळेपण!

‘महाराष्ट्रातील वास्तुकला : परंपरा आणि वाटचाल (द्विखंडात्मक)’

प्रमुख संपादक- नरेंद्र डेंगळे

प्रकाशक- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,

पाने- पहिला खंड : ३८८, दुसरा खंड : ४३२

किंमत : ४०७ रुपये (दोन्ही खंड मिळून)

(अभिजीत ताम्हणे यांचे ‘दर्शिका’ हे सदर अपरिहार्य कारणांमुळे आजच्या अंकात नाही.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

abhijeet.tamhane@expressindia.com