‘लोकरंग’मधील (२७ एप्रिल) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘दुसरे तळवलकर’हा लेख वाचला. ज्येष्ठ संपादक गोविंदराव तळवलकर तर जन्मापासून तब्बल बेचाळीस वर्षे डोंबिवलीत राहत होते. कनिष्ठ बंधू मुकुंदासुद्धा त्यांच्याबरोबर होता. गोविंदरावांनी काही काळ गोविंद करसन वाचनालय चालवायला घेतले होते, त्यामुळे मुकुंदाला वाचनाची गोडी लागली.

१९२६ साली शास्त्रीय संगीताचा पुरस्कार करणारी ‘कल्याण गायन समाज’ ही संस्था जवळच्या कल्याणमध्ये स्थापन झाली. डोंबिवलीसुद्धा संगीतात मागे नव्हते. रामभाऊ गाडगीळ यांनी एक शास्त्रीय संगीतासाठी संस्था काढली होती. माणिक वर्मा, मालिनी राजूरकर यांसारख्या गायिका गायला यायच्या. अनेक रविवारी स्थानिक कलावंतांबरोबर मुकुंदा तंबोरा घेऊन मागे बसे. बाजारात जी. एन. जोशी, जे. एल. रानडे, गजानन वाटवे यांची कोणतीही नवीन ध्वनिमुद्रिका आली की फडके रोडवरच्या लिखिते यांच्याकडे ती आणली जायची आणि मुकुंदा आणि इतर दर्दी रसिक तिचा आस्वाद घ्यायचे. काका शरद तळवलकरांनी गोविंदरावांच्या घरी ग्रामोफोन आणि काही तबकड्या आणून ठेवल्या होत्या. त्या ऐकून ऐकून मुकुंदाच्या पाठ झाल्या होत्या. संगीताबरोबरच मुकुंदाचा चित्रकलेचा अभ्यासही जोरात सुरू होता. शिष्यवृती मिळाली होती. जे जे स्कूल ऑफ आर्टच्या १५०व्या वर्षानिमित्त जहांगीरमध्ये एक प्रदर्शन होते, त्यात मुकुंदाची दोन चित्रे होती. प्रसिद्ध झालेलं पहिलं चित्र होतं कवी यशवंत यांचं. ‘लोकसत्ता’, नंतर ‘इंडियन एक्स्प्रेस’मध्ये नियमितपणे चित्रे येऊ लागली. मूळगावकर यांच्या शिफारसीमुळे धर्मयुगमध्ये काम करण्याची आणि मिनिएचर पेंटिंग तसेच व्यक्तिचित्रे काढण्याची संधी मिळाली. कमल शेडगे यांच्या वडिलांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या आर्ट डीपार्टमेंटमध्ये घेतले. ‘इलस्ट्रेटेड विकली’मध्ये चित्रे आणि मुखपृष्ठे करायला मिळाली. शंतनू माळी आणि मुकुंदराव यांच्या चित्र प्रदर्शनाला पुलं (आणि भक्ती बर्वे) आले होते तेव्हा आणि नंतरही अनेकदा गप्पा झाल्या. त्यांनी मुकुंदरावांनी बनविलेल्या गजाननराव जोशी यांच्या तैलचित्राची प्रत मागितली. शंकरराव पाटील यांचे एक व्यंगचित्र मुकुंदरावांनी काढले होते ते ‘पाटीलकी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ झाले. ना. सी. फडके, शंकर वैद्या, सुनीता देशपांडे यांनाही त्यांची चित्रे आवडायची. व्यंकटेश माडगुळकर, डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुस्तकांसाठी चित्रे काढली आणि स्नेह जुळला. नारळीकर अमेरिकेतसुद्धा भेटले. धर्मयुगमधील चित्रे पाहून गुजरातमधील एका बँकेने कॅलेंडरसाठी गीत गोविंद आणि मेघदूत या विषयांवर बारा बारा चित्रे काढून घेतली. जैन उद्याोग समूहासाठी बनविलेली पांडुरंग या विषयावरील चित्रेही गाजली. डॉ. बाळ फोंडके यांच्या संस्थेसाठी दिल्लीला जाऊन दोनदा काम केले.

‘ज्येष्ठांची काळजी’ या डॉ. विश्वास मेहेंदळे संपादित पुस्तकातील चित्रे डॉ. रघुनाथ माशेलकर यांना इतकी आवडली की त्यांनी भर रस्त्यावर एका हातगाडीवर पुस्तक ठेवून त्यावर अभिप्राय लिहिला. मुकुंदरावांनी अनेक चित्रप्रदर्शने भरविली. होतकरू चित्रकारांना प्रशिक्षण देण्यासाठी वर्ग घेतले.

पुण्यात एकदा एका कार्यक्रमाआधी व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण हे सपत्नीक भेटले होते. अर्धा तास गप्पा झाल्या याची त्यांना अजूनही आठवण होती. डोंबिवलीतील पावसाळी खड्ड्यांवरून आणि कचऱ्याच्या ढिगावरून काठी घेऊन उंच उडी मारणे किंवा पोहत खड्डा पार करणे अशी ‘डोंबिवली ऑलिम्पिक’ ही त्यांची व्यंगचित्र मालिका गाजली होती. आम्ही डोंबिवलीत ‘अनवट’ ही संस्था काढली होती. प्रभाकर जोग यांचा व्हायोलिनचा पहिला तीन तासांचा कार्यक्रम आम्ही रूपरेषा ठरवून केला. आमच्या बारा जणांच्या या संस्थेत मुकुंदराव आणि हेमंत टिळक हे दोघे मानद सदस्य होते. ‘लोकसत्ता’च्या एका स्पर्धेत मुकुंदराव, सुरेंद्र बाजपेयी सर आणि मला कल्याण डोंबिवली विभागासाठी परीक्षक नेमण्यात आले. तेव्हा मुकुंदरावांकडून त्यांच्याबद्दल आणि जुन्या डोंबिवलीबद्दल खूप काही कळले. ते अमेरिकेत असले तरी आमचे अनेकदा फोनवर बोलणे होते. सदर लेखही पाठवला. ९७ व्या वर्षीसुद्धा हात न थरथरता ते रेखाटने करू शकतात. ते अमेरिकेत असले तरी मनाने डोंबिवलीत असतात.- माधव जोशी

नंतर ते वाचकांचेही स्नेही होतात

‘लोकरंग’मधील (२७ एप्रिल) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘दुसरे तळवलकर’हा लेख वाचला. या सदरातील लिखाण काळाच्या पटलावर टिकणारे असेच आहे. लेखकाचे स्नेही लेखकापुरतेच सीमित न राहता ते आपसूकच वाचकांचे होऊन जातात. माहीत असलेल्या व्यक्तिमत्त्वाचे नवीन पैलू सांगणे ही तर लेखकाची हातोटीच म्हणावी लागेल. खूप वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या सदरातील दोन मुख्य वैशिष्ट्ये नमूद करावीशी वाटतात. एक म्हणजे, लेखक दर लेखात काही प्रश्न उपस्थित करून जसं की (ये शरद जोशी कौन है?, मोठ्या झाडांचं पुनर्रोपण तसं अवघडच) वाचकांना स्तिमित करतो. वाचकाला त्या प्रश्नांविषयी विचार करायला भाग पाडतो. दुसरी गोष्ट अशी की, प्रत्येक लेखात आभाळाएवढ्या उंचीच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंची ओळख करण्याबरोबरच, त्या व्यक्तिमत्त्वाची इथल्या व्यवस्थेकडून होणारी हेळसांड याविषयी लिहितो. जसं की, किशोरी आमोणकर, यशवंत मोरेश्वर देवस्थळी यांच्या अंत्यसंस्कारावेळी आपण सरकार प्रतिनिधीशी केलेला संपर्क आणि त्यांची त्यांनी दर्शविलेली अनास्था हे वाचून खूप वाईट वाटतं. निदान येणाऱ्या काळात तरी इथलं सरकार अशा काही व्यक्तिमत्त्वांविषयी आदरभाव दाखवेल हा भाबडा आशावाद बाळगूयात.- सागर माने, सातारा

आठवणी जाग्या झाल्या

‘लोकरंग’ (२७ एप्रिल ) गिरीश कुबेर यांच्या ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या सदरातील ‘दुसरे तळवलकर’ हा मुकुंदराव तळवलकर यांच्यावरील लेख वाचनीय आहे. विकास वाचनालय सुरू झाल्यापासून मी सभासद होतो. लेखकाने उल्लेख केलेल्या महंतांचे गाभाऱ्याबाहेरूनच दर्शन घेण्याइतपतच आमची पत होती. प्रा. चंद्रशेखर राजे त्या प्रभावळीत असत. मुकुंदरावांची चित्रे, बंकिम खोपकर यांची नखचित्रे प्रदर्शित होत. श्रीकांत टोळ यांच्याशी गप्पा होत. थोरल्या तळवलकरांबद्दल असलेला आदर आणि अभिमान त्यांच्या गप्पांतून ओसंडत असे. आदर विद्वत्तेबद्दल, तर अभिमान ते डोंबिवलीकर होते याचा. श्रीकांत टोळ हे पत्रकारिताही करत. एक मिशन म्हणून विकास वाचनालय चालवत. एक कटू आठवण म्हणजे त्यांच्यावर झालेला हल्ला. तोही त्यांनी निकराने पचवला होता.- अशोक वि. आचरेकर, मुलुंड

सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व

‘लोकरंग’मधील (२७ एप्रिल) ‘भंगलेले डॉलर स्वप्न’या लेखात रसिका मुळ्ये यांनी अमेरिकेतील शिकणाऱ्या भारतीय मुलांच्या अंधकारमय भविष्याचे वास्तव मांडले आहे. भारतीय विद्यार्थी आणि त्यांचे पालकही चिंताग्रस्त झाले आहेत. बहुतेक लोकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा परिस्थितीत सापडलेल्या सर्व पालकांनी केंद्र सरकारला लक्ष घालण्याची विनंती केली, तर या मुलांचे नुकसान होणार नाही. लेख फार सुंदर व विचार करावयास लावणारा आहे.- श्रीधर भावे, गोरेगाव

विचार करायला लावणारा लेख

‘लोकरंग’ (२७ एप्रिल ) ‘अन्यथा… स्नेहचित्रे’ या गिरीश कुबेर यांच्या सदरातील ‘दुसरे तळवलकर’या लेखामुळे मुकुंद तळवलकर यांच्या विविध पैलूंची माहिती कळली. चित्रकार, नर्मविनोदी बोलणारे, संगीतप्रेमी आणि मितभाषी असे संपन्न, सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व समोर आले. समस्त तळवलकर कुटुंबीय प्रतिभावंतच. गोविंदराव व मुकुंदराव तळवलकर यांचे काका गोपीनाथ तळवलकर हे प्रसिद्ध कवी व लेखक होते. तर दुसरे काका शरद तळवलकर यांनी आपल्या सहजसुंदर विनोदी अभिनयाने एके काळी चित्रपट व नाट्यसृष्टी गाजवली होती.- प्रकाश मुंडले, ठाणे</p>

हे कधी तरी घडणारच होते …

‘लोकरंग’मधील (२७ एप्रिल) ‘ट्रम्पकाळातील होरपळ!’ या अंतर्गत संहिता जोशी यांचा‘अंगाशी येतं त्या काळात’ व रसिका मुळ्ये यांचा ‘भंगलेले डॉलर स्वप्न’ हे दोन्ही लेख वाचले. अत्यंत हळू पुढे सरकणाऱ्या रहदारीला एखादा पर्यायी मार्ग आहे हे ज्यांच्या प्रथम लक्षात येते त्यांना त्याचा फायदा काही काळ जरूर होतो; परंतु नंतर सगळेच त्या मार्गावर गर्दी करतात व तेथेही वाहतूक ठप्प होते हा नेहमीचा अनुभव आहे.

चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी पदवी मिळाली की बँक, एलआयसी, वा एखाद्या सरकारी नोकरीत ‘डकणे’ ही सुरक्षित व सुखकर आयुष्याची हमी मानली जायची. नंतर खासगीकरण आले व तशा सरकारी नोकऱ्याच आटल्या. त्या वेळी माहिती तंत्रज्ञानाने बाळसे धरले व सर्वांनी त्याकडेच मोर्चा वळवला. शेकडो खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे व हजारो विद्यार्थ्यांचे उखळ पांढरे करून झाल्यावर तिथेही रिकामे वर्ग व बेकारी वाढू लागली. त्याच काळात जागतिकीकरण जोरात असल्यामुळे सुरक्षित व सुखकर आयुष्य मिळवण्याचा राजमार्ग परदेशी शिक्षण, एच १ व्हिसा, ग्रीनकार्ड असा झाला. हा राजमार्ग निवडू शकणाऱ्या आणि परवडणाऱ्या भारतातील वर्गाचा आकार आयटी व जागतिकीकरणामुळेच खूप वाढला. भारतीय विद्यार्थ्यांना ‘एमएस’सारख्या अभ्यासक्रमात भरमसाठ शुल्क आकारून प्रचंड संख्येने प्रवेश देणे हा परदेशी विद्यापीठांकरता उत्तम ‘धंदा’ ठरला; परंतु विद्यार्जनापेक्षा अर्थार्जन व परदेशी नागरिकत्व हाच त्या विद्यार्थ्यांचा हेतू होता. उत्तम धंदा म्हणून अशा लाखो विद्यार्थ्यांना महागडे शिक्षण देणे सोपे असते, पण त्यांना नोकऱ्या देऊन समाजात सामील करून घेणे सोपे नसते. त्याचे परिणाम कधीतरी दिसणारच होते. ट्रम्प यांनी ‘मागा’ धोरणाचा बराच गाजावाजा करून अधिकृत-अनधिकृत परदेशी नागरिकांवर, विद्यार्थ्यांवर कारवाई सुरू केली असली तरी बायडेन यांनी गवगवा न करता तेच केले होते असे लेखातही म्हटले आहेच.

परदेशी जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले म्हणून ‘बच्चा खूश’, बच्चा रीतसर मार्गी लागला म्हणून ‘बच्चेका बापभी खूश’, उत्तम धंदा चालू आहे म्हणून परदेशी महाविद्यालयेही खूश, अशी (शेअर बाजारातील बुडबुड्यासारखी) ‘आनंदी आनंद गडे’ स्थिती कायम राहत नाही. त्यामुळे जे आता घडते आहे ते कधीतरी घडणारच होते असे वाटते.- प्रसाद दीक्षित, ठाणे

पालकांचेही स्वप्न उद्ध्वस्त

‘लोकरंग’मधील (२७ एप्रिल) ‘भंगलेले डॉलर स्वप्न’ हा रसिका मुळ्ये यांचा लेख वाचला. आता भारतीय बँकादेखील अशा मुलांना शैक्षणिक कर्ज देतात, कारण हेच विद्यार्थी त्यांचे ग्राहक असतात. पण आता त्याच विद्यार्थ्यांची अमेरिकेतून पाठवणी होत असेल तर त्याचा परिणाम बँकांवरही होणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. इतकेच नव्हे तर अमेरिकेच्या भरवशावर इथल्या मोठमोठ्या शैक्षणिक संस्था अभ्यासक्रम घेऊन इथल्या नव्या पिढीतील मुलांना उपयुक्त ठरू शकतील असे धोरण राबवत आहेत; पण त्यावरदेखील आता पाणी पडले आहे. ट्रम्प यांच्या धोरणामुळे तरुण भारतीय मुलांचेच नाही तर अनेक पालकांचेही स्वप्न एका क्षणात उद्ध्वस्त झाले आहे.- सुनील समडोळीकर, कोल्हापूर</p>

ग्रंथालयाचे व्यवस्थापन कळले

‘लोकरंग’मधील (२७ एप्रिल) ‘बालमैफल’ सदरातील रणजित धर्मापुरीकर यांची ‘ग्रंथालयाची सफर’ ही गोष्ट वाचली. लेखकाने ग्रंथालयाच्या व्यवस्थापनाची उकल गोष्टीतून सविस्तरपणे केली आहे. नवीन कोणी मूल जेव्हा पहिल्यांदा ग्रंथालयात जाईल त्याला चाचपडावे लागणार नाही. ग्रंथालयाचे व्यवस्थापन आजोबांनी अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगितले आहे.- मॅटिल्डा डिसिल्वा, वसई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खुमासदार शैली आणि खोचक भाषा

‘लोकरंग’मधील (२७ एप्रिल) ‘अंगाशी येतं त्या काळात’ हा संहिता जोशी यांचा लेख वाचला. खुमासदार शैली आणि काहीशी खोचक भाषा यामुळे लेख मनोरंजक झालेला आहे. पण त्यात जो गंभीर मुद्दा उपस्थित केलेला आहे तो मनाला जास्त भिडला.- स्वाती अमरीश