माणसाच्या जगण्यात साहित्याचं प्रयोजन काय किंवा कलेचं प्रयोजन काय, उत्तम साहित्य-कला कशाला म्हणायचं, यावर आजवर अगणित पानं खर्ची पडलीत. मराठी मध्यमवर्गाला मात्र या सर्वांचं आकलन एकाच व्यक्तिमत्त्वानं सहजरीत्या करून दिलं. पंचवीस वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्रात सर्वच पातळ्यांवर असामान्य वकुब असलेल्या असामींमध्ये पु. ल. देशपांडे अग्रस्थानी होते. अभिनय, संगीत, विनोदकारी आणि किती प्रांतांत त्यांचा दबदबा राहिला ते सांगताना दोन-तीन पिढ्या विशेषणसमृद्ध झाल्या. त्यांच्यापश्चात त्यांच्या उत्तुंगतेच्या जवळपासदेखील कुणी पोहोचलेलं दिसत नाही. पुलंचा ऐंशी वर्षांचा कालखंड राजकीय- सामाजिक- सांस्कृतिक बदलांच्या संदर्भात ज्या वेगानं पुढे सरकत गेला, तितकाच वेग बहुधा २००० ते २०२५ या पंचवीस वर्षांच्या काळाला आहे. त्यानिमित्तानं पुलंचं नसणं म्हणजे काय, याच्या शोधाबरोबर त्यांच्या विनोदशैलीत आजच्या विनोदकाराची गोष्ट…
कोणत्याही सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक अथवा कसल्याही ‘इक’ अगर ‘इय’ प्रत्ययांत चळवळीपासून दूर राहायचे नाही हा बटाट्याच्या चाळीचा निर्धार. त्यामुळे संपूर्ण मुंबईभर जेव्हा जुन्या चाळी तसेच दोन-तीन मजल्यांच्या चाळवजा इमारती पाडून त्याजागी टोलेजंग चकचकीत बिल्डिंगा बांधण्याचं पेव फुटलं; तेव्हा सामाजिक बदलाप्रति अतिसंवेदनशील असलेली बटाट्याची चाळ या रिडेव्हलपमेंट म्हणवल्या जाणाऱ्या सामाजिक स्थित्यंतरापासून दूर राहणं शक्यच नव्हतं. सदा उत्साही राघूनाना सोमणांच्या पुढाकाराने बटाट्याच्या चाळीच्या मधल्या अंगणात साठही बिऱ्हाडांची एक जाहीर सभा बोलावण्यात आली. याप्रसंगी नेहमीप्रमाणे आचार्य बाबा बर्वे यांनी भारतीय वास्तुविशारद आणि संगीत याचा तौलनिक अभ्यास या विषयावर भाषण ठोकले आणि परंपरेप्रमाणे त्यांचे गाणे चालू करताच सर्वांनी त्यांना जबरदस्तीने खाली बसविले.
आपली बटाट्याची चाळ अजून सुस्थितीत असली तरी ती जुनी झाली आहे. गेल्या वर्षीच तिला धोकादायक इमारत म्हणून म्युनिसिपालिटीची नोटीसही आलेली आहे, अशी माहिती राघूनाना सोमणांनी दिली. एच्च मंगेशरावांच्या आवाजातील गाण्यांचा, त्यांच्या तबल्याचा आणि वरदाबाई हट्टंगडीच्या क्लासिकल डान्सचा (विशेषत: लॉकडाऊन काळात त्यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन झुंबा डान्स क्लासेसचा) धसका घेतला नसता, तर चाळ अजून वीसेक वर्षे ठणठणीत राहिली असती, याबाबतीत एच्च मंगेशराव कुटुंबीय सोडून उर्वरित चाळीचे एकमत होते. आजूबाजूच्या सगळ्या चाळी रिडेव्हलपमेंटला जाऊन तिथे दहा-वीस मजल्यांच्या इमारती उभ्या होत आहेत, आपणदेखील काळासोबत चालायला पाहिजे, चाळीचं रिडेव्हलपमेंट करून अपग्रेड व्हायला पाहिजे, फ्लॅट संस्कृतीत जायला पाहिजे यावर सगळ्या चाळकऱ्यांचे एकमत झाले.
भाऊ भंडारीचा स्कूल-ड्रॉपआऊट असलेला पोरगा मुकुंदा छोटा-मोठा कॉन्ट्रॅक्टर झाला होता. कोकणातील गावी एक गुरांचा गोठा, मुंबईत काही जुन्या चाळीत डागडुजीचे काम आणि एक सार्वजनिक शौचालय बांधण्याचा दांडगा अनुभव त्याच्या गाठीशी होता. या अनुभवाच्या जोरावर चाळीच्या रिडेव्हलपमेंटचे काम आपल्यालाच मिळायला हवे असा त्याचा आग्रह होता. एका खाजगी कंपनीत कॅन्टीन चालविणाऱ्या कुशाभाऊ अक्षीकरांनी आपल्याला व्यवसायाचा अनुभव आहे. म्हणून चाळीच्या रिडेव्हलपमेंटचे काम आपल्यालाच मिळायला हवे अशी इच्छा व्यक्त केली. सध्या संयुक्त चाळीची मालकी असलेले मेढे-पाटील आणि जानकी दुलारे तिवारी यांना मालक या नात्याने स्वत:च चाळीचे रिडेव्हलपमेंट करायचे होते. अण्णा पावशेच्या मते, इमारत बांधणे हे दुय्यम काम असून त्यासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळविणे महत्त्वाचे काम आहे. पावशे स्वत: म्युनिसिपालिटीत सीनियर क्लार्क असल्याने त्यांना सगळ्या अधिकाऱ्यांचे रेटकार्ड आणि देण्याघेण्याचे मार्गही ठाऊक आहेत, त्यामुळे तेच या कामासाठी सर्वथा योग्य आहेत.
द्वारकानाथ गुप्ते यांच्याकडे समस्त मराठी वर्तमानपत्रांचे अग्रलेख वाचण्याचा आणि नॅशनल चॅनेलवरील डिबेट पाहण्याचा अनुभव असल्याने, त्यांनी ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’चा मुद्दा काढून चाळीचे भागीदार असणाऱ्या कुणालाच चाळीच्या रिडेव्हलपमेंटचे काम देता येणार नाही असा वकिली पॉइंट काढला. ‘कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट’चा नक्की अर्थ काय हे वरीलपैकी एकालाही ठाऊक नसल्याने त्यांनीही आपापल्या तलवारी म्यान केल्या. मग सर्वानुमते बाहेरच्या अनुभवी बिल्डरला रिडेव्हलपमेंटचे काम देण्याचे ठरले. बिल्डर फायनल करण्यासाठी, त्याच्याशी वाटाघाटी करण्यासाठी आणि त्यानंतर इमारतीच्या बांधकामावर आणि प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी सात सदस्यांची एक बांधकाम समिती नेमण्यात आली. श्रीयुत सोकरजीराव त्रिलोकेकर यांनी गेल्या वर्षीच आपल्या घरात मोरीला टाइल्स मारण्याचे सिव्हिल वर्क केलेले असल्याने त्यांना बांधकाम समितीचे अध्यक्ष नेमण्यात आले.
हेही वाचासंदूक : दौरा वि. टूर.. नाटके जगभर नेताना…
अण्णा पावशांनी बांधकाम समितीतील प्रत्येकाची कुंडली मांडून योग्यायोग्यता ठरविली होती. त्याबद्दल ते विशेष बोलले नाहीत. ‘योग्य प्रसंगी सांगेन’ म्हणाले. अण्णांच्या ज्योतिषाचे हे वैशिष्ट्य आहे- ते उगाच वारेमाप भविष्य वर्तवीत नाहीत. एखादं काम बिघडलं की मगच ते ‘तरी मी सांगत होतो’ असं म्हणत आपण लिहून ठेवलेलं भविष्य काढून दाखवीत असत.
आचार्य बाबा बर्वे म्हणजे नारूच्या बाबांना चोवीस भाषा येत असल्याचं त्यांचं म्हणणं असलं, तरी पैशाची भाषा त्यांना फारशी अवगत नाहीये हे ओपन सिक्रेट आहे. आपण सुरुवातीपासूनच बिल्डरला धाकात ठेवलं तर बिल्डर आपल्याला फसवण्याचा विचारदेखील करणार नाही, असे समितीतील बहुसंख्य सभासदांचे मत होते. पण जुन्या काळात एकदा एक दिवसासाठी तुरुंगात जाऊन देशभक्त म्हणून शिक्का मिळविलेला असल्याने, अन्याय होण्याआधी अन्यायाविरुद्ध आवाज उठविल्यास आपल्याला आपला देशभक्तीचा पासपोर्ट ‘रिन्यू’ करता येणार नाही असा विचार करून बाबा बर्व्यांनी या विषयावर नेहमीप्रमाणे मौन पाळणेच पसंत केले.
आपण लिहिलेल्या चाळीच्या इतिहासावरून बटाट्याच्या चाळीची एक ‘डॉक्युमेण्ट्री’ बनवावी. त्याचे लेखन-दिग्दर्शन आपणच करावे आणि नवीन सोसायटीच्या उद्घाटनाच्या वेळेस आपल्या डॉक्युमेण्ट्रीचा प्रीमियर शो करावा अशी बाबूराव खऱ्यांची इच्छा होती. या बाबूराव खऱ्यांच्या इच्छेला सगळ्या समिती सदस्यांनी होकारार्थ माना डोलावल्या. पण या कामासाठी लागणारे पाच लाख रुपये सोसायटीच्या कॉर्पस फंडातून देण्यात यावेत अशी खऱ्यांनी मागणी करताच ‘वैयक्तिक खाज भागविण्यासाठी सोसायटीचा निधी वापरता येणार नाही’ अशी स्पष्ट भूमिका प्रा. नागूतात्या आढे यांनी मांडली व समितीने ती लगेच उचलून धरली. आपली योजना बारगळल्याच्या दु:खापेक्षा आपल्या पॅशनला या मास्तुरड्याने खाज म्हटल्याचे बाबूराव खऱ्यांच्या काळजाला अधिक झोंबले.
बांधकाम समितीने रीतसर निविदा मागवून प्रस्तावित इमारतीची रचना, वापरले जाणारे तंत्रज्ञान, दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा आणि सार्वजनिक जागा, प्रत्येक भागधारकाला मिळणारे जास्तीचे क्षेत्रफळ, बांधकामादरम्यान चाळकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था, दरमहा मिळणारे भाडे, सोसायटीला मिळणारा कॉर्पस फंड, इमारत पूर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी इत्यादी गोष्टी विचारात घेऊन सर्व निविदाधारक बिल्डरांशी स्वतंत्र मीटिंग करून समितीने एकमताने मेहता बिल्डर्सच्या ‘दि स्वीट होम कंस्ट्रक्शन’ कंपनीला रिडेव्हलपमेंटचे काम देण्याचा निर्णय घेतला. मध्यंतरी झालेल्या नोटबंदीमुळे रोखीत व्यवहार करणाऱ्या देशभरातील बांधकाम व्यावसायिकांना मोठाच फटका बसला होता. सत्ताधारी पक्षाशी आणि शासकीय अधिकाऱ्यांशी सलगी असल्यामुळे मेहता बिल्डर्स मात्र आपल्याकडील सगळा काळा पैसा अधिकृत करण्यात यशस्वी झाला; आणि त्याच्या एकाही प्रकल्पाला नोटबंदीचा फटका बसला नाही. मेहता बिल्डर्सच्या याच क्वालिफिकेशनमुळे त्याला बटाट्याच्या चाळीच्या रिडेव्हलपमेंटचे काम मिळणे सोपे झाले. समितीतील बहुतेक सदस्यांनी एकेकट्यांनी या निविदा भरणाऱ्या बिल्डरांशी गुपचूप मिटिंगा करून आपल्याला या व्यवहारात काही तोडपाणी करता येते का याची चाचपणी केली असल्याचीही वदंता आहे. पण या व्यवहारात सगळ्यांच्याच डाव्या अंगठ्याला निळी शाई लागलेली असल्याने याबाबत अळीमिळी गुपचिळीचे धोरण अवलंबिण्यात आले आहे.
सुरुवातीला, बटाट्याच्या चाळीच्या जागेवर एकच प्रशस्त इमारत बांधण्याचा प्रस्ताव होता. परंतु त्या नवीन इमारतीत मांसाहारावर बंदी असेल असा पवित्रा मेहता बिल्डरने घेतल्याने चाळकऱ्यांनी त्या प्रस्तावाला विरोध केला. मग चाळकऱ्यांसाठी दहा मजल्यांची एक इमारत बांधून देण्यात येईल व उर्वरित एफएसआय मधून शेजारीच तीस मजल्याचा टॉवर बांधण्यात येईल. त्या टॉवरमधील सदनिका कुणाला विकायच्या आणि कुणाला नाही याचा अधिकार मेहता बिल्डर्सकडे राहील असे मंजूर करावे लागले.
प्रा. कल्पकता फुलझेले यांनी आपले काव्य, खेळ, शिवणकला, चित्रकला यातील प्रावीण्य लक्षात घेऊन आपल्याला कलाकार कोटा म्हणून इतरांपेक्षा दीडपट क्षेत्रफळाचा फ्लॅट मिळण्याची केलेली मागणी मेहतांच्या मॅनेजरने तात्काळ फेटाळून लावली. त्या मॅनेजरला भाईसाहेब चौबळांची फूस असल्याचा प्रा. कल्पकता फुलझेले यांचा वहीम होता. नंतर काही वेळाने जेव्हा आपल्या चाळीच्या खोलीला आपण अनधिकृतपणे वाढविलेली गॅलरी आणि पोटमाळा विचारात घेऊन आपल्याला नवीन बिल्डिंगमध्ये ज्यादा चटईक्षेत्राचा फ्लॅट मिळावा अशी भाईसाहेब चौबळांची मागणी मेहता बिल्डरने धुडकावून लावली तेव्हा प्रा. कल्पकता फुलझेले भर सभेत चीयर लीडरच्या थाटात आनंदाने नाचल्या.
चाळीच्या जिन्याखाली आपलं इस्त्रीचं दुकान थाटलेल्या रामा बाळू मालवणे यांस नवीन इमारतीत तळमजल्यावर दहा बाय दहाचा गाळा देण्यास सर्वांनी संमती दर्शविली तेव्हा रामा कृतज्ञतेने भावनाविवश झाला होता. याच न्यायाने चाळीत पोटभाडेकरू म्हणून राहून तिथेच पंक्चरचे दुकान चालविणाऱ्या अब्दुललादेखील एक गाळा मिळायला हवा असे मत प्रा. नागूतात्या आढ्यांनी मांडले, त्यावर चाळीतील नव्या दमाच्या देशभक्तांनी अब्दुलला रोहिंग्या आणि नागूतात्यांना अर्बन नक्सल ठरवून या मताला जोरदार विरोध केल्याने जिवाच्या भीतीने नागूतात्यांनी आपला प्रस्ताव मागे घेतला. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या बाहेरील असहिष्णू वातावरणाचा आपल्या चाळीतील नवीन पिढीवरील वाढता प्रभाव पाहून चाळीतील सुलेमान शेखच्या एकमेव मुस्लीम कुटुंबाने बिल्डरकडून फ्लॅटऐवजी पैसे घेऊन मुंब्य्राला आपल्या भाईबंदांजवळ घर घेण्याचा निर्णय घेतला होता. गोयंकार फर्नांडिसचे किरिस्तांव कुटुंब मात्र अद्याप भावी सदनिकाधारकांच्या यादीत टिकून होते.
इमारतीसाठी लागणाऱ्या खिडक्या-दरवाजे इत्यादींचे कंत्राट आपल्या भावाला मिळावे म्हणून रूपाबाई समेळ यांनी मेहता बिल्डरच्या मॅनेजरशी टेबलाखालून सेटिंग केल्याचे चाळीतील पोरांनी द्वारकानाथ गुप्ते यांना कळवल्यावरही त्यांनी काहीच अॅक्शन घेतली नाही. यावरून गुप्त्यांची समेळांशी काही सेटिंग असल्याचाही चाळीतील तरुण वर्गाला संशय आहे.
‘‘गॅलरीचा एरिया तुमच्या एफएसआयमध्ये धरला जातो आणि त्यावर महापालिकेला प्रॉपर्टी टॅक्स द्यावा लागतो, त्यामुळे प्रस्तावित इमारतीत आपण गॅलऱ्या नको करू या,’’ असं मेहता बिल्डरचं म्हणणं होतं. पण आयुष्यभर चाळीच्या गॅलरीत उभं राहून सकाळच्या मशेरीपासून रात्रीच्या शेवटच्या जांभईपर्यंत इतरांच्या खोल्यांत, संसारात अन् आयुष्यात डोकावण्याची सवय जडलेल्या समस्त चाळकऱ्यांना नवीन इमारतीत प्रत्येक फ्लॅटला निदान एकतरी गॅलरी हवीच होती. त्यासाठी बेडरूम किंवा हॉलचा आकार थोडासा कमी झाला तरी त्यांची हरकत नव्हती. चाळकऱ्यांच्या गॅलरीच्या या अट्टहासात केवळ भूतकाळाचा नॉस्टॅलजिया नसून, कधी आपलं देशप्रेम सिद्ध करण्याची गरज भासलीच तर टाळ्या-थाळ्या वाजविण्यासाठी प्रत्येकाकडे आपापली गॅलरी असायला हवी, असा भविष्यलक्षी विचारदेखील असल्याचे स्पष्ट झाल्यावर मेहता बिल्डरने प्रत्येक फ्लॅटधारकाला घरटी एक गॅलरी देण्याचे कबूल केले.
कालपर्यंत आपल्या आई-बापांना हाडुत-हुडुत करणारी चाळीतील तरुण पोरं चाळ रिडेव्हलपमेंटला जाणार आणि आपल्याला सध्याच्या खोलीच्या दुप्पट आकाराचा सेल्फ-कंटेन्ड फ्लॅट मिळणार, नवीन इमारत तयार होईस्तोवर दुसरीकडे राहण्यासाठी दरमहा रोख तीस हजार रुपये मिळणार आणि दहा लाख रुपये एकरकमी मिळणार हे कळल्यापासून एखाद्या नोकरी करणाऱ्या इंजिनीयर नवऱ्याने आपल्या डॉक्टर बायकोला वागवावे तशा सन्मानाने आपल्या आई-बापाला वागवू लागली. नवीन बिल्डिंग तयार होईपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याच्या कल्पनेने सगळे चाळकरी भावुक झाले होते. दोनेक वर्षांनी नवीन बिल्डिंग तयार होईल तेव्हा फ्लॅटधारकांत हेच प्रेम, हाच जिव्हाळा राहील का, याबद्दल सगळेच साशंक होते. चाळ जमीनदोस्त केल्यावर सोसायटीचे प्रत्यक्ष काम सुरू झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंतच्या दोन वर्षांच्या काळात चाळकरी वेगवेगळ्या राहण्याच्या ठिकाणी विखुरलेले असल्याने, त्यांच्या प्रत्यक्ष भेटी कमी होत असल्या तरी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून शुभेच्छा, सद्भावना, टोमणे, प्रेम, द्वेष, असूया अशा भावभावनांचे व्हर्चुअल आदानप्रदान सुखेनैव सुरू होते. या काळात त्यांच्यात जो काही संवाद, विसंवाद, प्रेम, भांडणे, लढाया, तह झाले ते सर्व व्हॉट्सअॅप ग्रुपवर झाले.
इमारतीच्या मधल्या मोकळ्या भागात एक छोटंसं मंदिर बांधावं, की ती जागा मुलांना खेळण्यासाठी मोकळी ठेवावी यावर दोन गटांत खडाजंगी झाली. ज्यांना गल्लीतला नगरसेवकदेखील ओळखत नाही असे लोकही राष्ट्रीय पक्षांचे कट्टर कार्यकर्ते होऊन दिल्लीतल्या पक्षनेत्यांसाठी शेजारच्या खोलीत राहणाऱ्या इसमाच्या मातोश्रींबद्दल अपशब्द काढू लागले.
एखाद्याचं म्हणणं नाही पटलं तर त्याला थेट चाळद्रोही ठरवून भावी सोसायटीतून हाकलून द्यायच्या वल्गना होऊ लागल्या. चाळीतून फ्लॅटमध्ये जायच्या आधीच अनेकांनी आपले मनाचे दरवाजे शेजाऱ्यांसाठी कायमचे बंद करून टाकले. आश्चर्याची बाब म्हणजे, मेहता बिल्डर हा बिल्डर जमातीला कलंक मानला जावा इतका शब्दांचा पक्का निघाला. वचन दिल्याप्रमाणे त्याने चोवीस महिन्यांत बिल्डिंग उभी करून दिली. नवीन बिल्डिंगच्या नावाव्यतिरिक्त एकाही गोष्टीवरून चाळकऱ्यांचा बिल्डरशी (छोट्या कुरबुरी सुरूच असल्या तरी) मोठा वाद झाला नाही. सोसायटीच्या नावाच्या बाबतीत मात्र दोन्ही पक्षांत तीव्र मतभेद होते.