पंकज घाटे
त्र्यं. शं. शेजवलकरांनी शंभर वर्षांपूर्वी रियासतकार गो. स. सरदेसाई यांच्या ‘नानासाहेब पेशवे’ या ग्रंथाला लिहिलेली प्रस्तावना एका अर्थी शेजवलकरांच्या मराठेशाहीवरील विस्तृत भाष्याचा बीजलेख मानता येतो. सरदेसाईंचा ग्रंथ १९२६ साली प्रकाशित झाला असला तरी त्याची प्रस्तावना २५ मे १९२५ रोजी लिहून झाली. त्या प्रस्तावनेला नुकतीच शंभर वर्षं पूर्ण झाली

साधारणपणे, अव्वल ब्रिटिश काळात इंग्रजी शिक्षण घेतलेल्या दुसऱ्या पिढीनंतर महाराष्ट्रात इतिहास या अभ्यास विषयाला चालना मिळाली. इतिहासाच्या जोडीला अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, साहित्य अशा विषयांचा अभ्यास नव्या पिढीनं सुरू केला. ग्रँट डफनं सर्वप्रथम मराठ्यांचा संगतवार इतिहास लिहिल्यानंतर त्याची चिकित्सा करण्यासाठी जवळपास चाळिसेक वर्षांचा काळ लोटला. ते करताना, तुटपुंज्या ऐतिहासिक साधनांच्या आधारे न्यायमूर्ती म. गो. रानडे यांनी मराठ्यांच्या उत्कर्षाची मीमांसा केली. त्यातला संतांच्या कामगिरीचा युरोपातल्या प्रोटेस्टंट पंथाच्या विचारसरणीशी जोडलेला भाग वगळता, इतर भाग बहुतांश महाराष्ट्रीय लेखकांना मान्य झाला.

न्या. रानड्यांच्या अकाली निधनामुळे त्यांना मराठेशाहीच्या अपकर्षाचं विवेचन पूर्ण करता आलं नाही. पुढे वि. का. राजवाडे यांनी आपल्या प्रतिभेनं त्यासंबंधीचं भाष्य करून इतिहासाचं ते गुपित मराठी जनांना उलगडून सांगितलं. मराठ्यांच्या इतिहासाची मीमांसा करणारे जे अभ्यासक यानंतरच्या पिढीत आले, त्यात इतिहासकार त्र्यंबक शंकर शेजवलकर हे नाव विशेष उल्लेखनीय आहे. राष्ट्रोद्धारासाठी इतिहासाचा आधार घेऊन केलेली मांडणी हा या जुन्या पिढीच्या इतिहासकारांचा एक विशेष म्हणता येईल. पारतंत्र्याच्या काळात पराभूत मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी अस्मितेची आणि आत्मस्मृतीची आवश्यकता भासत होती. इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकरही त्याच पठडीतले. गुलामगिरीत सापडलेल्या मराठी जनांची आजची थंड झालेल्या गोळ्यासारखी, दयनीय स्थिती का झाली असा प्रश्न शेजवलकरांना पडला. याचा तपास करताना, त्यांना नजीकच्या भूतकाळात त्याची बीजे मिळतील, असं वाटून ते ब्रिटिश काळाला जवळ असणाऱ्या मराठ्यांच्या व त्यांच्या समकालीन मुसलमानांच्या इतिहासाकडे वळले. विद्यार्थिदशेपासून त्यांनी राजनीतिशास्त्र, समाजशास्त्र, जुने अर्थशास्त्र, भूगोल, युद्धशास्त्र, इतिहासशास्त्र आणि इतिहासाचं तत्त्वज्ञान यांसारख्या अनेकविध विषयांचा सखोल अभ्यास केला. याच्या जोडीला त्यांनी युरोपीय आणि आशियाई प्रदेशांच्या इतिहासाचं बारकाईनं परिशीलन करून त्या संस्कृतीच्या उदयास्ताचं मनन केलं. यातून त्यांची जी वैचारिक बैठक तयार झाली त्यातून मराठेशाहीच्या इतिहासावरचं भाष्य जन्माला आलं.

शेजवलकरांनी आपल्या व्यासंगाच्या मानाने अगदी मोजकं लिखाण केलं. बीए झाल्यानंतर पुढे ‘प्रगती’ नियतकालिकाचे संपादक होईपर्यंत त्यांनी अन्य कोणतंही लिखाण केलं नाही. या काळात त्यांचं भारत इतिहास संशोधक मंडळात येणं-जाणं सुरू होतं. यातून त्यांचा रियासतकार सरदेसाईंशी परिचय वाढला. या दरम्यान, रियासतकारांनी कर्नाटक प्रेससाठी नानासाहेब पेशव्यांवर पुस्तक लिहिणं कबूल केलं होतं. पण त्यांना ते लिहिण्यास वेळ होत नव्हता. तेव्हा त्यांनी नानासाहेबांसंबंधी मजकूर असलेल्या रियासतीचे दोन भाग देऊन तो मजकूर शेजवलकरांना संकलित करण्यास सांगितलं. शेजवलकरांना सरदेसाईंची अनेक मतं, चरित्राची कल्पना मान्य नव्हती. तरीही त्यांनी ते काम पत्करून सरदेसाईंनी हे चरित्र लिहिल्याचा आभास निर्माण करून काम पूर्ण करून दिलं. रियासतकारांनी अत्यंत उमदेपणाने या तिशीच्या तरुणाकडून त्याची उघड मतभिन्नता व्यक्त करणारी प्रस्तावना लिहून घेतली. त्या काळात हे नवल ठरलं. प्रस्तावना प्रसिद्ध होताच शेजवलकर मराठेशाहीचे साक्षेपी भाष्यकार म्हणून पुढे आले.

‘ग्रंथकारापेक्षा जरा जास्त उंचीवर चढून, जरा खोल बुडी मारून मराठ्यांच्या इतिहासाचा पट डोळ्यांसमोर आणणे व त्याचा ठाव घेणे’ या दृष्टीनं शेजवलकरांनी सदर प्रस्तावनेत इतिहासाची छाननी केली. पुढच्या तीन तपांमध्ये या त्यांच्या भाष्याचा क्रमाक्रमाने विस्तार होत गेला. इतिहासाचा वास्तविक उपयोग शहाणपणा शिकणे हा आहे, असं मत सांगून त्यांनी ऐतिहासिक विवेचन सुरू केलं. सरदेसाई नानासाहेब पेशव्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या खालोखाल समजत होते. मात्र, शेजवलकरांनी त्यांच्या काळातील मराठा राज्याच्या वाढीचं श्रेय अन्य मराठा सरदारांना दिलं आहे. मराठेशाहीत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपवाद वगळता खऱ्या अर्थानं मुत्सद्दी कोणीच नव्हता, असा त्यांचा विचार होता. जे अजस्रा यंत्र शिवाजी राजांनी चालू केलं त्याचा अंतस्थ जोरच एवढा होता की, ते काही काळ मूळ वेगावर चाललं. यात वेग उत्पन्न करण्यासाठी जो कोळसा वेळोवेळी पुरवला पाहिजे, तेही कोणाकडून झालं नाही. शेजवलकरांनी ही मांडणी नव्यानं केली असं नाही. खुद्द राजवाडे, सरदेसाई, वासुदेवशास्त्री खरे यांनी त्यांच्या लिखाणातील मुद्दे वेगवेगळ्या ठिकाणी आधी मांडले होते. शेजवलकरांनी उपलब्ध साधकबाधक पुरावे आणि प्रत्येक प्रकरणाच्या अनेक बाजू जागरूकपणे समोर ठेवत एखाद्या कुशल वकिलाप्रमाणे त्यांची फेरमांडणी केली.

जगाच्या इतिहासात जे क्रांतीचे काळ अनेक शतकांनी येतात, त्या काळाच्या टप्प्यावर नानासाहेब उभे होते. मुत्सद्देगिरी दाखवण्यास अत्यंत अनुकूल काळ, परिस्थिती लाभूनही नानासाहेबांनी शिवाजी राजांचा मार्ग सोडून देत ती संधी गमावली. हे सांगताना शेजवलकरांनी त्या काळच्या मराठी नेतृत्वाच्या अकर्तृत्वाचा पाढा वाचला. अठराव्या शतकात, सिंधू नदीच्या पलीकडे काबूल-कंदाहार प्रदेश लष्करीदृष्ट्या हिंदुस्थानवर स्वामित्व असणाऱ्या सत्तेच्या ताब्यात असावयास हवा, तरच हिंदुस्थानचं रक्षण शक्य होतं. औरंगजेबापर्यंत मुघलांचा अंमल या प्रदेशावर होता. इराणची सरहद्द हिंदुस्थानशी भिडलेली असणे ही पूर्वपरंपरा नानासाहेबांच्या काळात सुटली. मराठ्यांच्या राजनीतीचं धोरण मुघल सत्तेच्या वृक्षाच्या बळकट खोडावर घाव घालण्याचं नसून तिच्या फांद्यांवर हत्यार चालवण्याचं होतं. सारी दक्षिण मोकळी पडलेली असताना मराठ्यांनी नर्मदा ओलांडण्याचं काहीच प्रयोजन नव्हतं. शेजवलकरांनी याला मराठ्यांची दक्षिणेतील राजकारणातील घोडचूक म्हणत, अठराव्या शतकातील मराठ्यांच्या एकांडेपणावरही बोट ठेवलं आहे. याचा परिणाम काय झाला, तर एवढी पेशव्यांची आमदानी होऊन तिचं नावही राहिलं नाही, पण मराठ्यांचा कायमचा शत्रू निजाम आजही कायम आहे. एकेक काटा पुरा काढून टाकण्याचं धोरण न अवलंबल्यामुळे मराठ्यांच्या कोणत्याही शत्रूचा पूर्णपणे नि:पात झाला नाही. शेजवलकरांनी यापुढचं टोक गाठून इंग्लंडला अर्धे जग जिंकण्याची संधी यामुळे मिळाल्याचं म्हटलं.

शेजवलकरांचे रागलोभ तीव्र होते. त्यातून येणारी टीकाही तशीच टोकदार, कडवट, जहरी रूप घेऊन येई. म्हणून नरहर कुरुंदकरांनी त्यांना, तसंच राजवाड्यांना विकारी संशोधक म्हटलं आहे. शेजवलकरांनी मराठ्यांना दिलेली दूषणं नक्कीच अन्यायकारक होती. युरोपीय सत्तांशी बरोबरी करणं, त्या संस्कृतीच्या जोडीला पौर्वात्य संस्कृतीला आणून बसवणं अशक्यप्राय होतं. मराठ्यांच्या जागी आशियातील अन्य कोणतीही सत्ता घेतली असती, तरी तिच्या तो आवाक्याबाहेरचा भाग होता. राजपूत, विजयनगर, मुघल इत्यादींच्या तुलनेत राजकीय आणि लष्करी क्षेत्रं वगळून मराठ्यांनी अन्य क्षेत्रात भरीव कामगिरी करत आपला ठसा उमटवला नाही यात नक्कीच तथ्य होतं. मराठी राज्यकर्ते निव्वळ लुटारू असल्याचा त्यांचा दावा नव्हता. ते कमी अत्याचारी व सौम्य प्रकृतीचे होते; आणि इतर राज्यकर्त्यांच्या तुलनेत धर्मवेडेपणा, खोटेपणा, रानटीपणा आचरला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, राजवाड्यांच्या अतिरेकी पेशवाई समर्थनाला प्रत्युत्तर देण्याच्या नादात शेजवलकर विरोधाच्या दुसऱ्या टोकाला जाऊन पोहोचले. मा. रा. कंटक यांनी मराठेशाहीबद्दलचे ऐतिहासिक सत्य हे या दोनही मतांच्या मध्यावर कोठेतरी असल्याचं म्हटलं आहे.

मराठेशाहीच्या यशापयशाच्या या शेजवलकरी मीमांसेचा ‘पानिपत १७६१’ या ग्रंथात आणि ‘निजाम-पेशवे संबंध’ या व्याख्यानांतून अधिक विस्तारानं आविष्कार झाला. दक्षिणेवर ताबा मिळवण्याआधी नर्मदेपार जाणं, चंबळपर्यंत पोहोचल्यावर दिल्लीच्या राजकारणात हात घालणं आणि गुप्त, लुप्त सरस्वती नदी ओलांडणं या त्यांना मराठ्यांच्या घोडचुका वाटत होत्या. यामुळेच १७६१ मध्ये पानिपत घडून आलं. अर्थात, या चुकांमुळे मराठे अटकेपार पोहोचले म्हणूनच तो भाग एकसंध राहिला ही त्यांनी मोठी कर्तबगारीची गोष्ट साधली, हेही लक्षात घ्यायला हवं. इतिहासाचे भाष्यकार म्हणून शेजवलकरांचं हे लिखाण मुख्यत: मराठेशाहीसंबंधी होतं. त्याचा धागा ते पाकिस्तानपर्यंत आणून भिडवत असल्यामुळे त्याच्या व्याप्तीत किमान चार-पाच शतकांचा काळ मोडतो. हे त्यांचं भाष्य काळाचे विखुरलेले तुकडे जोडत जाणारं, एकसंध आणि त्या काळाला मोठा उभा छेद देऊन जातं.

‘शिवाजीचा मार्ग’ या लेखात शेजवलकरांनी छत्रपतींच्या मार्गाचा इतिहासाचा धागा अशाच रीतीनं थेट तत्कालीन वर्तमानाला जोडून दाखवला. तेव्हा भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. ते लिहितात, ‘‘पेशव्यांनी शिवाजीचा मार्ग सोडून मागे जाऊन शहाजीच्या अनुभवाने निरुपयोगी ठरलेला, मुसलमानी बादशाही स्वत: चालवून दाखविण्याचा अशक्य हव्यास धरला. त्यामुळे मुसलमानी बादशाही बुडालीच, पण मराठ्यांचे राज्यही टिकले नाही. उलट जिवंत व स्वतंत्र ठेवलेल्या मुसलमानांना हाताशी धरून आपले राज्य स्थापणे इंग्रजांना शक्य झाले. आज तोच मार्ग गांधींनी अवलंबल्यामुळे हिंदुस्थानची शकले झाली व यादवीही आता कायमची पाठीशी लागणार असं भाकीत करून त्यांनी त्या लेखाचा शेवट केला आहे. त्यानंतरची भारत-पाकिस्तान प्रश्नाची वाटचाल पाहिली तरी आपल्याला या भाकिताच्या भवितव्याचा अंदाज येईल.

शेजवलकरांनी हिंदू-मुसलमान संघर्ष हा दुहेरी न मानता यात ख्रिाश्चन धर्माची भर पडून तो तिहेरी असल्याचं म्हटलं आहे. त्यादृष्टीने पाकिस्तान आणि पानिपत एकाच प्रश्नाची दोन रूपं म्हणावी लागतील. मराठे सार्वभौम न राहता मुघल बादशहाच्या अंकित राहिले, त्यांच्या सनदा मिळवण्यात भूषण मानू लागले हे खरं आहे. शेजवलकर लिहितात, ‘औरंगजेबाशी वागताना शिवाजीने ठरवलेले धोरण बाळाजी विश्वनाथाच्या नूतन राजकारणामुळे सुटले व त्याचा परिणाम औरंगजेबाचे अवतार पुढे हिंदुस्थानात सतत होत राहण्यात झाला.’ ही अवतार परंपरा त्यांनी पहिला निजाम, पहिला वजीर अलिवर्दीखान ते सर सय्यद अहमद, आगाखान, जिना यांच्यापर्यंत आणून दाखवली आहे.

शेजवलकरांनी मराठेशाहीच्या केलेल्या मीमांसेत ‘पानिपत १७६१’ या ग्रंथाचे मोल अपूर्व आहे. या मराठी ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीत मूळ प्रस्तावना प्रकाशकांनी नापसंत केल्यामुळे शेजवलकरांच्या प्रस्तावनेशिवाय तो ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यांच्या ‘निवडक लेखसंग्रहा’त आणि त्या ग्रंथाच्या नंतरच्या आवृत्त्यांत ती समाविष्ट करण्यात आली. विजयाचे अनेक दावेदार असतात, पराभव एकाकी असतो. शिवाय, हा मराठ्यांचा राष्ट्रीय पराभव. राष्ट्राच्या सर्व दोष आणि उणिवांचं प्रदर्शन त्यात झालं. जवळपास सात वर्षें याविषयीच्या चिंतनात घालवून, पानिपतचा प्रदेश पालथा घालून अनेकविध अंगांनी चिकित्सा करून या पराभवाचं विवरण शेजवलकरांनी केलं. मराठेशाहीची मीमांसा करताना त्यांच्या चुकांबाबत केलेली परस्परविरोधी विधानं, त्यातला वादग्रस्त भाग, विसंगती, मल्हारराव होळकरांच्या पलायनाचं लंगडं समर्थन, तर्काचा अतिरेक, याच्या जोडीला शिवाजी राजांची अब्दालीशी चुकीच्या पद्धतीने केलेली तुलना वगैरे दोष डॉ. मा. रा. कंटक यांनी नोंदवले आहेत. तरीही या ग्रंथाची मौलिकता कमी होत नाही. त्यातले काही सिद्धांत आजही मान्य करावे लागतात.

पानिपतचं युद्ध धार्मिक नसून, तो राजकीय संघर्ष होता. मराठे लुटारू म्हणून दुसऱ्या लुटारूशी लढले नाहीत. ते दिल्लीच्या रक्षणासाठी लढले. सर्व हिंदी लोकांसाठी हिंदुस्थान हे त्यांचं ध्येय होतं. या युद्धात मराठ्यांचा पराजय झाला तरी, विजयी अफगाण परत गेले, ते दिल्लीच्या राजकारणात ढवळाढवळ करण्यासाठी पुन्हा परतले नाहीत. धार्मिक बाबतीत मराठे हिंदू-मुसलमान असा भेद करून वागले नाहीत. क्लाइव्हप्रमाणे खोटे कागद करून किंवा मुसलमान व राजपूत यांच्याप्रमाणे मारेकरी घालून त्यांनी आपले राजकीय हेतू साध्य केले नाहीत.

नागरिकांचे अनन्वित हाल करून पैसा उकळला नाही. शत्रूच्या अकारण कत्तलीही केल्या नाहीत. क्लाइव्ह, नजीब आणि अब्दालीचा मार्ग न आचरता आपल्या पूर्वजांनी साम्राज्य घालवणे पत्करले, हीच गोष्ट चांगली झाली. मराठ्यांनी नर्मदा ओलांडून जाण्यामुळे हे प्रकरण उद्भवलं असलं, तरी शेजवलकरांनी ते टाळण्यात खरं हित असल्याचं म्हटलं. सदोष शासन यंत्रणा पानिपत अरिष्टाला मुख्यत: जवाबदार असल्याचा त्यांचा सिद्धांत होता. तसंच, युद्धपद्धतीत ताळमेळ नसणे, विश्वासराव पडताच भाऊने सैन्याला धीर न देता शत्रुसैन्यात अविचाराने घुसणे आणि सेनापती म्हणून अब्दालीचे सरस नेतृत्व ही युद्धशास्त्रीय कारणं दाखवून देत शेजवलकरांनी अतिशय कुशलतेने त्याची मांडणी केली.

श्रीशिवछत्रपतींबद्दल शेजवलकरांना अतीव आदर होता. मराठा मंदिरने त्यांच्याकडे शिवचरित्र लेखनाचं काम सोपवलं. हे त्यांना राष्ट्रीय कार्य वाटत होतं. आपल्या हातून ते चरित्र लिहून झाल्यास आपल्या मराठ्यांच्या अभ्यासाची खरी सार्थकता होईल, असं ते समजत होते. हे शिवचरित्र एकूण १९ प्रकरणांचं, हजार पानांचं होणार होतं. या ग्रंथाची प्रस्तावना त्यांनी अक्षरश: मृत्युशय्येवरून सांगितली. मात्र, ते काम त्यांच्या मृत्यूमुळे पूर्णत्वास जाऊ शकलं नाही. मराठा मंदिरने या संकल्पित चरित्राची अपुरी प्रस्तावना, काही प्रकरणे, टिपणे, नोंदी, आधार ग्रंथांची सूची इत्यादी एकत्र करून ६५० पृष्ठांचा ग्रंथ प्रसिद्ध केला.

शेजवलकरांनी केलेली मराठाशाहीची मीमांसा सर्वमान्य झाली नाही. तशी ती होणारही नव्हती. श्री. रा. टिकेकर, नरहर कुरुंदकर किंवा मा. रा. कंटक, सदाशिव आठवले या त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्याची चिकित्सा करून तिच्यातले विरोधाभास, विसंगतीवर भाष्य केलं आहे. शास्त्रशुद्ध रीतीने विचार करण्याची बुद्धी, घटनांमधील कार्यकारणभाव प्रस्थापित करण्याची पद्धत, मर्मभेदी आकलन, साधार युक्तिवाद, याच्या जोडीला निर्भयपणा, अफाट व्यासंग, स्वतंत्र विचार, सूक्ष्म व विशाल दृष्टी, विवेचनात आढळणारा जागतिक इतिहासाचा धागा आणि खंबीरपणे निष्ठुर मतांची मांडणी करण्याची वृत्ती हे त्यांच्या लिखाणातले मुख्य गुण त्यांनी मोठ्या कष्टानं कमावले होते. याच्या जोडीला अहंकारी-अभिमानी वृत्ती, विकारीपणा त्यांच्या ठायी होता. या सर्वांचं एक विलक्षण रसायन त्यांच्या व्यक्तित्वात होतं, तेच त्यांच्या लिखाणातून उठावदारपणे समोर येत असे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

pankajghate89 @gmail. com