देशाला आकार आणणारा पंतप्रधान व्हायला हवा या भावनेतून मी तब्बल तीन वर्षांपुर्वी नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. आता मोदींच्या सलाइनवर महाराष्ट्रभर फिरणारे तेव्हा लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांचे नाव पंतप्रधानासाठी पुढे करत होते, या शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी शिवसेनेला ठाण्यात टोला लगाविला.
येथील सेंट्रल मैदानावर राज यांची सभा आयोजित करण्यात आली होती. ते पुढे म्हणाले की, माझा पाठींबा मोदींना आहे आणि स्वत मोदींचे त्यावर काही म्हणणे नाही. त्यामुळे माझ्या पाठिंब्याविषयी बोलणाऱ्या राजनाथ सिंगाचा या सगळ्याशी संबंध काय, असा सवाल करताना मोदींना पाठींबा देण्यापुर्वी एनडीएमध्ये विलीन व्हायला माझा पक्ष काय उत्तरप्रदेश, बिहारचा वाटला काय, असेही ते यावेळी म्हणाले. देशात मोदींचे सरकार आले तर माझ्या खासदारांना मंत्रीपद नको आणि दिले तरी मी ते घेणार नाही. फक्त महाराष्ट्राच्या प्रश्नांची या सरकारकडून पूर्तता व्हावी इतकीच अपेक्षा आहे, असेही राज यांनी यावेळी स्पष्ट केले.  राज यांनी या जाहीर सभेत मोदी सलाइनचा एकमेव उल्लेख वगळता  शिवसेनेवर कोणतीही ठोस टीका केली नाही. राज यांची सभा ठाण्यात होत असल्याने महापालिकेत वर्षांनुवर्षे सत्तापदावर असणाऱ्या शिवसेनेच्या कारभाराविषयी राज बोलतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, पालकमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीकेचे प्रहार करत असताना शिवसेनेविषयी थेट टीका करणे त्यांनी टाळल्याचे दिसून आले. यावेळी बोलताना  शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर झालेल्या शाहीहल्ल्याचा राज यांनी जाहीर निषेध केला. बाबासाहेबांचे शिवचरित्र ब्राह्मणी ठरविणारे आणि त्यांच्या अंगावर शाई फेकणाऱ्यांना लाज वाटायला हवी. पेशव्यांनी केलेल्या चुकांचा इतिहास मांडत बसण्यापेक्षा शिवाजी महाराजांनी केलेल्या अचूक गोष्टींचा इतिहास लोकांसमोर आणण्यासाठी बाबासाहेबांनी हयात घालवली. त्यांच्यावर जातीचे शिक्के मारताना यांना लाज वाटायला हवी, असे सांगत राज यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राज्यभर जातीचे विष पेरून ठेवल्याची घणाघाती टीकाही त्यांनी केली.