काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्यावर होत असलेल्या आरोपांमुळे त्यांच्या पत्नी प्रियंका व्यथित झाल्या आहेत. राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्या पतीला लक्ष्य केले जात असल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे तर विरोधक जेवढा हल्ला चढवतील तेवढय़ाच आक्रमकतेने तो परतवून लावण्याचा निर्धार प्रियंका यांनी केला आहे.
रायबरेली मतदारसंघात सोनिया गांधी यांच्या प्रचारासाठी प्रियंका आल्या आहेत. विकासाच्या प्रश्नावरून जनतेचे लक्ष अर्थहीन चर्चेकडे वळविण्यासाठी भाजप आपल्या पतीविरुद्ध आरोप करीत आहे, मात्र अखेर सत्य उजेडात येईलच, असेही त्या म्हणाल्या.
दूरचित्रवाणीवर सर्वत्र काय चालले आहे, आपल्या कुटुंबीयांबाबत अपशब्द वापरले जात आहेत, आपल्या पतीविरुद्ध अनेक आरोप केले जात आहेत, या सगळ्यामुळे आपण व्यथित झालो आहोत. स्वत:साठी व्यथित झालेले नाही तर सत्य सांगितले जात नसल्याने आपण व्यथित झालो आहोत, या निवडणुकीत ज्या प्रकारचे राजकारण केले जात आहे त्यामुळे आपण व्यथित झालो आहोत, असेही प्रियंका म्हणाल्या.
या निवडणुका विकास, जनतेच्या गरजा, युवकांना रोजगार या प्रश्नांवर लढविल्या जाणे गरजेचे आहे, मात्र त्याऐवजी जनतेची दिशाभूल केली जात आहे, त्यामुळे आपण व्यथित झालो आहोत. राजकीय हल्ला चढविण्यासाठी आपले कुटुंबीय, पती यांचा वापर करण्यात आला. गेल्या जवळपास दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे, असेही प्रियंका यांनी वार्ताहरांना सांगितले.
या प्रकारांविरुद्ध कसे लढावयाचे, आक्रमकतेने त्याचा सामना कसा करावयाचा हे आपण आजीकडून (इंदिरा गांधी) शिकलो आहोत, असेही त्या म्हणाल्या.
‘तेव्हा व्यथित व्हावयास हवे होते ’
कोलकाता :  वढेरा यांना राजकीय लक्ष्य केल्याने आपण व्यथित झाल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे. त्यावर भाजपने  हल्ला चढविला आहे. गांधी कुटुंबीयांनी जेव्हा गैरकृत्ये केली तेव्हा प्रियंकांनी व्यथित व्हावयास हवे होते, असे भाजपचे कोषाध्यक्ष पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.