दिल्ली पोलिसांनी राजस्थानमधून अटक केलेल्या इंडियन मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांची भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याची योजना होती, असे वृत्त प्रसिद्ध झाल्याचा संदर्भ देऊन भाजपने, केंद्र सरकार आमच्या पक्षाच्या नेत्यांच्या सुरक्षेबाबत उदासीन असल्याचा आरोप केला आहे.
नरेंद्र मोदी यांच्या जिवाला कोणताही धोका नाही, त्यांच्या सुरक्षेत यापूर्वीच वाढ करण्यात आली आहे, असे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केल्यानंतर भाजपने सदर आरोप केला आहे.
राष्ट्रीय सुरक्षेसाठी दहशतवादविरोधी कायदे अधिक कडक करण्याची मागणी भाजपने केली.
अटक करण्यात आलेल्या चार दहशतवाद्यांची नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्याची योजना होती, असे प्रसिद्ध झालेले वृत्त हा अत्यंत संवेदनक्षम विषय असून ते लोकशाही पद्धतीला आव्हान आहे, असे पक्षाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटले आहे. दहशतवाद्यांना अधिक बळ मिळेल अशी वक्तव्ये केली जाऊ नयेत, असेही ते म्हणाले.