बिजापूर जिल्ह्य़ातील कुडागी येथे २००० मेगाव्ॉट क्षमतेचा औष्णिक वीजप्रकल्प उभारल्याच्या निषेधार्थ निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केल्याच्या प्रश्नावरून भाजपच्या सदस्यांनी सोमवारी कर्नाटक विधानसभेतून सभात्याग केला.सरकार शेतकरीविरोधी असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते जगदीश शेट्टर यांनी केला. निष्पाप लोकांवर गोळीबार करण्यात आला आणि त्यामध्ये दोन जण जखमी झाले. कोणत्याही शेतकऱ्यावर गोळीबार अतवा लाठीमार करण्यात येणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिले होते, मात्र त्याचे पालन करण्यास मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत, असेही शेट्टर म्हणाले.
या गोळीबाराची दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याऐवजी उच्च न्यायालयाकडून उच्चस्तरीय चौकशी करावी अथवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी करून गोळीबारात जखमी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही शेट्टर यांनी केली. शेतकरी  भूसंपादनाच्या विरोधात आहेत, असे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले.