राज्य सरकार आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत सोशल मीडियातून आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या समीत ठक्करला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं काही अटी-शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला लगेच अटक केली. पोलीस त्याला उद्या मुंबईला घेऊन जाणार आहेत. ठक्करला २४ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती.

राज्यातील ठाकरे सरकार आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या समीत ठक्करला नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दुसऱ्यांदा पोलीस कोठडी सुनावली होती. समीत ठक्करने ट्विटरवर ठाकरे सरकारला औरंगजेब आणि पॉवरलेस सरकार तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पेन्ग्विन असं संबोधित केलं होतं.

२४ ऑक्टोबर रोजी नागपूर पोलिसांनी समीत ठक्करला राजकोट मधून ताब्यात घेतलं होतं. २६ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केलं असता ५ दिवसांची कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्यावर शनिवारी संध्याकाळी पुन्हा एकदा समीतला न्यायालयात उपस्थित करण्यात आलं. तेव्हा या प्रकरणात आणखी तपास शिल्लक असल्याच्या पोलिसांच्या युक्तिवादाला मान्य करत न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

नेमकं काय प्रकरण

३२ वर्षीय समीत ठक्करने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी नागपूर पोलिसांनी २४ ऑक्टोबर रोजी अटक केली. युवासेनेचे पदाधिकारी धर्मेंद्र मिश्रा यांनी ठक्कर विरोधात तक्रार केली होती. आरोपी समीत हा भाजपाचा आयटी सेलचा कार्यकर्ता आहे, असा दावा तक्रारदारांनी केला आहे.