अलिबाग : नीरव मोदी यांच्या किहीम येथील बंगल्या पाठोपाठ आता उद्योगपती अशोक मित्तल यांच्या कोळगाव येथील बंगल्यावर कारवाई केली जाणार आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर न्यायालयानच्या निर्देशानुसार मित्तल यांचा आलिशान बंगला पाडण्यात येणार आहे.

मांडवा जेटी जवळील कोळगाव पाच एकर परीसरात हा आलिशान बंगला अस्तित्वात आहे. ५१५ चौरस मीटर बांधकामाची परवानगी असतांना, या बंगल्याचे १ हजार ४१० चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे. या वाढीव अनधिकृत बांधकामाविरोधात बॉम्बे एनव्हॉरनमेंट एक्शन गृपने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. ज्याचा निकाल १ नोव्हेंबर २०१८ रोजी लागला. उच्च न्यायालयाने महिन्याभराच्या आत अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णया विरोधात मित्तल यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत मित्तल यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे आता नीरव मोदी यांचा किहिम येथील बंगला पाडल्यानंतर प्रशासनाला मित्तल यांच्या कोळगाव येथील बंगल्यावर कारवाई करावी लागणार आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशा नुसार मित्तल यांना प्रांताधिकारी कार्यालयाने नोटीस बजावली होती. तीन महिन्याच्या आत अनधिकृत बांधकाम पाडून टाकावे, अन्यथा जिल्हा प्रशासनाच्या वतीने कारवाई केली जाईल अशी नोटीस प्रांताधिकारी शारदा पोवार यांनी बजावली होती. नोटीस मध्ये देण्यात आलेली मुदत संपल्याने आता या बंगल्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

अलिबाग तालुक्यातील किहीम समुद्र किनारयावरील नीरव मोदी याचा बंगला नुकताच िनयत्रीत स्फोटांनी उडवून देण्यात आला होता. तर धोकवडेमधील शहाजिदा कुंदनमल आणि  मांडवा कोळगाव येथील अविनाश कोठारी या उद्योगपतींचे बंगले मशीन्सच्या साह्याने, जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केले होते. आता अशोक मित्तल यांचाही राजेशाही बंगल्याचाही यात समावेश होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनातील वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगीतले जात आहे.