गेल्या काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी रंगत आहेत. दरम्यान, भाजपाकडून अंतर्गत कलहामुळेच राज्यातील सरकार पडेल असं सातत्यानं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे विरोधकांच्या आरोपांचं खंडन करत राज्यातील सरकार पाच वर्ष टिकणार असं सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं जात आहे. अशातच भाजपा नेते निलेश राणे यांनी जसं पहाटेच्या शपथविधीला अजित पवार यांचे डुप्लिकेट आले होते असं म्हणत शपथविधीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. "अजित पवार भाजपावर अशी टीका करत सुटले जसे पहाटेच्या शपथविधीला त्यांचा डुप्लिकेट आला होता. मानलं पाहिजे अजितदादांना. दोन्ही बाजूला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सुद्धा 'मी नाही त्यातला' दाखवण्यामध्ये ते यशस्वी झाले. एकदा अजितदादांना विचारा की ते राजभवनात त्या सकाळी का आले होते?," असं निलेश राणे म्हणाले. अजित दादा पवार बीजेपी वर अशी टीका करत सुटले जसे पहाटेच्या शपथविधीला त्यांचा डुप्लिकेट आला होता. मानलं पाहिजे अजितदादांना दोन्ही बाजूला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सुद्धा 'मी नाही त्यातला' दाखवण्यामध्ये ते यशस्वी झाले. एकदा अजितदादांना विचारा कि ते राजभवनात त्या सकाळी का आले होते? — Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 26, 2020 यापूर्वी काय म्हणाले होते अजित पवार? “सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधीपक्षांना सरकार पडणार अस म्हणावंचं लागतं. कार्यकर्ते बरोबर रहावेत, आमदारांमध्ये चलबिचल होऊ नये यासाठी त्यांना सारखं गाजर दाखवायंच काम करावं लागतं. पण जोपर्यंत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी हे तिघं या आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, तोपर्यत या सरकारला काहीही होणार नाही. त्यांचे १०५ लोक निवडून आलेले असतानाही सरकार स्थापण्याची संधी मिळाली नाही हे त्यांचं खरं दुखण आहे. त्यामुळे सारखं ते काही ना काही काड्या पेटवायचं काम करत आहेत,” असं अजित पवार यापूर्वी म्हणाले होते. “आम्ही स्वप्न पाहत नाही, थेट कृती करतो” "स्वप्न पहाण्याचं काम आम्ही करतच नाही आम्ही थेट कृती करण्याचं काम करतो. चंद्रकांत पाटलांना कधी कळलं की आम्हाला स्वप्न पडलीत म्हणून. आज जगभरात करोनामुळं बिकट परिस्थिती असताना आम्ही सर्वजण राज्यातील महत्वाच्या गोष्टींवर काम करीत आहोत. कुठ्ल्याही परिस्थितीत राज्यातील शेतकरी अडचणीत येऊ नये यासाठी सरकारने दहा हजार कोटींची मदत केली. एसी कर्मचाऱ्यांसाठी १ हजार कोटींची पॅकेज देऊ केलं," अशा शब्दांत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती.