मुंबई : राज्यात करोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक गुरुवारी नोंदविण्यात आला. गेल्या २४ तासांत १४,४९२ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात राज्यात ३२६ जणांचा मृत्यू झाला.

राज्यात बुधवारी १३ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली होती. गुरुवारी १४,४९२ म्हणजे आतापर्यंतचे २४ तासांतील सर्वाधिक रुग्ण आढळले. राज्यातील करोनाबाधितांची एकू ण संख्या ६ लाख ४३ हजार झाली असून, १ लाख ६२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात मुंबई १,२७५, नागपूर ९२४, नवी मुंबई ४९२, नाशिक शहर ७४५, पुणे शहर १६८२, पिंपरी-चिंचवड १०००, जळगाव ५१५, उस्मनाबाद २६४, कोल्हापूर जिल्हा ५५० रुग्ण आढळले.

सणासुदीच्या तोंडावर राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सरकारी यंत्रणाही सावध झाल्या आहेत. गर्दी टाळण्याचे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे.

देशात ६९ हजारांहून अधिक रुग्णवाढ

नवी दिल्ली : देशात गेल्या चोवीस तासांमध्ये करोना रुग्णांची संख्या ६९ हजार ६५२ इतकी विक्रमी वाढली.दिवसभरात ९७७ रुग्णांचा मृत्यू झाला. देशभरात रुग्णसंख्या २८ लाख ३६ हजार ९२६ वर पोहोचली असून, करोनाबळींची एकूण संख्या ५३ हजार ८६६ झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.  करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढत असून सुमारे २१ लाख रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये ५८ हजार ७९४ रुग्ण करोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्के आहे. ६ लाख ८६ हजार ३९५ रुग्ण उपचाराधीन आहेत. मृत्युदर १.८९ टक्के आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ९ लाख १८ हजार ४७० इतक्या आत्तापर्यंतच्या सर्वाधिक चाचण्या घेण्यात आल्या.

२९ टक्के दिल्लीकरांना बाधा

दिल्लीतील २९ टक्के लोकांमध्ये प्रतिपिंडे आढळली असून या दिल्लीकरांना करोनाची बाधा होऊन गेली असल्याचे दुसऱ्या सीरो सर्वेक्षणाच्या अहवालातून स्पष्ट झाले. ११ जिल्ह्य़ांतील १५ हजार लोकांचा सर्वेक्षणात समावेश होता.