राज्यातील भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एमआयडीसीच्या महाजॉब्स संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन पद्धतीने या संकेतस्थळाचं उद्घाटन केलं. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे आणि कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक उपस्थित होते. सुभाष देसाई यांनी यावेळी राज्यात नोकरीसाठी डोमिसाइल बंधनकारक असणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे महाजॉबवर नोंदणीसाठी डोमिसाइल आवश्यक असणार आहे. "डोमिसाइल बंधनकारक असल्याने आपोआप भूमिपुत्रांना संधी मिळणार आहे. कंपन्यांनी, उद्योगांनी याचा फायदा घेत स्थानिकांना नोकरी द्यावी. ज्यांच्याकडे कौशल्य नाही ते विकसित करण्यासाठी कौशल्य विकास विभागाला यामध्ये जोडून घेतलं आहे," अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली. "१०० टक्के स्थानिकांना रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांना काही कालावाधीसाठी वापरुन घेतलं असं होऊ नये. त्यांना कायमस्वरुपी नोकरी मिळाली पाहिजे," असं दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी सांगितलं. "रोजगारासाठी १७ अशी क्षेत्र निवडली आहेत ज्यामध्ये संधी मिळू शकते. ज्यामुळे ९५० हून अधिक व्यवसाय करु शकतात. तरुणांनी मागे राहू नये. बेरोजगारी संपवण्याची चांगली संधी आहे. नोकरी मागणारे आणि देणारे दोघांना एकत्र आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आम्ही सर्वेक्षण केलं असता ५० हजाराहून अधिक रोजगार उपलब्ध आहेत. हे संकेतस्थळ फक्त माहिती देणारं नाही तर ती मिळेपर्यंत यंत्रणा काम करेल. महाराष्ट्रातील रोजगारी संपवण्यासोबत कौशल्य मनुष्यबळ निर्माण करण्यावर आपला भर असेल," अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज एमआयडीसीच्या महाजॉब्स पोर्टलचे () ऑनलाईन उद्घाटन केले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी पुढील मुद्दे उपस्थित केले. (६/८)#MahaJobsPortal pic.twitter.com/9EPfxeyYTJ — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 6, 2020 टाळेबंदीनंतर राज्यात सध्या ६५ हजार उद्योग सुरू झाले आहेत. तर अनेक नवे उद्योग येऊ घातले आहेत. नुकतंच राज्य शासनाने देश-विदेशातील विविध कंपन्यांसोबत सुमारे १७ हजार कोटींचे सामंजस्य करार केले आहेत. याखेरीज नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महापरवाना देणे सुरू केले आहे. अशा स्थितीत उद्योगांत कुशल, अर्धकुशल तसेच अ-कुशल कामगारांची मागणी वाढली आहे. मध्यंतरी करोना आजाराच्या संसर्गामुळे कामगारांचे मोठय़ा प्रमाणात स्थलांतर झाले आहे. हे कामगार परत कधी येतील, याची शाश्वती नाही. त्यामुळे उद्योगांना कामगाराचा तुटवडा भासू नये, तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी महाजॉब्स हे संकेतस्थळ तयार करण्यात आलं आहे. यात उद्योग, कामगार व कौशल्ये विकास विभागाने काम केलं आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्या इच्छुकांनी केवळ आपली माहिती महाजॉब्स संकेतस्थळावर द्यायची आहे. एकदा नोंदणी केल्यानंतर विविध कंपन्यांकडून इच्छुकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. करोनाच्या काळात अत्यल्प वेळेत हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलं आहे.