जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये संपूर्ण टाळेबंदीनंतरही करोना संसर्गामुळे रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज शुक्रवारी जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या एक हजार पार झाली. दिवभरात नवीन १२१ रूग्ण आढळल्याने आज ३१ जुलैरोजी संपणारी टाळेंबदी आणखी वाढविण्यात आली आहे. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासनाने यासंदर्भात कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केला नव्हता.

यवतमाळ, पांढरकवडा, दारव्हा, नेर, दिग्रस व पुसद या शहरांसंह लगतच्या भागात गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण टाळेबंदी आहे. टाळेबंदीनंतरही सर्वच शहरात नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवर फिरत आहेत. त्यांच्यावर जिल्ह्यात कुठेही मोठी कारवाई झालेली नाही. दुसरीकडे करोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. टाळेंबदी असलेल्या सहाही शहरांमध्ये करोना रूग्णांची जवळपास शंभरी पार झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा फसलेल्या टाळेबंदीचीच मात्रा या शहरांमध्ये लागू केली आहे. जिल्ह्यात करोना संसर्गात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे यवतमाळसह पांढरकवडा, दारव्हा, नेर, दिग्रस व पुसद या सहा शहरांमध्ये टाळेबंदी वाढविण्याशिवाय पर्याय नाही.यामुळे या शहरांमध्ये ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पूर्वीप्रमाणेच संपूर्ण टाळेबंदी पुढील आदेशापर्यंत राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

आणखी वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात दिवसभरात आढळले १० हजार ३२० रुग्ण, मृतसंख्या १४ हजार ९९४ वर

जिल्ह्यात इतरत्र बाजारपेठ व इतर व्यवहारांच्या वेळेत बदल करून आता सकाळी ६ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मूभा राहील, असे जिल्हाधिकारी म्हणाले. सततच्या टाळेबंदीला मात्र नागरिकांसह व्यापाऱ्यांमधून तीव्र विरोध होत आहे. परंतु, पालकमंत्र्यांसह प्रशासन टाळेबंदीमुळे करोना संसर्गाची साखळी तुटण्यास मदत होईल, या आशेवर अद्यापही असल्याने जिल्हावासीयांच्या रोजगारासह सर्वच व्यवहारांना खीळ बसली आहे.

आणखी वाचा- चंद्रपूर जिल्हयातील बाधितांची संख्या ५२३, ३२२ रुग्ण बरे

दरम्यान काल दिवसभरात जिल्ह्यात १२१ रूग्णांची विक्रमी वाढ नोंदविण्यात आली. त्यामुळे रूग्णसंख्या एक हजार ७४ वर पोहचली. टाळेबंदी असलेल्या सहा शहरांमध्ये रूग्णवाढ अधिक आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षासह जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये ४५३ सक्रिय करोनाबाधित उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ५९४ रूग्णांना उपचारानंतर बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.  काल नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या १२१ जणांमध्ये ६६ पुरुष व ५५ महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक ५० रुग्ण पुसदचे, ४४ दिग्रसचे, पांढरकवडा येथील २० रुग्ण, यवतमाळचे सहा तर एक रुग्ण दारव्हा येथील आहे. यात यवतमाळ शहरातील साईनाथ लेआउट येथील एक महिला, यवतमाळ शहरातील पोलीस मुख्यालयातील एक पुरूष, तेलीपुरा येथील एक पुरुष, लक्ष्मीनगर येथील एक महिला, चिंतामणी नगरी वाघापूर येथील एक पुरूष, यवतमाळ शहरातील एक पुरूष, पुसद येथील द्वारका नगरीमधील दोन पुरूष, गांधी वार्ड येथील एक महिला, वार्ड नंबर एक मधील एक पुरूष व दोन महिला, रामनगर येथील एक पुरूष, दिग्रस येथील शास्त्री नगरातील एक महिला, गवळीपुरा येथील एक पुरूष, दिग्रस शहरातील २१ पुरूष व २१ महिला, दारव्हा शहरातील किला मजीद येथील एक महिला, पांढरकवडा येथील १३ पुरूष व सात महिला यांचा समावेश आहे. उपचारानंतर बरे झाल्यामुळे काल ३१ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात १०४ संशयित दाखल आहेत.