वसई-विरार शहरात काल (सोमवार) तब्बल ११ करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे यातील काही रुग्ण ऑक्सिजन न मिळाल्याने दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यात नालासोपाऱ्यातील विनायका हॉस्पिटलमध्ये ७ रुग्णांचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेवरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नालासोपाऱ्यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे? जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का?” असा सवाल भाजपाकडून विचारण्यात आला आहे.

तसेच, भाजपा नेत्यांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात असून, आरोग्यमंत्र्याच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारपरिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

मृत्यूचं थैमान! नालासोपाऱ्यात ७ करोना रुग्णांचा ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू

पत्रकारपरिषदेत बोलताना केशव उपाध्ये म्हणाले, “एकीकडे राज्यात करोनाने हाहाकार माजवला असून, दुसरीकडे राज्यसरकारला करोना परिस्थिती हाताळण्यात अपयश येत आहे. तर, तिसरकडे जेथे करोनाबाधितांवर उपाचर सुरू आहेत अशा अनेक केंद्रांमध्ये रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. काल ११ लोकं मृत्यूमुखी पडणं हे खूप धक्कादायक आहे, अस्वस्थ करणारं आहे. भाजपाचा असा आरोप आहे, हे करोनाचे जे बळी काल ऑक्सिजन अभावी गेलेत हे राज्य सरकारच्या अनास्थेपाई, राज्यातील महावसूली सरकारच्या अनास्थेतून, दुर्लक्षातून व हेळसांडपणातू गेलेले हे बळी आहेत. अजून नेमके किती बळी या सरकारला हवेत? हा खरंतर अत्यंत गंभीर प्रश्न आहे.”

राज्यातील ठाकरे सरकार आणि वसुली या एकाचं नाण्याच्या दोन बाजू –
तर, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नालासोपाऱ्यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे? जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का? फेसबुक लाईव्हवर मोठंमोठ्या गप्पा मारणारे उद्धव ठाकरे आता या प्रकरणावर काही बोलतील का? राज्यातील ठाकरे सरकार आणि वसुली या एकाचं नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. ठाकरे सरकारच्या या भ्रष्ट कारभाराची शिक्षा आज राज्यातील जनतेला भोगावी लागत आहे. कुठे रेमडेसीवीरचा काळाबाजार तर कुठे आरोग्य अधिकारीच व्हेंटिलेटरसाठी लाच घेत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्या मते सर्व आलबेल आहे !” असं भाजपाकडून ट्विटद्वारे म्हटलं गेलं आहे.

या मृत्यूंना ठाकरे सरकार जबाबदार – सोमय्या
“ऑक्सिजन पुरवठ्या मध्ये बिघाड झाल्यामुळे मुंबई जवळील विनायक रुग्णालय नालासोपारा येथे आज 7 कोव्हीड रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यूंना ठाकरे सरकार जबाबदार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तातडीने राजीनामा द्यावा.” अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनले आहे  – भातखळकर
“ नालासोपाऱ्यात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे एक तासात सात रुग्णांचा मृत्यू. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र मृत्यूचा सापळा बनले आहे. खंडणी वसूल करण्याच्या काळात ऑक्सिजनचा पुरेसा साठा केला असता तर कदाचित हे मृत्यू थांबवता आले असते.वसई-विरारसह संपूर्ण राज्यात भयाण परिस्थिती. मुख्यमंत्र्यांच्या अकार्यक्षम आणि बेजबाबदार कारभाराचे परिणाम जनता भोगते आहे.” असा आरोप भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी महाविकासआघाडी सरकारवर केला आहे.

खाटा, प्राणवायूचा तुटवडा

याशिवाय “घोळ आणि झोल हे बहुदा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमातच ठरलं असावं. करोनाचं संकट थैमान घालत असताना आरोग्य व्यवस्थेच्या नावाखाली लुटालुटीचे नवीन धंदे सुरु आहेत. आता या सर्व गोष्टीला राजाचा आशीर्वाद आहे की त्याच्या मंत्र्यांचा हे त्यालाच ठाऊक!” असा टोला देखील भाजपाकडून लगावण्यात आला आहे.