दिवा- सावंतवाडी पॅसेंजर घसरल्यामुळे रविवार सकाळपासून विस्कळीत झालेली कोकण रेल्वेसेवा १९ तासांच्या अथक दुरुस्तीनंतर सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाली. मात्र सेवेचे वेळापत्रक मात्र पुरते कोलमडले आहे. नागोठणेनजीक भिसे खिंडीत इंजिन आणि चार डबे घसरल्याने झालेल्या या अपघातातील मृतांची संख्या २० असून १५५ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताचे कारण अद्यापही स्पष्ट न झाल्याने तर्कवितर्काना ऊत आला असला तरी ऐन मोसमात रेल्वे पुन्हा धावू लागल्याने चाकरमान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मृतांच्या आप्तांना प्रत्येकी २ लाख रुपयांची तर जखमी प्रवाशांना ५० हजार रुपयांची मदत सोमवारी जाहीर केली. जखमी प्रवाशांचा शासकीय आणि रेल्वे रुग्णालयातील उपचार खर्चही राज्य सरकार करणार असल्याचे त्यांनी रोहा येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.चव्हाण यांनी अपघातस्थळाची पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
मुख्यमंत्र्यांना रेड कार्पेट
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जखमींची विचारपूस करण्यासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारापासून चक्क रेड कार्पेट घातले होते. रुग्णालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्तही होता.  या संपूर्ण प्रकाराबद्दल रुग्णांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर होता. रुग्णालय प्रशासनाला परिस्थितीचे भान राहिले नाही, अशी चर्चा सुरू होती.
कोकण रेल्वे मार्गावरील अपघातांमुळे नागरिकांमधील असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने उपाय योजावेत, असे ते म्हणाले.       

युद्धपातळीवर दुरुस्ती
दोन मोठय़ा क्रेन आणि तब्बल १५० कामगार व तंत्रज्ञ यांनी खंडित रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. प्रथम क्रेनच्या साह्य़ाने रेल्वे मार्गावरील डबे बाजूला करण्यात आले. त्यानंतर मार्गाची दुरुस्ती सुरू झाली. रात्रभराच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे ४ वाजून ५ मिनटांनी रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात यश आले. ५ वाजून ५ मिनिटांनी एक मालगाडी मार्गस्थ झाली. त्यापाठोपाठ हजरत निजामुद्दीन राजधानी, जनशताब्दी आणि मंगला एक्स्प्रेस सोडण्यात आल्या.