बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसंच पोलिसांनी बदनामी करणाऱ्यांनी तोंड न लपवता त्यांची माफी मागावी अशी मागणीही केली आहे. "बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे. आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी," असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून विरोधकांवर निशाणा साधला. तसंच त्यांनी आपल्या ट्वीटनंतर सत्यमेव जयते असंही लिहिलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत करण्यासाठी यापूर्वी पार्थ पवार यांनीदेखील गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर न्यायालयानं ती चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पार्थ पवार यांनीदेखील सत्यमेव जयते असं म्हटलं होतं. बिहार निवडणुकीसाठी #SushantSinghRajput च्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर #AIIMS च्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे.आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी.#सत्यमेवजयते — Rohit Pawar (@RRPSpeaks) October 3, 2020 तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम एम्स रुग्णालयाकडून सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमने अभ्यास पूर्ण करुन सीबीआयकडे रिपोर्ट सोपवला होता. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत. सूत्रांनुसार, एम्सच्या डॉक्टरांनी दिलेली माहिती तज्ञांचं मत म्हणून ग्राह्य धरलं जाणार असून त्यांना साक्षीदार म्हणूनही उभं केलं जाऊ शकतं. सुशांत सिंहचा १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात मृतदेह आढळला होता. सुशांतने आत्महत्या केली असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं असलं तरी ही हत्या असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआय याप्रकरणी तपास करत असून आपण सर्व बाजूंची पडताळणी करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.