प्रबोध देशपांडे

काही महिन्यांपूर्वी विक्रमी किमतीने भाव मिळणाऱ्या कांद्याने आता उत्पादक अडचणीत आले आहेत. करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसह विविध कारणांमुळे कांद्याचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे मातीमोल भावात कांद्याची विक्री करावी लागत आहे. त्यातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग विवंचनेत आहे.

पश्चिम विदर्भातील विविध भागांत शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामामध्ये कांद्याची लागवड केली. कांद्याचे पीक काढण्यासाठी तयार झाले असतानाच करोनाचे संकट कोसळले. करोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून टाळेबंदी लागू करण्यात आली. यातून शेतीकामे वगळली असली तरी त्याचा विपरीत परिणाम झाला. कांदा काढण्यासाठी वेळेत मजूर मिळाले नाहीत. जे मजूर कामावर आले, त्यांनी दुप्पट मजुरी घेतली. अथक परिश्रमाने कांदा घरात आला. त्यानंतर तो विक्रीला काढला असता व्यापारी खरेदी करण्यास फारसे उत्सुक नव्हते. काही ठिकाणी व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावात कांद्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरात कांदा पडून आहे.

टाळेबंदीच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी ग्राहकांकडे घरपोच कांदा विक्रीचा प्रयोग केला. मात्र, तोही फारसा यशस्वी ठरला नाही. उत्पादन खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे. शेतकऱ्यांकडे साठवणूक करण्याची क्षमता नाही. काही शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना अत्यल्प भावात कांदा देण्याऐवजी स्वत: रस्त्यावर ट्रॅक्टर लावून कांद्याची विक्री केली. ४०-५० किलोच्या कट्टय़ांमधून थेट ग्राहकांना दिले. मात्र, ग्राहकही पडलेल्या भावाने मागणी करीत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीचाही कांद्याला जबर फटका बसला आहे. पाणी लागलेला कांदा जास्त दिवस टिकत नाही. सध्या व्यापारी चांगल्या दर्जाचा कांदा चार ते पाच रुपये किलो दराने मागत आहे. त्यामध्येही चाळणी लावून हलक्या दर्जाचा कांदा घेण्यास व्यापारी नकार देतात. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

टाळेबंदीमुळे मागणी घसरली

पाणीपुरीच्या गाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत सर्वच खाद्यपदार्थ व्यवसायाच्या ठिकाणी कांद्याचा उपयोग होतो. कांद्याला नेहमीच चांगली मागणी असते. करोनामुळे गत दोन महिन्यांपासून टाळेबंदी लागू करण्यात आली. या काळात हॉटेलसह सर्व व्यवसाय, उद्योग ठप्प झाले आहेत. परिणामी, कांद्याची मागणी कमी आहे. उत्पादन जास्त व मागणी कमी असल्याने कांद्याचे भाव मोठय़ा प्रमाणात गडगडले आहेत. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

विक्री करावी कशी?

आधीच नैसर्गिक आपत्तीने शेतकरी खचलेला आहे. खरिपातील विविध पिकांची नुकसानभरपाई निघण्यासाठी शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. पुन्हा नैसर्गिक आपत्ती आल्याने दोन-तीन वेळा कांद्याचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीतही काढलेल्या कांद्याची टाळेबंदीच्या काळात विक्री करावी कशी? असा प्रश्न उभा ठाकला. कांदा सडण्याचे प्रमाण वाढून तो फेकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, शासनाकडून मदतीची मागणी होत आहे.

अत्यल्प भावामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी होत आहे. टाळेबंदीमुळे कांद्याला मागणी नाही. शेतकऱ्यांना मोठय़ा नुकसानीचा सामना करावा लागत आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे. धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

डॉ. प्रकाश मानकर, चेअरमन, भारत कृषक समाज