कोल्हापूर: निष्क्रीय आणि अपयशी पालकमंत्र्यांच्या कारभारामुळे कोल्हापूर जिल्ह्यात करोना परिस्थिती गंभीर निर्माण झाल्याची जनतेची भावना आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सतेज पाटील यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घ्यावे. धडाडीचे नेते, कामाचा अनुभव असणार्‍या हसन मुश्रीफ यांना कोल्हापूर जिल्हयाचे पालकमंत्री पद द्यावे, अशी मागणी धनंजय महाडिक यांनी केली आहे.

महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या वर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सतेज पाटील यांच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी महाडिक यांच्या कोल्हापूर येथील कार्यालयासमोर आंदोलन केल्याने वाद निर्माण झाला होता. त्यावरून महाडिक यांनी पालकमंत्री पाटील यांना उद्देशुन म्हटले आहे की खरे पाहता, संपूर्ण राज्यात कोल्हापूर जिल्हा कोव्हीडसाठी हॉटस्पॉट बनला आहे. या आजारामुळे जिल्हयात दररोज १५ ते २० जण मृत्यूमुखी पडत आहेत, तर दररोज बाधितांच्या संख्येत ५०० हून अधिकची भर पडत आहे. रूग्णांसाठी बेड नाही, आरोग्य यंत्रणा तोकडी पडत असून, क्वारंटाईन सेंटर मध्ये ऑक्सिजनची कमतरता, जेवणात अळ्या, सुविधांचा वाणवा आहे. सकाळी पॉझिटिव्ह तर संध्याकाळी निगेटिव्ह रिपोर्ट अशी धांदलबाजी जिल्हयाने अनुभवली आहे. वाढीव वीज बीलामुळे सर्वसामान्य हैराण आहे. मार्केट कमिटी मधील नोकरभरती घोटाळा, महापालिकेत घरफाळा घोटाळा पुढे आला आहे. या सर्व प्रश्‍नांवर पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून उत्तर दिले जात नाही. सर्वकाही अलबेल असल्याचा भास निर्माण करण्यात ते मश्गुल आहेत. या प्रश्‍नांवर उत्तरे देण्याऐवजी जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आंदोलनाचा फार्स करण्यात आला, अशी टिका महाडिक यांनी केली आहे.

एप्रिल महिन्यात जिल्हयात ५० पेक्षा कमी रूग्ण होते. ती संख्या आता १२ हजारच्या वर गेली आहे याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
मोदींमुळे विरोधक गर्भगळीतपंतप्रधान मोदी यांच्या वाढत्या लोकप्रियेतेचा विरोधकांनी धसका घेतला असून, विशेषत: कॉंग्रेस कार्यकर्ते गर्भगळीत झाले आहेत. म्हणूनच आत्मनिर्भर पॅकेजबाबत बालिश सवाल उपस्थित करून आंदोलन करण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. पण पॅकेजबाबत सविस्तर माहितीचा फलकच लावला असल्याने, कॉंग्रेसच्या आंदोलनाचा फज्जा उडाला आहे.