अचानक ओढवलेल्या करोना संकटाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. प्रसार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचा अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका बसला. अनेक नवीन आर्थिक समस्या करोनामुळे निर्माण झाल्या असून, आमदार रोहित पवार यांनी अर्थव्यवस्थेसंदर्भात सरकारनं सक्रिय धोरण स्वीकारण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. करोनाचा प्रचंड आर्थिक फटका बसला असून, त्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारनं पावलं उचलण्याची मागणी राजकीय पक्षांसह विविध घटकांकडून केली जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही हा मुद्दा उपस्थित केला आहे. रोहित पवार यांनी करोनाचे दीर्घ आर्थिक परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त करतानाच केंद्रानं परिणामकारण धोरण आखण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. "करोनाचा अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन प्रभाव असणार आहे. त्यामुळे अर्थव्यस्थेला पुर्नजीवत करण्यासाठी शाश्वत सक्रिय धोरण आखण्याची गरज आहे. दुर्दैवानं केंद्र सरकार याला प्रतिसाद देताना केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिंद्रे बुजवतानाच दिसत आहे. यात अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे," असं रोहित पवार यांनी ट्विट करून म्हटलं आहे. The Covid19 impact on the economy is going to be long term. We need to be 'proactive' in devising sustainable revival policies. Unfortunately, the central Govt. only seems to be 'reactive' in its response, plugging holes in the sinking ship.The lack of experience is evident. — Rohit Pawar (@RRPSpeaks) September 25, 2020 करोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे देशाचा जीडीपीही आक्रसला असून, अनेक उद्योगांना घरघर लागली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात बेरोजगारीचा प्रश्न वेगानं पुढे येताना दिसत आहे.