पोलिसांवर बेफिकिरीचा आरोप नांदेड : लोहा तालुक्यातील चोंडी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या माती नाला बांधकामा दरम्यान चार हरीण आणि दहा मोरांची हत्या करण्यात आली. या गंभीर प्रकरणाची तसेच झालेल्या बोगस कामांची चौकशी करण्यात यावी, अशी अनेकदा मागणी करूनही कारवाई होत नसल्याने तक्रारदार शिवदास संभाजी ढवळे यांनी जाळून घेऊन आत्मदहन केले. ही घटना बुधवारी घडली. दरम्यान, आत्मदहनाचा इशारा देऊनही शिवदासच्या आत्महत्येस पोलिसांची बेफिकिरी कारणीभूत ठरल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. चोंडी परिसरात वनविभागाच्या मालकीच्या जागेत तत्कालीन सरपंच सुदामती देविदास गीते यांनी एकूण चौदा माती बंधाऱ्याचे बांधकाम केले; परंतु यादरम्यान चार हरीण आणि दहा मोरांची हत्या करण्यात आली. तसेच झालेली कामे बोगस झाली असून या दोन्ही प्रकरणाची चौकशी करुन दोषींविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी शिवदास ढवळे यांनी वनविभाग आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती; परंतु पाठपुरावा करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आल्यानंतर ढवळे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. याउपरही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे ढवळे यांनी जाळून घेऊन आत्मदहन केले. याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पोलीस ठाण्यात चोंडी गावातील नागरिकांचा जमाव जमला होता. प्रकरणाचे गांभीर्य पाहता अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे व उपविभागीय अधिकारी सचिन सांगळे आणि पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. बोगस कामांची चौकशी होत नसल्याने ढवळे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा पोलिसांनाही दिला होता; परंतु या प्रकरणात पोलिसांनी बेफिकिरी दाखविल्याने सदाशिव याला जीव गमवावा लागला, असा आरोप सदाशिवचे भाऊ सुदाम ढवळे यांनी केला. गुन्हा दाखल तत्कालीन सरपंच सुदामती गीते, देविदास गीते, सदाशिव गीते, ज्ञानेश्वर गीते, गोविंद गीते आणि सटवा सांगळे या सहा जणांविरुद्ध मरणास कारणीभूत असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत सदाशिव यांचा मुलगा जनार्दन ढवळे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नव्हती.