नाथाभाऊंचं मोठं योगदान भाजपासाठी होतं. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांचं काम उल्लेखनीय आहे. अशा नेत्यांना ज्यांनी सत्ता आणण्यासाठी मदत केली त्यांची जी अवहेलना झाली ती खडसेंना सहन झाला नाही म्हणून त्यांनी पक्ष सोडला असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर भाजपात गेलेले अनेकजण परतीच्या वाटेवर आहेत त्यामुळेच भाजपात अस्वस्थता आहे असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून अनेक जणांनी भाजपाची वाट धरली होती. मात्र भाजपाचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही. शिवसेना आणि भाजपा यांच्यात घटस्फोट झाल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार अस्तित्त्वात आलं.

बुधवारी एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्ष सोडला. गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. अखेर एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडत आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत यावर शिक्कामोर्तब केलं. एकनाथ खडसेंनी पक्ष उभारणीसाठी आणि २०१४ मध्ये भाजपाला विजयी करण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. त्यांच्यावर सातत्याने अन्याय झाल्याचंही बाळासाहेब थोरात यांनी बोलून दाखवलं. त्याचमुळे एकनाथ खडसे यांनी असा निर्णय घेतला असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर भाजपामध्ये एकनाथ खडसे गेल्यानंतर एक अस्वस्थता पसरली आहे. अनेक अस्वस्थ झालेले पक्षातले लोक पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.