नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएममुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे २५ जागांवर नुकसान झाले. लोकसभेला एकत्र असणारी वंचित बहुजन आणि एआयएमआयएमची आघाडी विधानसभेला तुटली. हे दोन पक्ष विधासभेलाही एकत्र असते तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे आणखी नुकसान झाले असते. दोन्ही पक्षांना अल्पसंख्यांक समाजाचा मोठया प्रमाणावर पाठिंबा मिळाला.

हा समाज काँग्रेसचा पारंपारिक मतदार समजला जातो. वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएमचा काँग्रेसला १५ तर राष्ट्रवादीला १० विधानसभा मतदारसंघात फटका बसला. नांदेड उत्तर मतदासंघात काँग्रेस उमेदवार डी.पी.सावंत यांचा शिवसेनेच्या बालाजी कल्याणकर यांनी १२,१०६ मतांनी पराभव केला. कल्याणकर यांना ६२,८८४ तर सावंत यांना ५०,७७८ मत मिळाली. एआयएमआयएमच्या फिरोझ लाला यांना ४१,८९२ तर वंचित बहुजन आघाडीच्या मुकूंद चावरे यांना २६,५६९ मते मिळाली.

मुंबईत चांदिवली काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. तिथे शिवसेनेच्या दिलीप लांडे यांनी अवघ्या ४०९ मतांनी विजय मिळवला. इथे वंचितच्या अब्दुल हसन खान यांनी ८८७६ आणि एआयएमआयएमच्या मोहम्मद इमरान कुरेशी यांना १,१६७ मते मिळाली. चाळीसगावमध्ये भाजपाच्या मंगेश चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या राजीव देशमुख यांचा ४,२८७ मतांनी पराभव केला. इथे वंचितच्या मोरसिंह राठोड यांनी ३८,४२९ मते मिळाली.