जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील खरीप हंगामातील पीकविम्यापोटी १६० कोटी ४१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. येत्या काही दिवसांत विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
मागील खरीप हंगामातील पीकविमा काढण्यासंदर्भात सरकारने जनजागृती केली. दुष्काळी स्थितीत जिल्ह्यातील २ लाख १५ हजार ६१२ शेतकऱ्यांनी पिकांचा विमा काढला. विमा कंपनीकडे ८ कोटी ५६ लाख रक्कम भरण्यात आली. सरकारने वेळोवेळी पीकविमा भरण्यास मुदतवाढ दिली. पीकविमा काढण्यापूर्वी शेतकऱ्यांना नुकसान झाल्यास त्याची तातडीने भरपाई दिली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पीकविम्याची रक्कम मिळत नसल्याने शेतकरी हवालदील झाले हाते.
जिल्ह्यात एकूण लागवडयोग्य क्षेत्र ५ लाख ५९ हजार हेक्टर आहे. पकी केवळ १ लाख ४८ हजार ६७९ हेक्टरचा विमा काढण्यात आला. २३५ कोटी ८४ लाख संरक्षित रक्कमेचा विमा नोंदवण्यात आला. जिल्ह्यातील २ लाख १५ हजार ६१२ शेतकऱ्यांनी ८ कोटी ५६ लाख रक्कम भरली होती. यात ८४ हजार ६०७ सोयाबीन उत्पादकांनी तब्बल ४ कोटी ५४ लाख १८ हजार रुपये पीकविम्यासाठी भरले. १४ हजार ४०३ कापूसउत्पादक शेतकऱ्यांनी १ कोटी ७३ लाख ४९ हजार रुपये रक्कम भरली. धान पिकासाठी ३ हजार ४८८ शेतकऱ्यांनी ३४ लाख, ज्वारीसाठी ६ हजार ८२२ शेतकऱ्यांनी ११ लाख, बाजरीसाठी ५३८ शेतकऱ्यांनी ८२ हजार, तुरीसाठी १४ हजार ७७४ शेतकऱ्यांनी ३४ लाख, मूग पिकासाठी ६४ हजार ३०४ शेतकऱ्यांनी १ कोटी २९ लाख ३४ हजार रुपये, उडीद पिकासाठी २६ हजार ४४६ शेतकऱ्यांनी ४६ लाख ६३ हजार रुपये, सूर्यफुल पिकासाठी २३० शेतकऱ्यांनी ४५ हजार रुपये रक्कम भरली.