युवासेनेचे प्रमुख आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे बुधवारी (२३ नोव्हेंबर) बिहार दौऱ्यावर जात आहेत. मुंबईतून पाटण्याकडे निघण्याआधी त्यांनी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी त्यांना बिहार दौऱ्याचा अजेंडा काय? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर आदित्य ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, “मागील अनेक दिवसांपासून तेजस्वी यादव आणि माझी फोनवर चर्चा सुरू आहे. आधी आमचं महाराष्ट्रात सरकार होतं आणि ते बिहारमध्ये विरोधी पक्षात होते. तेव्हापासून आम्ही एकमेकांशी सल्लामसलत करत असतो. आज पहिल्यांदा आम्ही एकमेकांना भेटू. या भेटीत अनेक विषयांवर चर्चा होईल. यात पर्यावरण, हवामान बदलाचं संकट, उद्योग अशा अनेक विषयांवर चर्चा होईल.”

“गुजरातमध्ये प्रचारासाठी मंत्रिमंडळ बैठक रद्द”

“मला आज सकाळी बातमी कळली की, आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाली. दुसऱ्या राज्यात प्रचार सुरू आहे म्हणून ही बैठक रद्द करण्यात आली. राज्यात ओला दुष्काळ आहे, बेरोजगारी वाढत आहे, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. मात्र, या खोके सरकारच्या मंत्रिमंडळाकडे महाराष्ट्रातील प्रश्नांवर बैठक घेण्यासाठी एक तासही नाही,” असं मत व्यक्त करत आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.

“आधी आमदार, मग प्रकल्प आणि आता मंत्रिमंडळ पाठवले”

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “हे सर्व गुजरातमध्ये निवडणुकीत व्यग्र आहेत. आधी यांनी गुजरातमध्ये आमदार पाठवले, नंतर प्रकल्प पाठवले आणि आता मंत्रिमंडळ पाठवलं आहे. दुसरीकडे यांच्याकडे महाराष्ट्रासाठी अर्धा तासही नाही.”

हेही वाचा : दिशा सालियानचा सामूहिक बलात्कार करून खून झाल्याचा आरोप करणाऱ्या राणेंना आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मंत्रिमंडळ बैठक होणं गरजेचं होतं”

“त्यांनी दुसऱ्या राज्यात प्रचार करावा. त्याबद्दल आक्षेप नाही, मात्र, महाराष्ट्रात ओला दुष्काळ आणि इतर संकटं असताना मंत्रिमंडळ बैठक होणं गरजेचं होतं. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक तास द्यायला हवा होता,” असंही आदित्य ठाकरेंनी नमूद केलं.