राज्यात सत्तांतर होऊन एक महिना उलटला आहे. मात्र शिंदे सरकारचा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिपद मिळावे यासाठी शिंदे गटातील आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक आमदार उत्सुक आहेत. असे असताना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळ्यामध्ये सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आले आली आहेत. याच कारणामुळे सत्तार यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. या आरोपानंतर सत्तार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माझ्या कुटुंबातील कोणी दोषी असेल तर तेगुन्हेगार आहेत, असे ते म्हणाले आहेत. तसेच पत्रकार परिषदेत बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराचे जाऊद्या. आधी बदनामी झाली त्याचं बघा, असे उद्गार सत्तार यांनी काढले आहेत.

हेही वाचा >>> “बंड झाले, आता थंड झाले?, तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण…”; ‘मनसे’च्या एकमेव आमदाराचा शिंदे सरकारला टोला

“अरे मंत्रिमंडळ जाऊद्या हो. ही जी बदनामी झाली आहे, त्याचं बघा. बदनामी झालेली असताना तुम्ही मंत्रिपद पाहिले असते का ? ही जी बदनामी झाली आहे, त्याची अगोदर चौकशी व्हायला हवी. जे होईल ते होईल. याचा हिशोब जनता घेईल. मात्र ज्या पद्धतीने माझी बदनामी झाली, त्याचे उत्तर अगोदर मला हवे आहे. माझ्या मुलींची लग्न झाली आहेत. त्यांना मुलंबाळं आहेत. आमचे एकत्र कुटुंब नाही,” असे सत्तार म्हणाले.

हेही वाचा >>> योगी आदित्यनाथ यांनी भाजपा कार्यकर्त्याच्या घरावर चालवला बुलडोझर, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझा मुलगा अजून टीईटी परीक्षेला बसला नाही. त्यामुळे त्याचे नाव त्या यादीत कसे गेले. तरीदेखील काही हितचिंतक त्याचे नाव यादीत टाकत असतील तर हरकत नाही. यातील खरा गुन्हेगार चौकशी झाल्यानंतरच समजेल. या प्रकरणाचा तपास ईडी करतेय. हा घोटाळा फक्त राज्य सरकारपुरता मर्यादित नाहीये. माझी मुलं अपात्र असून पात्र दाखवले जात असतील तसेच त्यांनी कुठे पगार मागितला असेल, नोकरी मागतील असेल तर ते दोषी आहेत. महाराष्ट्राचा शिक्षण विभाग खूप मोठा आहे. चौकशी होईल,” असेही अब्दुल सत्तार म्हणाले.