Mumbai Rain News: गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्यासोबतच, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईला मोठा फटका बसला असून, शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले पाहायला मिळत आहेत.

या परिस्थितीवरून शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्यातील भाजपा सरकार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना जबाबदार धरले आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी या पावसामुळे मुंबईत ज्या घरांचं आणि दुकानांचं नुकसान झाले आहे, त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या नव्हे तर राज्य सरकारच्या तिजोरीतून भरपाई देण्याची मागणी केली आहे.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, “ट्विटरवर टीव टीव करणं खूप सोपं असतं. पण कालचा पाऊस हा या महिन्यातील पहिला पाऊस नव्हता. मेच्या पहिल्या आठवड्यातही पाऊस आला होता. त्यावेळीही अशीच परिस्थिती होती, साकीनाका परिसर पूर्णपणे भरून गेला होता. तसेच, साकीनाका आणि अंधेरी सबवे परिसरात गेल्या आठवड्यातही अशीच स्थिती निर्माण झाली होती.”

राज्य सरकारच्या तिजोरीतून नुकसान भरपाईची मागणी

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, “ज्यांना या पावसाचा फटका बसला आहे, ज्यांच्या घरांचं आणि दुकानांचं नुकसान झालं आहे, त्यांना नुकसानभरपाई मिळावी, या मागणीसाठी मी ही पत्रकार परिषद घेत आहे. तुम्ही मुंबई महानगरपालिकेची तिजोरी खाली केली आहे, त्यामुळे नुकसानभरपाई ही राज्य सरकारच्या तिजोरीतून द्यावी. काल पावसामुळे जो गोंधळ उडाला, तो केवळ पावसामुळे उडाला नाही. हे सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचं अपयश आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप सरकार आणि एकनाथ शिंदे जबाबदार

“या राज्यामध्ये सरकार आणि प्रशासन तरी अस्तित्वात आहे का? शासन आणि प्रशासन मजा-मस्तीत व्यस्त आहे. सगळीकडे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, ‘हा जिल्हा मला आणि तो जिल्हा तुला’ असं चाललं आहे. कुठेही काम होताना दिसत नाही. ब्रीच कँडी, नरीमन पॉइंट, हिंदमाता आणि मंत्रालय या परिसरात पूर्वी कधीही पाणी साचत नव्हतं, पण आता तिथेही पाणी साचत आहे. यासाठी भाजप सरकार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे जबाबदार आहेत.”