लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत काही मतदारसंघाबाबत मतभेद असल्याची चर्चा आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच सुरू असून अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. यातच वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीबरोबर जाणार की नाही? याबाबतही संभ्रम कायम आहे. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला २६ मार्चपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. यानंतर आज (२४ मार्च) प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि 'वंचित'च्या युतीसंदर्भात भाष्य केले. महाविकास आघाडीवर टीका करत प्रकाश आंबेडकर यांनी आपण कोणत्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार? याची थेट घोषणा केली. प्रकाश आंबेडकर काय म्हणाले? "महाविकास आघाडीबरोबर जाण्यासंदर्भात त्यांचाही आणि आमचाही निर्णय झालेला नाही. महाविकास आघाडीत अजूनही काही जागासंदर्भात मतभेद आहेत. यातच काँग्रेसने त्यांच्या काही जागांची यादी जाहीर केली. मात्र, मतभेद असलेल्या मतदारसंघाबाबत त्यांनी उमेदवार जाहीर केलेले नाहीत. यामध्ये काही मतदारसंघावर ठाकरे गटाने दावा केला, तर काही मतदारसंघावर काँग्रेसने दावा केलेला आहे. त्यामुळ एकदा त्यांचा निर्णय झाला की आमच्याबरोबर चर्चा करायला ते तयार असतील तर आम्ही तयार आहोत, अन्यथा इतर संघटनांशी आम्ही बोलून पुढची काय ती योजना आखणार आहोत", असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. हेही वाचा : “त्यांची भांडणं जर मिटली नाही, तर आम्ही २६ तारखेला..”, प्रकाश आंबेडकरांनी दिला अल्टिमेटम! 'वंचित'ला किती जागांचा प्रस्ताव? शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीला ४ जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीने दिला असल्याचे सांगितले होते. यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, "मी त्यांना (ठाकरे गट) त्या चार जागा परत देतो, त्यांनी त्या लढवाव्या. संजय राऊत हे चार जागा म्हणत असले तरी त्यांनी बैठकीला गेल्यानंतर एक अकोला आणि दोन दुसऱ्या जागा, अशा तीन जागा देण्यासंदर्भात सहमती दर्शवली होती. त्यामुळे खोटं बोलणं थांबलं पाहिजे", असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आपण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? याची घोषणा केली. ते म्हणाले, "मी माझ्या पक्षाच्यावतीने २७ मार्च रोजी अकोला मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्याआधी २६ मार्चला आम्ही आमची भूमिका जाहीर करू", असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. दरम्यान, याचवेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा ४०० पारचा नारा संविधान बदलण्यासाठी देत असल्याचा आरोप त्यांनी केला.