अहिल्यानगर : राहुरीतील डॉ. बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद स्वीकारताच अरुण तनपुरे व त्यांचे चिरंजीव कारखान्याचे संचालक हर्ष तनपुरे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला. अरुण तनपुरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे जवळचे नातेवाईक तसेच माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे बंधू व माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे चुलते आहेत.
विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत असलेल्या व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने कर्जापोटी जप्त केलेल्या राहुरीतील तनपुरे कारखान्याची निवडणूक न्यायालयाच्या आदेशामुळे नुकतीच झाली. त्यामध्ये प्रसाद तनपुरे व अरुण तनपुरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवत कारखाना ताब्यात घेतला. बंद पडण्यापूर्वी हा कारखाना माजी खासदार डॉ. सुजय विखे यांच्या वर्चस्वाखाली होता.
कारखान्याच्या निवडणूक काळातच माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे अजित पवार यांच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र प्रत्यक्षात अध्यक्षपदी अरुण तनपुरे यांची निवड होताच, काही दिवसांत त्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अरुण तनपुरे हे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीही आहेत.
या प्रवेशापूर्वी अरुण तनपुरे यांनी काही दिवसांतच गोड बातमी मिळेल, असे सूतोवाच केले होते. त्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून आता कारखाना सुरू होण्यासाठी राज्य सरकार मदत करणार का, याकडे राहुरीतील ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. अचानक झालेल्या घडामोडीमुळे नगर जिल्ह्यात चर्चा होत आहे. या प्रवेशामागे बंद पडलेला कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.
सध्याचे राजकारण पाहता अत्यंत अस्थिरपणा आलेला आहे, कोण कुठे जाईल, हे सांगता येत नाही. राजकारण कधी बदलेल याचा भरोसा नाही, असे विधान प्राजक्त तनपुरे यांनी केलेले आहे. कारखाना आर्थिक अरिष्टातून बाहेर काढण्यासाठी तनपुरे कुटुंबीयांपुढे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता.
प्राजक्त तनपुरे यांच्या भूमिकेकडे लक्ष
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे शरद पवार यांचे निष्ठावंत समजले जातात. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत. आता प्राजक्त तनपुरे यांच्यावरही अजित पवार गटात प्रवेशासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढू लागला आहे. प्राजक्त तनपुरे कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष राहील.