अहिल्यानगर: आषाढी यात्रेसाठी पालख्यांसोबत जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या विविध सुविधांसाठी राज्य सरकारने जिल्ह्यास २ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध होणार असून, त्यातून वॉटरप्रूफ मंडप, शौचालये, स्नानगृहे, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा व ग्रामपंचायत सहाय अनुदानाचा समावेश आहे.
जिल्ह्यातून दर वर्षी पैठण येथील संत एकनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज, पिंपळनेर येथील संत निळोबाराय महाराज यांच्या प्रमुख पालख्यांसह सुमारे १६० स्थानिक पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. या यात्रेत वारकऱ्यांची प्रवासादरम्यान गैरसोय होऊ नये, यासाठी मागील दोन वर्षांपासून पालकमंत्री विखे यांच्या पुढाकाराने जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालखी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पालखी मार्गावरील अडचणी जाणून घेत सुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले. यासाठी विविध विभागांचे अधिकारी समन्वयक म्हणून नियुक्त केले आहेत. अहिल्यानगरचा हा पॅटर्न राज्यात आदर्श मानला जातो.
पावसाळ्यातील मुक्कामांदरम्यान वॉटरप्रूफ मंडपांची गरज, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा व पिण्याच्या पाण्याच्या अडचणी वारकऱ्यांनी अधोरेखित केल्या. यावर मंत्री विखे यांनी संबंधित प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर त्यांनी पाठपुरावा करून ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून २ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. या निधीतून सर्व पालखी मार्गांवर सुविधा पुरवण्याचा आदेशही त्यांनी प्रशासनास दिला.