अहिल्यानगर : वेतनवाढ, बोनस व सुट्ट्यांचा मोबदला मिळावा, या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर टेक्निकल एम्प्लॉईज असोसिएशनने आज, सोमवारपासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष सदाशिव खेडेकर, उपाध्यक्ष किशोर साठवणे, सचिव समीर शेख यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संघटनेचे कायदेशीर सल्लागार श्रीरंग गीते पदाधिकारी सोपान शिंदे, रवी काकडे, बाबासाहेब गायकवाड, शामसुंदर जाधव, अश्फाक शेख, नारायण पाटील, किरण निकम आदी उपस्थित होते. काम बंद आंदोलनाचा परिणाम अहिल्यानगर, जळगाव, जालना, बीड, हिंगोली, लातूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, नांदेड या जिल्ह्यात होऊ शकतो, याकडे संघटनेने लक्ष वेधले आहे.

अधिक माहिती देताना संघटनेकडून सांगण्यात आले की, मराठवाडा विभागातील दहा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या आयडिया कंपनीची इन्फास्ट्रक्चर कंपनी, अल्टीअस, पीटीपीएल अशा विविध कंपन्यांमध्ये टॉवर तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी पुण्यातील कामगार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, चर्चेनंतरही वेतनवाढीबाबत ठोस निर्णय झालेला नाही. मागील काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना योग्य वेतनवाढ दिलेली नाही. वाढत्या कामाच्या ताणामुळे व महागाईच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतनात ५०० ते ६ हजार रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. हे अन्यायकारक आहे तसेच सन २०२५ मधील सर्व सुट्ट्या व राष्ट्रीय सुट्ट्यांचे सुमारे ११ हजार ४०० रुपये इतके वेतन अद्याप कर्मचाऱ्यांना दिले गेले नाही. ही थकबाकी सोमवारपर्यंत अदा न केल्यास राज्यभरातील सर्व मोबाईल टॉवर कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन केले जाईल. कामगार आयुक्तांच्या हस्तक्षेपानंतरही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, त्यामुळे आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.