अहिल्यानगर : शहराच्या मध्यवर्ती भागातील शाळेत विद्यार्थ्याकडून विद्यार्थ्यांचा खून झाल्याच्या प्रकरणानंतर आता माध्यमिक शिक्षण विभागाच्या नूतन शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी आठवड्यातून एकदा शाळांनी विद्यार्थ्यांचे दप्तर तपासणी करण्याची सूचना मुख्याध्यापक व शिक्षकांना केली आहे.
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षा संदर्भात शासनाने नव्याने घोषित केलेल्या चार समित्या सक्षम करण्यात येणार असून, त्यांच्या माध्यमातून विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. विद्यार्थ्यांच्या मनावरचा ताण कमी करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करू, असेही आश्वासन त्यांनी दिले. दोन दिवसांपूर्वी शहरात शाळेच्या आवारात झालेल्या विद्यार्थ्याच्या खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, सर्व शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी एका शिक्षकाला समुपदेशनाची जबाबदारी द्यावी व आठवड्यातून एकदा तरी विद्यार्थ्याच्या दप्तराची तपासणी करावी.
माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी म्हणून संध्या गायकवाड यांनी नियुक्ती झाली आहे. त्यानंतर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तथा राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष प्राचार्य सुनील पंडित यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना सहकार्य करून गुणवत्ता वाढीचे प्रयत्न करू. केवळ मागण्या न करता विद्यार्थी व पालकांच्या अपेक्षेप्रमाणे शैक्षणिक कामकाज उत्कृष्ट करण्याचे आश्वासनही पंडित यांनी दिले. मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी शीतल बांगर, संभाजी पवार, उल्हास दुगड, काशिनाथ हापसे, श्रीकृष्ण पवार, संगीता जोशी, संगीता गुंड, श्रीमती नन्नवरे, प्रसाद सामलेटी, सचिन गुंजाळ आदी उपस्थित होते.