Ajit Pawar On Uddhav Thackeray and Raj Thackeray : राज्याच्या राजकारणात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाबरोबर युतीच्या संदर्भात एका मुलाखतीत बोलताना मोठं विधान केलं. ‘मराठी माणसाच्या अस्तित्त्वासाठी आमच्यातील वाद, भांडणं किरकोळ आहेत, एकत्र येणं, एकत्र राहणं यात फार कठीण नाही’, असं म्हणत राज ठाकरे यांनी एक प्रकारे ठाकरे गटाबरोबर युतीचे संकेत दिले.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही प्रतिसाद देत आपणही किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला तयार असल्याचं म्हटलं. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं. दरम्यान, यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझं मत एवढंच आहे की प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटतं तो निर्णय त्यांनी घ्यावा’, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार काय म्हणाले?

“मनसे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे हे स्वत: काम करतात. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हे काम करतात. त्यामुळे त्यांनी त्यांच्या दोन्ही पक्षाबाबत काय भूमिका घ्यावी हा प्रश्न त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं की नाही यावं? हे आम्ही दुसऱ्या कोणत्या राजकीय पक्षांने सांगण्याचं काही कारण नाही. माझं मत एवढंच आहे की प्रत्येकाने आपल्या सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून जे जे त्यांना योग्य वाटतं तो निर्णय त्यांनी घ्यावा’, असं अजित पवार म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एकत्र येण्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, “किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मीही तयार आहे. सर्व मराठी माणसांच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे. जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कारभार घेऊन जात आहेत, तेव्हाच जर विरोध केला असता तर हे सरकार तिकडे बसलं नसतं. महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं. त्याचवेळेला हे काळे कामगार कायदे फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा. मग तडजोड करायची, हे असं चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या आडवं जो कोणी येईल, त्याचं स्वागत मी करणार नाही. त्याला घरी बोलावणार नाही, त्याचं आदरातिथ्य करणार नाही. त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही. हे ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरे काय म्हणाले होते?

“एकनाथ शिंदेंचं राजकारण वेगळं आणि मी शिवसेनेतून बाहेर पडलो, हे वेगळं आहे. आमदार तेव्हा माझ्याकडेही आले होते. हे मलाही (एकनाथ शिंदेंच्या बंडासारखं) तेव्हा सहज शक्य होतं. पण बाळासाहेब ठाकरे सोडून मी कोणाच्याही हाताखाली काम नाही करणार हा माझा विचार होता. मी बाहेर पडलो त्यावेळेचा हा माझा विचार आहे. पण मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धव ठाकरे यांच्याबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्याच्या मनात आहे का? मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावं. अशा लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही”, असं राज ठाकरेंनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं होतं.