भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार आशिष शेलार यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या वेबसंवादात बोलताना भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी युती होणार असल्याचा दावा केलाय. मात्र आता या दाव्यावरुन राज्यातील राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शेलारांच्या या दाव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय.

नक्की वाचा >> “आशिष शेलारांनी फडणवीसांवर टीका केलीय, भाजपाने तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा चंद्रकांत पाटील…”; काँग्रेसची मागणी

“भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी संयुक्त सरकारची २०१७ मध्येच सारी तयारी झाली होती. राष्ट्रवादीची खाती, लोकसभेच्या किती जागा लढायच्या याची सारी चर्चा भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर झाली होती. शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी होण्यास राष्ट्रवादीने विरोध केल्याने त्रिपक्षीय सरकार तेव्हा स्थापन झाले नव्हते. पण २०१९ मध्ये त्याच शिवसेनेबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसने सलगी गेली. तर शिवसेनेने सत्तापिपासूपाणाचा परमोच्च बिंदू गाठत काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर हातमिळवणी केली,” अशी टीका शेलार यांनी केली. यावरुन आता अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना खोचक शब्दांमध्ये उत्तर दिलंय.

“२०१७ ला काय झालं, तेव्हा नेते काय बोलत होते आता काय बोलत होते यापेक्षा आत्ता जनतेसमोर काय प्रश्न आहे, समस्या काय आहेत, याकडे लक्ष दिले पाहिजे,” असा टोला अजित पवार यांनी शेलार यांनी केलेल्या दाव्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता लगावला. पुढे बोलताना त्यांनी राज ठाकरेंचेही उदाहरण दिलं. “राज ठाकरे यांनी २०१९ ला भाजपावर टीका केली होती, आघाडीच्या उमेदवार यांना पूरक अशी अप्रत्यक्ष भूमिका घेतली होती. आता तर ते क्लियर क्लियर महाविकास आघाडी विरोधात भूमिका घेत आहेत,” असंही म्हटलं.

अजित पवार यांनी पुढे भाष्य करताना, “राजकारणात काहीही घडत असतं, अशा वेळी काही परिस्थिती निर्माण होते की लोकांना वाटणार नाही असे निर्णय व्हायला लागतात. ममता बॅनर्जी आधी भाजपला समर्थन करत होत्या, नितीश कुमार हे कधी भाजपाला समर्थन करतात कधी विरोधात असतात,” असंही म्हटलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा युतीचा विचार २०१७ मध्ये झाल्याचा दावा करणाऱ्या आशिष शेलारांना उपरोधिक पद्धतीने टोला लगावलाय. “आशिष शेलार हे मोठे नेते आहेत, त्यांच्याशी पवार साहेब थेट बोलले असतील,” असंही अजित पवार यांनी म्हटलंय.