राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून भाजपाकडून सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे. राज्य सरकारमधील मंत्र्यांवर किंवा इतर नेत्यांवर या काळात गैरव्यवहाराचे आणि भ्रष्टाचाराचे आरोप देखील करण्यात आले. यातूनच हे सरकार कधी पडेल, याचे मुहूर्त देण्यात येत होते. यासंदर्भात बोलताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपावर खोचक शब्दांत निशाणा साधला आहे. पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना अजित पवारांनी राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेविषयी देखील भाष्य केलं आहे.

“राज्यात हे सरकार आल्यापासून…”

“राज्यात ज्यांच्याकडे बहुमताचा आकडा असेल, ती व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते हे लोकशाहीतलं सत्य आहे. हे सरकार आल्यापासून कुणी म्हटलं ३ महिन्यात जाईल, ६ महिन्यात जाईल, ९ महिन्यात जाईल, १२ महिन्यात जाईल… असं करत करत आता अडीच वर्ष झाले. आता त्यांना जर काही माहिती असेल, तर मला त्याबद्दल काही माहिती नाही”, असं म्हणत अजित पवारांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

“सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे या तीन नेत्यांचा जोपर्यंत महाविकास आघाडीला पाठिंबा आहे, तोपर्यंत हे महाविकास आघाडीचं सरकार चालत राहील”, अशा शब्दांत अजित पवार यांनी टोला लगावला आहे.

“मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती तर राज ठाकरेंनी…”; अजित पवार स्पष्टच बोलले

राज ठाकरेंच्या सभेवर सूचक प्रतिक्रिया

औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची १ मे रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेबाबत अजित पवारांनी “काहीजण नवीन प्रश्न निर्माण करत असतात”, असं म्हणत सूचक विधान केलं आहे. “कुणी काय सभा घ्यावी, कशी घ्यावी, त्याला परवानगी त्या त्या भागातल्या पोलिसांकडून दिली जात असते. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान भारत एकसंघ ठेवण्यासाठी दिलं आहे. त्यामुळेच आपण गेली ७५ वर्ष देशाला पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. पण काहीजण कधीकधी त्यातून नवीन प्रश्न निर्माण करतात. त्यात कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. ती तशी होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीचं सरकार सतर्क आहे”, असं अजित पवार म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“सभा कुणालाही घेता येते. फक्त ती घेत असताना आपण सभेत जे वक्तव्य करू. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था अडचणीत येणार नाही, त्यातून कुणाच्या भावना दुखावणार नाही हे पाहायला हवं. कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या गोष्टी बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे”, असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले.