Maharashtra Political Crisis : राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.

आज सकाळपासूनच राज्यातील राजकारणात भूकंपसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजभवनात दाखल झाले होते. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, सरकारकडून याबाबत काहीच अधिकृत खुलासा करण्यात आला नव्हता. अखेर, आज दुपारीच काही वेळापूर्वी राजभवनात शपथविधी सोहळा झाला. यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं जाहीर केलं. “मी अजित पवार, महाराष्ट्राच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो”, असं अजित पवार म्हणाले.

हेही वाचा >> राष्ट्रवादीत अजित पवारांची बंडखोरी, संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; ट्वीट करत म्हणाले….

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाव टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आज अचानक अजित पवार राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.