पंढरपूर : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित नागरिकांना ५० लाख रुपयांचे जीवनावश्यक धान्य शिधा किट सुमारे ५ हजार नग आणि अन्नछत्र मंडळाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने १ हजार पूरग्रस्त महिलांना साडी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेस सचिव शामराव मोरे, मनोज निकम, अरविंद शिंदे उपस्थित होते. भोसले पत्रकारांना माहिती देताना म्हणाले, सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या पूर परिस्थितीमध्ये बाधित नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोलापूर जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसार बाधित नागरिकांना सुमारे ५० लाखाचे रुपयांचे जीवनावश्यक धान्य शिध्याचे ५ हजार नग अन्नछत्र मंडळ यांच्याकडून व न्यासाची सहयोगी संस्था, हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या, संस्थापक अध्यक्ष अलकाताई जन्मेजयराजे भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संस्थापक सचिव अर्पिताराजे अमोलराजे भोसले, यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त महिलांसाठी १ हजार साडीचोळीचे पूरग्रस्तांना वाटप करणार आहोत.

न्यासाचे सचिव शामराव मोरे म्हणाले, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे धर्मादाय न्यास गेली ३८ वर्षे स्वामींचे अन्नदानाचे कार्य सातत्याने करीत सामाजिक बांधिलकीजपत सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य, क्रीडा व पर्यावरणपूरक असे नानाविध उपक्रम सदैव राबवित असते, तसेच पूरग्रस्त, जळीतग्रस्त, भूकंपग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देत असते. शासनाच्या विविध उपक्रम राबविण्यात व शासनास सहकार्य करण्यात हे धर्मादाय न्यास सदैव अग्रेसर असते असेही ते म्हणाले. अन्नछत्र मंडळ व त्यांची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी या संस्थेकडून देखील सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्यविषयक व पर्यावरणविषयक उपक्रम राबवित समाजात जनजागृती करीत असते. सखी भगिनींना समाज प्रबोधन करीत असते असे सचिव शामराव मोरे यांनी सांगितले. ही मदत जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. ही मदत जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपुर्द करणार आहोत.