शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने राज्यात महाप्रबोधन यात्रा सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रा पोहचली, असून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे शिंदे गटावर सातत्याने हल्लाबोल करत आहे. यातच धरणगाव येथील सभेत मंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे युवासेनेचे राज्यविस्तारक शरद कोळी यांना जिल्ह्यात बंदी घालण्यात आली होती. आता मुक्तानगर येथे होणाऱ्या महाप्रबोधन यात्रेस बंदी घातली आहे.

मुक्ताईनगर येथे आज ( ४ नोव्हेंबर ) शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा पार पडणार होती. मात्र, कालच एका वक्तव्यामुळे शरद कोळी यांना जिल्ह्यात बंदी घातली होती. त्यानंतर आता मुक्तनगरमध्ये सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेला बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा : “उद्धव ठाकरेंना भाजपाबरोबर युती…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला खुलासा

यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “मुक्ताईनगर येथील महाप्रबोधन यात्रेच्या सभेला आम्ही परवानगी मागितली आहे. ती मिळेल, असा विश्‍वास आहे. कोणीही सभेवर बंदी घालू शकत नाही. त्यामुळे महाप्रबोधन यात्रा पार पडणारच. सत्ताधारी दबावतंत्राचा वापर करत आहे,” असा आरोपही अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारवर केला आहे. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा : “मुख्यमंत्री प्रश्नांपासून पळ काढणारे”, ट्विटर पोलनंतर आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका; म्हणाले, “जनतेलाही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शिंदे गटाला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातर्फे मुक्तानगरमध्ये महाआरतीचा कार्यक्रम होणार होता. यासाठी मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित राहणार होते. मात्र, सुषमा अंधारे यांची सभा आणि महाआरतीचा कार्यक्रम एकाच दिवशी असल्याने ठाकरे विरुद्ध शिंदे गटात राडा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने सुषमा अंधारे आणि शिंदे गटाच्या कार्यक्रमाला सुद्धा परवानगी नाकारली आहे.