Ambadas Danve On Parth Pawar Land Deal Case : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर पुण्यातील एका जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी विरोधकांनी गंभीर आरोप केले आहेत. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन केवळ ३०० कोटीं रुपयांना खरेदी केल्याचा आरोप केला आहे. तसेच या प्रकरणात केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरण्यात आल्याचा गंभीर आरोपही विरोधकांनी केला आहे.

या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांवर गंभीर आरोप झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, या प्रकरणात आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच या जमीन खरेदी व्यवहार प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्ही देखील राजीनामा द्या, अशी मागणी अंबादास दानवे यांनी अजित पवारांबाबत केली आहे. याबाबत दानवेंनी एक्सवर (ट्विटर) एक सविस्तर पोस्ट देखील लिहिली आहे.

अंबादास दानवेंनी काय म्हटलं?

“मुलगा पुण्यात ३०० कोटींचा व्यवहार करतो, हे पित्याला ज्ञात नाही आणि जेव्हा या मुलाचे वडील पुण्याचे पालकमंत्री आहेत. तुमचं तुम्हाला तरी पटतंय का हे बोलताना? बाजार भावापेक्षा कमी दरात जमीन घेतली गेली आहे, खडसेंचा राजीनामा घेतला गेला होता. चौकशी होईपर्यंत नैतिकता राखून तुम्हीही राजीनामा द्या. न्या. झोटिंग समितीच्या धर्तीवर कोरेगाव पार्क प्रकरणातही समिती मुख्यमंत्री महोदयांनी नेमावी. अशी आमची स्पष्ट मागणी आहे”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

‘दोन वाक्यात उत्तर देऊन हा विषय संपवता येणार नाही’

“भोसरी जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांनी बाजारभावापेक्षा कमी किमतीत जमीन घेतल्याचा आरोप झाला तेव्हा ईडीकडून मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्थ पवार प्रकरणाची चौकशी लावली आहे. मात्र दोन वाक्यात उत्तर देऊन हा विषय मुख्यमंत्री महोदयांना संपवता येणार नाही”, असंही अंबादास दानवेंनी गुरुवारी एका पोस्टमध्ये म्हटलं होतं.

पार्थ पवार जमीन प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटलं?

पुण्यातील जमीन व्यवहाराबाबत पार्थ पवार यांच्यावर आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, “सदर प्रकरणासंदर्भात मी सर्व माहिती मागवली आहे. महसूल विभाग, आयजीआर, लँड रेकॉर्ड्स याची सर्व माहिती मागितली आहे. योग्य ते चौकशीचे आदेशही मी दिलेले आहेत. सर्व माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारावर मी जे सांगायचे ते सांगेन.”

“अद्याप माझ्याकडे पूर्ण माहिती आलेली नाही. प्राथमिकदृष्ट्या जे मुद्दे समोर येत आहेत. ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याबाबत योग्य माहिती घेऊनच बोलले पाहिजे. त्यादृष्टीने आज माहिती मिळाल्यानंतर शासनाची पुढची कारवाई काय आहे, त्याबाबत दिशा स्पष्ट करू. उपमुख्यमंत्रीही (अजित पवार) अशा कुठल्याही प्रकाराला पाठिशी घालतील असे माझे मत नाही. यासंदर्भात आमच्या सरकारचे एकमत आहे. कुठेही अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. या मताचे आम्ही आहोत. अनियमितता झाली आहे का? हे पडताळून पाहिले पाहिजे. अनियमितता झाली असेल तर त्याच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल”, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.