आंबोली या दक्षिण कोकणच्या प्रतिमहाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची रीघ बारमाही व्हावी म्हणून शासनाने आंबोलीचे धबधबे कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
आंबोली हे थंड हवेचे ठिकाण आहे. या ठिकाणी सुमारे ३०० प्रकारच्या वनऔषधी वनस्पती आहेत. शिवाय धबधबे या ठिकाणचे खास आकर्षण राहिले आहे. या ठिकाणचे हिरण्यकेशी तीर्थक्षेत्रही प्रसिद्ध आहे.
आंबोलीत येणारा पर्यटक किमान आठवडाभर राहिला पाहिजे, अशा पर्यटन पायाभूत सुविधा होण्याची गरज आहे. आंबोलीतील वनबाग पर्यटकांचे आकर्षण होती, पण ती नादुरुस्त आहे.
आंबोलीचे धबधबे कायमस्वरूपी सुरू ठेवण्यासाठी पर्यटन महामंडळाने तजवीज करायला हवी. पावसाळ्यात शेकडो पर्यटक येतात, तसेच ते वर्षभर येतच असतात. पण कायमस्वरूपी धबधबे सुरू राहिले तर आंबोलीचे पर्यटन वृद्धिंगत होईल.
आंबोलीत आठवडाभर नाहीतर किमान तीन दिवस पर्यटक राहील अशा पायाभूत सुविधा निर्माण करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. गोव्यात जाणारे पर्यटक आंबोली, सागरकिनारी स्थिरावले तर पर्यटन व्यवसायात वाढ होऊ शकते.
सध्या आंबोलीच्या धबधब्याचा कोसळण्याचा आवेग मंदावला आहे. पण देशी पर्यटक या ठिकाणी थांबतात व पर्यटनाचा आस्वाद घेतात. पण हाच धबधबा कायमस्वरूपी सुरू राहिल्यास पर्यटनाचा ओघ कायमस्वरूपी वाढणार आहे.