रत्नागिरी– रत्नागिरी जिल्ह्यात होणा-या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बळीराज सेना लढणार असल्याचे स्पष्ट संकेत जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी दिले आहेत. तसेच या निवडणुकांसाठी लवकरच उमेदवारांची चाचपणी करण्यात येणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणा-या निवडणुकांमध्ये बळीराज सेना आपले उमेदवार उभे करणार आहे. याविषयी बोलताना कांबळे म्हणाले की, बळीराज सेनेकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी असून सक्षम कार्यकर्त्यांना या निवडणुकीत उतरविण्याचा विचार करण्यात येत असल्याचे कांबळे यांनी सांगितले. या निवडणुकासाठी बळीराज सेनेकडे मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण व गुहागरमध्ये उमेदवार तयार असून दक्षिण रत्नागिरी तालुक्यांतील उमेदवार लवकरच निश्चित होतील असे ही त्यांनी सांगितले.
बळीराज सेना ही सर्वसामान्य जनतेची असल्याने उच्च शिक्षित नव तरुण कार्यकर्ते यांना या निवडणुकीत संधी देण्यात येणार आहेत. तसेच येत्या काही दिवसांतच कोकण दौरा करण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले. गाव पातळीवरील उमेदवारासंदर्भात चाचपणी करण्यात येणार असून कोकणात बळीराज सेना पक्षाच्या वतीने स्वतंत्र उमेदवार आगामी निवडणुकीत देण्यात येणार आहेत. मात्र मतांचे विभाजन होणार आहे. तरीही बळीराज सेनेची ताकद मोठी आहे. कारण या पक्षाकडे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात असल्याचे जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे यांनी सांगितले आहे.