सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदावरून हटविण्यामुळे नाराज झालेले स्थानिक नेते बळीराम साठे यांनी आज शरद पवार यांची बारामतीत भेट घेतली. यावेळी त्यांचे म्हणणे ऐकूण घेतल्यावर त्यांना जिल्ह्यातील पक्ष निर्णय प्रक्रियेत स्थान देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पक्षात डावलल्यामुळे नाराज झालेले साठे अन्य राजकीय पर्याय शोधण्याच्या तयारीत होते.
पक्षाचे अनेक वर्षे जिल्हाध्यक्ष राहिलेले साठे यांना अलीकडेच पदमुक्त करून त्यांच्या जागी पंढरपूरचे वसंत देशमुख यांची वर्णी लावण्यात आली होती. देशमुख हे मोहिते-पाटील गटाचे मानले जातात. साठे यांना पदमुक्त केल्यानंतर प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले होते. परंतु, आपणास विश्वासात न घेता अचानकपणे पदमुक्त केल्याबद्दल साठे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यावर संतप्त झाले होते. यातूनच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याची आणि अन्य राजकीय पर्याय शोधण्याची मानसिकता केली होती. एवढेच नव्हे तर खुद्द शरद पवार यांनी पुन्हा बोलावले तरी आपण त्यांच्याकडे जाणार नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले होते. दरम्यान, साठे यांना शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भाजपमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी दोन्ही पक्षाचे स्थानिक नेते प्रयत्नशील होते.
दरम्यान, त्यांची नाराजी समजताच पवार यांनी त्यांच्याशी संपर्क साधून भेटीसाठी बोलावले होते. त्यानुसार साठे यांनी आपल्या अनुयायांसह बारामतीच्या गोविंद बागेत पवार यांची भेट घेतली. बळीराम साठे यांचे पक्षाचे जिल्हाध्यक्षपद कायम राहण्यासाठी सोलापूर पूर्व आणि सोलापूर पश्चिम असे दोन भाग करण्याचा आणि पूर्व भागाच्या जिल्हाध्यक्षपदी साठे यांना कायम ठेवण्याचा मनोदय पवार यांनी बोलून दाखविल्याचे पक्षाचे पदाधिकारी संजय पाटील-घाटणेकर यांनी सांगितले.