शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) करण्यात आलेल्या कारवाईवर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांनी चूक केलेली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते सोलापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडी पथक दाखल झालं असून शोधमोहिम सुरु आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक, विहंग सरनाईक यांच्या घरीदेखील ईडीचं पथक पोहोचलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी प्रताप सरनाईकांवरील कारवाईसंबंधी विचारण्यता आलं असता ते म्हणाले की, “ईडीने जर धाड टाकली असेल तर त्यांच्याकडे काही तक्रार किंवा पुरावे असतील. त्याशिवाय ईडी धाड टाकत नाही. मी दौऱ्यात असल्याने मला याची सविस्तर माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. चूक झाली असेल कारवाई होईल”..

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचं पथक दाखल

ईडीने इंडियन एक्स्पेसला दिलेल्या माहितीनुसार, टॉप्स ग्रुपचे प्रमोटर आणि संबंधित सदस्यांची शोधमोहिम सुरु आहे. यामध्ये काही राजकारण्यांचाही समावेश आहे. त्यानुसार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरी आणि कार्यालयात ईडीचं पथक दाखल झालं आहे. ईडीकडून मुंबई आणि ठाणे परिसरातील १० ठिकाणी शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत.

भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी या कारवाईचा राजकारणाशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी बेनामी कारभार, बोगस कंपन्या असतील, भ्रष्टाचार केला असेल तर कारवाई झालीच पाहिजे असं म्हणत कारवाईचं स्वागत केलं आहे.

आणखी वाचा- रिक्षाचालक ते सव्वाशे कोटींचा मालक… प्रताप सरनाईक यांचा थक्क करणारा प्रवास

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करु- संजय राऊत
“काही झालं तरी आमचं हे सरकार, आमदार आणि नेते हे कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्ष नाही तर त्याहीपलीकडे जाऊन २५ वर्ष कायम राहील. एजन्सीचा वापर करुन जे सरकारवर दबाव आणू इच्छितात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. तुम्ही कितीही दबाव आणा, कितीही दहशत निर्माण करा. आता तर पुढील २५ वर्ष तुमचं सरकार येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ते स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा आम्हाला माहिती आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.