उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे. जमिनीचा वाद आणि आपसांतील वैमनस्य यातून हा प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातल्या ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी महेश गायकवाड यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली.

काय घडली घटना?

उल्हासनगर मधील हिल पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेचे शिंदे गटाचे कल्याण पूर्व विभागाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक केली आहे.

हे पण वाचा- “कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेला महाराष्ट्र..”, भाजपा नेत्याने शिंदे गटाच्या नेत्यावर केलेल्या गोळीबारानंतर काँग्रेसची टीका

उल्हासनगरमधल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महेश गायकवाड यांना पाच गोळ्या आणि त्यांच्या एका समर्थकाला गोळ्या लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी माध्यमांना दिली. आमदार गायकवाड आणि शहरप्रमुख महेश गायकवाड शुक्रवारी रात्री हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात बसले होते. त्यावेळी आमदार गायकवाड, शहरप्रमुख यांच्यात वादावादी झाली.यावरून संतप्त झालेल्या आमदारांनी महेश यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

विजय वडेट्टीवार यांची भाजपावर आणि एकनाथ शिंदेंवर टीका

इथेच आणायचा होता का महाराष्ट्र माझा ?
भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात उल्हासनगर इथे पोलिस स्थानकात गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटातील आमदारांचा माज काही कमी व्हायचे नाव घेत नाही आहे. भाजपावाल्यांचे बॉस “सागर” बंगल्यावर आणि शिंदे गटाचे “बॉस” वर्षा बंगल्यावर बसून आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस आणि कायदा आपण धाब्यावर बसवून हा माज नाचवू शकतो हा आत्मविश्वासच दोन्ही पक्षातील आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आलेला आहे. गृहमंत्र्यांच्या पक्षातील आमदारच पोलीस ठाण्यात गोळीबार करतात..कायदा आणि सुव्यस्थेचे इतके धिंडवडे निघालेला असा आपला महाराष्ट्र कधी नव्हता!