भारतीय जनता पार्टीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची साताऱ्यात भेट घेतली आहे. या भेटीनं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे रविवारी आमदार मकरंद पाटील यांनीही उदयनराजे यांची भेट घेतली होती. संबंधित भेटीत नेमकी काय बातचित झाली, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. पण याबाबत राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लावले जात आहेत.

सातारा शहरातील वाहतुकीच्या संदर्भात खासदार उदयनराजेंनी भेट घेतली, असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. तसेच यावेळी सातारा जिल्ह्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. औंध पोलीस ठाण्याच्या तुरुंगातून पाच दरोडेखोर पोलिसांना मारहाण करून पळून गेले होते. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली होती. यातील एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच महिलांवरील वाढत्या अत्याचारांबाबत कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांना यांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता वळसे पाटील म्हणाले की, राणा दाम्पत्याबाबतचा निर्णय न्यायालय घेईल. भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत वीस मिनिटं चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.